2

आपल्या ‘व्हॉटस्ॲप’वर नियमितपणे लेख मिळविण्यासाठी 85 30 52 85 50 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून, त्यावर आम्हाला ‘हॅलो’ असा मॅसेज पाठवा.

Saturday 9 May 2020

भूक













आपल्याला जाणीव नसतेच
पण खरं तर आईच्या नाळेनेच
करून दिलेली असते
भुकेची ओळख
जी दिवसागणिक वाढतच असते
अगदी तुमच्या बरोबर

सुरुवातीच्या काळात कौतुकाचा
विषय असणारी भूक
आयुष्याच्या मध्यावर
कधी रौद्र रूप धारण करते
हेही कळतच नाही आपल्याला
आणि कधी कधी विवेकशून्यताही
हरवून टाकते

हेही लक्षात येत नाही
रस्त्याच्या कडेला रणरणत्या उन्हात
कातळावर घाव घालणाऱ्याच्या
घामाला 
भले तुम्ही कराल दुर्लक्षित
पण शेजारीच खेळणाऱ्या 
त्याच्या कुपोषित मुलाच्या
चेहऱ्यावरील अन्नाची भूक
हृदयाचा दगड करूनही दुर्लक्षित होता होत नाही

एवढी भुकेची व्याकुळता 
आपल्याही मनात ठसठसत असते
अशाच वेळी मग
कुठल्याशा वातानुकूलित 
रेल्वेतून प्रवास करताना,
अंध जोडप्याच्या डोळ्यातील
जळजळीत भूक 
डोळ्याआड करणं जमतंच असं नाही.

स्वतःच्या पोरांना 
महागड्या हॉटेलात आवडीचं खाऊ घालतानासुद्धा
टेबल पुसणाऱ्या पोराच्या पोटातील भूक
कितीही दुर्लक्ष केलं तरी करतेच 
तुमचा पाठलाग.

कधी कधी शरीराच्या
भुकेला भागवताना
कुठल्याशा अगतिकतेनेच
एखाद्या बाईने तिच्या भुकेसाठीच तर
केलेलं असतं तुम्हाला जवळ
ज्याला तुम्ही मोजत असता
शील-अश्लीलतेच्या तराजूत

हवं ते देवाला अर्पण केल्यानंतरही
एखादया माऊली जवळ
थबकतोच ना पाय
जिचा सुरकुतलेला चेहरा
आणि सुकलेले ओठ
भुकेसाठीच तर याचना करत असतात

अगदी मरणा नंतरही
मोक्षप्राप्तीसाठीच्या कल्पनेतून कावळ्याच्या साक्षीने
याच भुकेचा आधार घेताना
भल्याभल्यांचाही अहंकार
धुळीला मिळवते
आणि जन्मालाच चिकटून आलेली ही भूक
कोणत्याही टाळेबंदीच्या काळात
आधी भुकेलेल्यालाही संपवते!

- प्रा. नीलम यादव
(छायाचित्राचे कॉपीराईट : विकास खोत)   

No comments:

Post a Comment

माणगाव परिषद : बहिष्कृतांचे रणशिंग - उत्तम कांबळे

'अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद ’ हा उत्तम कांबळे यांचा ग्रंथ ‘ लोकवाङ् ‌ मय गृह ’ तर्फे लवकरच वाचकांच्या भेटीसाठी येत आहे. एका ऐति...