2

आपल्या ‘व्हॉटस्ॲप’वर नियमितपणे लेख मिळविण्यासाठी 85 30 52 85 50 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून, त्यावर आम्हाला ‘हॅलो’ असा मॅसेज पाठवा.

Thursday 16 May 2019

सत्तेचं शहाणपण सांगणारी मानसं


2009 साली प्रदर्शित झालेल्या ‘Invictus’ या क्लिंट ईस्टवूड यांनी दिग्दर्शन व निर्मिती केलेल्या चित्रपटाबद्दल आज आपण जाणून घेऊ या. हा चित्रपट Playing the Enemy: Mandela and the Game that Made a Nation by John Carlin या पुस्तकावर आधारित आहे. विषय आहे दक्षिण आफ्रिकेतील पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष नेल्सन मंडेला यांनी अंतर्गत यादवीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या देशाचे रग्बी खेळाच्या माध्यमातून कसे एकत्रीकरण केले. चित्रपट सुरू होतो तो पहिलाच शॉट या विषयाची स्पष्ट ओळख करून देतो. 

एका प्रशस्त मैदानावर फक्त गौरवर्णीय तरुण शाळकरी मुले रग्बीचा सराव करत आहेत. प्रशिक्षक त्यांना सूचना देत आहेत. त्या मैदानावरून कॅमेरा डावीकडे पॅन होत मैदानाबाजूच्या रस्त्यावरून पलीकडच्या एका मैदानात येतो. इथे सर्व कृष्णवर्णीय मुले फुटबॉल खेळत आहेत. त्यांना हिरवं गवताचं मैदान नाही, कुणी प्रशिक्षक नाही, अंगभर कपडे नाही, पायात धड चपला, बूट काहीच नाहीत. याउलट गौरवर्णीय मुले खेळाच्या गणवेशात खेळत होते. सोबत स्क्रीनवर लिहून येतंय साऊथ आफ्रिका, 11 फेब्रुवारी 1990.  या दोन मैदानांमधून एक रस्ता जातोय. त्या रस्त्यावरून काही गाड्यांचा ताफा जातोय. त्याकडे बघत सर्व कृष्णवर्णीय मुले कुंपणाच्या जाळीला लटकत ओरडत आहेत... मंडेला... मंडेला... हे बघून गौरवर्णीय मुले कुंपणाजवळ एकत्र येऊन गोंधळलेल्या नजरेने बघत आहेत. एक मुलगा प्रशिक्षकाला विचारतो हा काय प्रकार आहे. प्रशिक्षक सांगतात, तो आतंकवादी मंडेलाला आज सोडलाय, त्याला घेऊन जात आहेत. आजचा दिवस लक्षात ठेवा मुलांनो, आपला देश अशा कुत्र्यांच्या हातात जाणार आता. फक्त 72 सेकंदांच्या या संपूर्ण सीनमधून दिग्दर्शक तेव्हाच्या काळातील परिस्थितीची पूर्ण जाणीव प्रेक्षकांना करून देतो. प्रत्यक्षात यासाठी पुस्तकात कित्तेक पाने खर्ची घालावे लागले असतील. तरीही चित्रांसारखा अपेक्षित परिणाम होणार नाही. हे चित्रपट या माध्यमाचे वैशिष्ट्य आहे. हजार शब्दांचा आशय चित्रपटातील एका शॉटमध्ये अधिक प्रभावीपणे सांगता येऊ शकतो, तेही एकाही शब्दाचा वापर न करता. यापुढील दोन मिनिटे दहा सेकंदांच्या मोन्ताजमधून 11 फेब्रुवारी 1990 ते 10 मे 1994 एवढा काळ वृत्त सादरीकरणाच्या रचनेतून दाखवलेला आहे. आता तुम्ही कल्पना करू शकता, की हा चार वर्षांपेक्षा जास्त इतिहास सांगायला पुस्तकात किती पाने लागली असतील. चार हजार देशीविदेशी राजकीय नेत्यांच्या साक्षीने मंडेला राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतात या समारंभाने हा मोन्ताज संपतो.

आपल्याकडेही 26 मे 2014 ला असंच काही तरी झालं होतं. मात्र पुढच्या इतिहासात फार फरक आहे. सकाळी 4 वाजता मंडेला उठतात आणि फिरायला बाहेर पडतात या शॉट पासून खर्या अर्थाने चित्रपटाच्या कथेला सुरुवात होते. आधीचा भाग हा कथेची पार्श्वभूमी मांडणारी रचना होती. काल शपथ घेतल्यानंतर आज राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यालयात जाण्याचा त्यांचा पहिला दिवस आहे. आपल्या बॉडीगार्डसोबत सकाळी 4 वाजता फिरायला बाहेर पडून ते या दिवसाची सुरुवात करतात. फिरताना एक कार संशयास्पद पद्धतीने त्यांच्या मागेपुढे रस्त्यावर फिरत असते. त्या कारमधून वर्तमानपत्रांचे गठ्ठे बाहेर फेकले गेल्यानंतर संशय दूर होतो. उत्सुकता म्हणून सर्व बघतात तर आजची आठ कॉलम बातमी असते, ‘ते निवडणुका जिंकू शकतात, पण देश चालवू शकतील का?’ मंडेलांचा बॉडीगार्ड म्हणतो, तुम्ही अजून एकही दिवस राष्ट्राध्यक्ष म्हणून काम केले नसताना ते असा प्रश्न कसा काय विचारू शकतात? त्यावर मंडेला उत्तर देतात, ‘पण त्यांचा प्रश्न रास्त (कायदेशीर) आहे.’ आता ही रचना मूळ पुस्तकात नाही. ही क्लिंट ईस्टवूड यांची दिग्दर्शक म्हणून खासियत आहे. ते आपल्या चित्रपटातील मुख्य पात्र नेमकं काय विचार करतं याचा अंदाज प्रेक्षकांना येऊ देत नाहीत. अशा रचनेतूनच ते आपल्या चित्रपटाच्या मुख्य पात्रांची उकल करतात. त्याचा अपेक्षित परिणाम प्रेक्षकांवर होतो. या सीनमुळे मंडेलांचं एक व्यापक आणि प्रामाणिक चित्र प्रेक्षकांच्या मनामध्ये तयार होतं. असे अनेक प्रसंग पुढे चित्रपटात आहेत जिथे प्रेक्षकांना अनपेक्षित उत्तरे मिळतात. ही तशी साधी भाषिक रचनाच आहे, परंतु तिचा दृश्यात्मक परिणाम खूप मोठा आहे. हे साहित्यात शक्य नाही. आज असा प्रश्न विचारण्याची सोयच जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीत नाही. मंडेलांसारखे प्रामाणिक उत्तर मिळणे तर खूप लांबची गोष्ट राहिली.

मंडेलानंतर दक्षिण आफ्रिकेच्या रग्बी टीमचा कॅप्टन फ्रॅकॉइस पियेनारची त्याच सकाळी ओळख करून दिली जाते. त्याचे वडील भीती व्यक्त करतात, की इतर आफ्रिकन देशांप्रमाणे इथेही आता अनागोंदी निर्माण होईल, कारण बहुसंख्य कृष्णवर्णीयांकडे सत्ता गेल्यामुळे अल्पसंख्याक गौरवर्णीयांवर अन्याय होईल. इतर सर्व देशातही अशीच भावना आहे. मंडेला पहिल्या दिवशी राष्ट्राध्यक्ष कार्यालयात जातात तर तिथे सर्व गोरे कामगार आपल्याला नोकरीवरून काढून टाकण्याच्या आधीच आपले सामान बांधून ठेवत जाण्याच्या तयारीत आहेत. मंडेला सर्वांना एकत्र बोलावून आश्वासन देतात की, त्यांनी त्यांचे काम सुरू ठेवावे. त्यांना कोणताही त्रास होणार नाही. ते मुद्दाम आपल्या सुरक्षारक्षकांमध्ये काळ्या आणि गोर्या बॉडीगार्डचा समावेश करतात. पुढे चित्रपट सरळ मूळ कथानकावर येतो. मंडेला दक्षिण आफ्रिकेची रग्बी टीम जी स्प्रिंगबोक्स या नावाने ओळखली जाते तिचा इंग्लंडसोबतचा सामना पाहण्यासाठी येतात. तिथे त्यांची फ्रॅकॉइस पियेनारशी रग्बी टीमचा कॅप्टन म्हणून हस्तांदोलन करताना पहिल्यांदा भेट होते. सामना पाहत असताना मंडेलांच्या लक्षात येतं. गोरे लोक स्प्रिंगबोक्सला समर्थन देत आहेत आणि काळे लोक इंग्लंडच्या बाजूने चीअर करत आहेत.

दक्षिण आफ्रिकेतील कृष्णवर्णीय लोकांच्या मनामध्ये गौरवर्णीयांबद्दल प्रचंड राग आहे. त्यांनी इतके दिवस केलेल्या कृष्णवर्णीयांवरील अन्यायाबद्दलची ही चीड आहे; परंतु आता ती परिस्थिती राहिली नाही. वर्णद्वेषाची लढाई आता संपली आहे. आता देशाला प्रगती करायची असेल, पुढे जायचे असेल तर सर्वांना एकत्र मिळून प्रयत्न करावे लागतील. कृष्णवर्णीयांनी आपल्यावरील अन्यायाचा बदला घ्यायचा ठरवले तर हे शक्य होणार नाही. मंडेला याच रग्बीच्या खेळाचा उपयोग करून देशाला आणि पर्यायाने काळ्या- गोर्या लोकांना एकत्र कसे आणतात हीच चित्रपटाची मूळ कथा आहे. मंडेला आणि पियेनार ही या कथेतील दोन मुख्य पात्रे. म्हणून मुख्य कथा या दोन पात्रांच्या भोवतीच गुंफलेली आहे.

मंडेला आणि पियेनार या दोन पात्रांची रचना एकमेकांना पूरक आहे. चित्रपटाच्या अपेक्षित परिणामांसाठी ही ठरून केलेली रचना आहे. मूळ पुस्तकामध्ये आणि वास्तवात ती नसेलही. मात्र चित्रपटाच्या कथानकापुरता यात काही बदल केला जातो. याला दिग्दर्शकीय स्वातंत्र्य असं म्हटलं जातं. चित्रपटाच्या कथानकात पात्रांची समांतर रचना करता येऊ शकते. मात्र साहित्यात समांतर रचना करता येईलच असे नाही. चित्रपटात मात्र ही सहज आणि प्रभावी रचना ठरते. म्हणून या समांतर पात्र रचनेचा वापर चित्रपटात खूप मोठ्या प्रमाणात केलेला दिसून येईल. मंडेला आणि पियेनार या दोन पात्रांच्या सहसंबंधातून कथासूत्र उलगडत राहतं. मंडेला आणि पियेनार यांच्या पहिल्या भेटीच्या सीनपासून मंडेला रग्बी विश्वचषक पियेनारला देताना शेवटच्या शॉटपर्यंत ही रचना कायम ठेवली आहे. मात्र चित्रपटाचे नायक म्हणून मुख्य भर मात्र मंडेला यांच्यावरच राहील अशा पद्धतीने चित्रण केले आहे. क्लिंट ईस्टवूड हे या कलेत माहीर आहेत. अनेक चरित्रात्मक चित्रपटांचा अनुभव त्यांच्याकडे आहे. त्यांची चरित्र रंगवण्याची स्वत:ची एक पद्धत आहे. मंडेलांचे पात्र ज्या पद्धतीने चित्रित केले आहे ते खूप प्रभावी व प्रेरणात्मक आहे. स्प्रिंगबोक्स इंग्लंडसोबतचा सामना खूप वाईट पद्धतीने हरली. यानिमित्ताने नॅशनल स्पोर्ट्स कौन्सिलमध्ये ही टीम बरखास्त करून या टीमचे नाव, कपड्यांचे रंग, बोधचिन्ह असे सर्वच बदलण्याचा निर्णय होतो. त्याची कुणकुण मंडेलांना लागते. हे थांबवण्यासाठी ते कार्यालयातून थेट बैठकीच्या ठिकाणी जाण्यासाठी निघतात. त्यांची सहकारी त्यांना सांगते हे चुकीचे आहे. कृष्णवर्णीयांच्या मनात या टीमबद्दल खूप द्वेष आहे. असं व्हावं ही लोकांचीच इच्छा आहे. तुम्ही यात पडू नका. तेव्हा मंडेला उत्तर देतात...

याबाबतीत लोकांचे हे विचार चुकीचे आहेत. त्यांनी निवडलेला लोकप्रतिनिधी म्हणून हे थांबवणे ही माझी जबाबदारी आहे.’ यावर सहकारी म्हणते, तुम्ही असे करून आपले राजकीय भविष्य पणाला लावत आहात. तुम्हाला याची भीती वाटत नाही का? मंडेला स्पष्टपणे उत्तर देतात, ज्या दिवशी मला अशी भीती वाटेल त्या दिवशी मी लोकांचे नेतृत्व करण्याच्या योग्यतेचा राहणार नाही. पुढे नॅशनल स्पोर्ट्स कौन्सिलमधील भाषणात ते सांगतात, गौरवर्णीयांनी आपल्यावर जो अन्याय केलाय त्याचा बदला घेण्याची ही वेळ नाही. ते या लोकशाही प्रक्रियेतील आपले सहकारी आहेत. ही आपण सर्वांनी मिळून राष्ट्रउभारणी करण्याची वेळ आहे, आपापसात लढण्याची नाही. ही  द्वेष भावना आता बाजूला ठेवा. तुम्ही मला आपला नेता निवडलं आहे, आता मला निर्णय करू द्या, असे स्पष्टपणे सुनावतात.
यासोबतच त्यांची देहबोली, सोबतच्या इतर माणसांशी त्यांची वागणूक, त्यांची कामाप्रति असलेली निष्ठा, कामातील प्रामाणिकपणा असे अनेक पदर खूप बारकाईने चित्रित केले आहेत. मंडेला आपल्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयात चहापानाचे निमंत्रण पियेनारला देतात. तो आपल्या कार्यालयात येतो तेव्हा त्याचे स्वागत करताना आपल्या खुर्चीतून उठून दरवाजाकडे जात म्हणतात... Frangois, what an honor. Thank you for coming all this way to see me. राष्ट्राध्यक्षांचे हे रूप पाहून पियेनार चकित होतो. त्याच्या चेहर्यावरचे हावभाव दिसतील अशा पद्धतीने हा शॉट घेतला आहे. मंडेला पियेनारसोबत नेतृत्वगुणांबद्दल चर्चा करतात. आपल्या तुरुंगातील अनुभवांबद्दल सांगतात. पुढील भेटीत त्याला स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेली ‘INVICTUS’ ही कविता देतात. या भेटीचा खूप प्रभाव झालेल्या पियेनारला मंडेला ज्या तुरुंगात 18 वर्षे होते तिथे भेट देण्याची संधी मिळते. आपले दोन्ही हात लांबवून पियेनार त्या छोट्याशा खोलीचा अंदाज घेतो. त्या खोलीच्या खिडकीतून बाहेर बघतो तर त्याला बाहेर मैदानात दगड फोडणारे मंडेला दिसतात. त्या मैदानावर तो जातो तेव्हा मंडेला व त्याची नजरानजर होते. हे सर्व काल्पनिक आणि प्रतीकात्मक आहे. मात्र हे चित्र माध्यमात शक्य आहे. साहित्यात ही भेट घडवली तर एवढी प्रभावी ठरणार नाही. रग्बी विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या आधीच्या रात्री पियेनार हॉटेलच्या खिडकीतून स्टेडियमकडे पाहतोय तेव्हा तिथे त्याची पत्नी येते. त्याला विचारते, उद्याच्या अंतिम सामान्याबद्दल विचार करतोय का? तर तो म्हणतो, नाही. उद्या काय व्हायचे ते होईल. मी विचार करतोय की, एक माणूस तीस वर्षे तुरुंगातील एखाद्या छोट्याशा खोलीत कसा राहू शकतो आणि बाहेर येऊन त्या सर्वांना माफ करतो ज्यांनी त्याला उमेदीची तीस वर्षे तिथे डांबून ठेवलंय. अशी पात्ररचना आणि घटनांच्या कार्यकारणभावाची रचना करण्याचे रचनात्मक स्वातंत्र्य चित्रपट दिग्दर्शकाला असतं. त्याचा ते पुरेपूर उपयोग करतात. आपल्याला मंडेला माहीत आहेतच, परंतु जे मंडेला क्लिंट ईस्टवूड या चित्रपटातून आपल्याला दाखवतात ते पाहून आपण चकित होतो, प्रभावित होतो. ही या माध्यमाच्या रचनेची ताकद आहे. तिचा पुरेपूर वापर क्लिंट ईस्टवूड करतात.

अंतर्गत यादवी, वर्णद्वेष, वांशिक हिंसा अशा वातावरणात देशाचे नेतृत्व करणार्या मंडेलांनी सहज एका खेळाच्या माध्यमातून त्या देशाला वर्णद्वेषाच्या, हिंसाचाराच्या गर्तेतून बाहेर काढले. स्थिरता आणि शांततेतून विकासाकडे नेत नवी मूल्यव्यवस्था निर्माण केलेला देश घडवला. त्यासाठी प्रोपगंडाचा सकारात्मक वापर केला. यातून मंडेलांचे महानपण हा चित्रपट सिद्ध करतो. हा प्रवास पाहताना आपण विलक्षण प्रभावित होतो. त्यासोबतच आपल्या देशातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहून वाईटही वाटत राहतं. सध्या जे विद्वेषाचे वारे सर्वत्र वाहत आहेत त्यातून मंडेलांसारख्या नेतृत्वाची गरज कायम भासत राहते. मंडेलांचे सर्वसमावेशक राजकीय विचार, नेतृत्वगुण आणि ठाम, पण संयमी व्यक्तिमत्त्व यापुढे आताचे आपल्या देशातील नेतृत्व फारच खुजे वाटते.
- प्रा. संदीप गिऱ्हे
(संदीप गिऱ्हे हे, अहमदनगर येथील संज्ञापन अभ्यास विभाग, न्यू आर्ट्स, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेजमध्ये डिजिटल फिल्म मेकिंग या विषयाचे अध्ययन आणि अध्यापन करत असून जागतिक सिनेमा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे.)

गो. मा. पवार : अभिरुचीचे भाष्यकार


दोनेएक आठवड्यांपूर्वी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे चिरंजीव प्रतापराव शिंदे यांच्या पत्नी लक्ष्मीबाई शिंदे यांचे हस्तलिखित वाचत होतो. त्या गो. मा. पवार सरांच्या सासूबाई. हस्तलिखिताच्या तपशिलाबाबत सरांना फोन केला. त्यांना उत्साह वाटला. दोन-तीन दिवसांनी ये म्हणाले. आपण सलग वाचून संपवूयात, म्हटले. त्याच दिवशी रात्री सरांना पक्षाघाताचा सौम्य धक्का आला आणि सर इस्पितळात दाखल झाले. आयसीयूमध्ये होते. नाकाला मास्क. तरीही बोलायची अनावर इच्छा; परंतु बोलता येत नव्हते. डोळ्यांच्या खुणावाटे घरी जाण्याची इच्छा व्यक्त करत होते. त्यांच्या चेहर्यावर पहिल्यांदाच इतकी हतबलता पाहत होतो. ध्वनीच जिथे गोठले, तिथे डोळ्यांचे काम चालेना. खूप काही सांगायचे होते. शरीर बांधलेले, परंतु ते बाहेर फेकत होते. खुणांनी कागद आणि पेन मागितला. हातांना कंप होता. पेनाने दोन-तीन वेळा त्यांनी काही तरी लिहिण्याचा प्रयत्न केला. एरवी अतिशय ठाशीवपणे कागदावर शब्द उमटविणार्या सरांना पेन आणि कागद दगा देत होता. जिवाच्या आकांताने लिहिण्याचा प्रयत्न करत होते; परंतु कागदावरून हात घरंगळत होता. असंबद्ध नागमोडी, वेडीवाकड्या रेषा, अक्षरांचे ठसे तेवढे उमटले. अर्थसंवाद तुटलेला. लौकिकाचा संबंध संथपणे संपवत  आल्यासारखी त्यांची भावस्थिती होती..

सोलापूरजवळील मोहोळ तालुक्यातील सीना नदीकाठचे नरखेड हे सरांचे गाव. वडील शिक्षक. एकत्र कुटुंब. वडिलांना आयुर्वेदाचे ज्ञान. लोकसंग्रह भरपूर. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सरांवर मोठा प्रभाव होता. पाचवीनंतर लहान भावंडासह सर सोलापुरात शिक्षणासाठी आले. हरिभाई देवकरण प्रशालेत त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले. विनोदाची त्यांना लहानपणापासून आवड होती. सातवीत असतानासोलापूर समाचारमधून त्यांचे विनोदी चुटके प्रसिद्ध झाले. शाळेतील त्यांच्या कविता ऐकून द. रा. बेंद्रे यांनीपवार कविरायअसा उल्लेख केला होता. पुढे महाविद्यालयीन काळात त्यांच्या कवितावसंत’, ‘चेतनाया नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते पुण्यात गेले. एस. पी. कॉलेज व पुणे विद्यापीठातून बी.. व एम.. झाले. पु. . सहस्रबुद्धे, रा. श्री. जोग, रा. शं. वाळिंबे हे त्यांचे शिक्षक. एम..नंतर एखाद् वर्ष त्यांनी पुणे महापालिकेच्या जकात नाक्यावर लेखनिक म्हणून नोकरी केली. पन्नालाल सुराणा, सरोजिनी वैद्य, . वा. कुलकर्णी, वसंतराव बिडवे हे त्यांचे महाविद्यालयीन सहअध्यायी.

अमरावतीहून औरंगाबादच्या शासकीय आणि नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सर प्राध्यापक म्हणून रुजू झाले. औरंगाबादचा 19 वर्षांचा कार्यकाळ त्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा ठरला. अनंत भालेराव, भगवंतराव देशमुख, वा. . कुलकर्णी, नरेन्द्र चपळगावकर, भालचंद्र नेमाडे, सुधीर रसाळ.. ते पुढच्या पिढीतील विद्यार्थी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, चंद्रशेखर जहागीरदार, रवींद्र किंबहुने, भास्कर चंदनशिव अशा अनेकांशी आयुष्यभराचा स्नेह मराठवाड्यातच जुळला. मराठवाडा साहित्य परिषदेचे सरचिटणीस म्हणूनही सरांनी काम केले. वा. . कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखालीविनोदाचा औपपत्तिक विचारया विषयावर पीएच.डी. संपादन केली. त्यांच्या पीएच.डी. प्रबंधाचे परीक्षक होते डॉ. वि. भि. कोलते आणि पु. . देशपांडे!

1979 साली गो. मा. पवार सर शिवाजी विद्यापीठात नव्यानेच सुरू झालेल्या मराठी विभागाचे प्रमुख आणि प्राध्यापक म्हणून रुजू झाले. कोल्हापुरातील पंधराएक वर्षांच्या काळात त्यांनी हा विभाग नावारूपाला आणला. भाषा-साहित्याविषयीचे अनेक उपक्रम राबविले. साहित्याच्या सामाजिक दृष्टीने अभ्यासाची रुजुवात त्यांच्यामुळेच झाली. भालचंद्र नेमाडे, व्यंकटेश माडगूळकर, भाऊ पाध्ये, बाबुराव बागूल, यू. आर. अनंतमूर्ती, कमल देसाई, दि. पु. चित्रे यांसारख्या नामवंत मंडळींना सरांनी अभ्यागत फेलो म्हणून आमंत्रित केले. ‘मराठी साहित्य : प्रेरणा व स्वरूपहे त्यांनी घेतलेले चर्चासत्र तर महत्त्वपूर्ण ठरले. प्रा. . सु. पाटील यांच्या शब्दांत सांगायचे तर, ‘असे चर्चासत्र पुन्हा होणे नाही.’ या चर्चासत्रातील विचारांनी आधुनिक मराठी साहित्यचर्चेला नवे वळण मिळाले. साहित्य संशोधनाच्या क्षेत्रात सरांच्या अनेक विद्यार्थ्यांनी लौकिक मिळवला. एका चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी म. . हातकणंगलेकर म्हणाले होते, ‘संगीतात जशी घराणी असतात, तसे पवारांनी मराठी ज्ञानपरंपरेत आपले स्वत:चे एक घराणे विद्यार्थीरूपाने सुरू केले आहे.’ हे एका अर्थाने खरेच आहे. निवृत्तीनंतर पवार सर सोलापूर येथे स्थायिक झाले. अखेरपर्यंत लेखनकार्यात रममाण होते.

समाज प्रबोधन संस्थेसाठी लिहिलेलेविवेकनिष्ठ जीवनदृष्टी’ (1966) हे सरांचे पहिले पुस्तक. मानवी स्वातंत्र्याची इच्छा, समतेची जाणीव आणि भ्रातृभावाची भावना ही विवेकाशी निगडित असते, हे त्यांनी त्यात मांडले. त्यांचे आरंभिक लेखन हे अध्यापनाच्या गरजेतून निर्माण झालेले होते. ‘साहित्यमूल्य आणि अभिरुचीया संग्रहात त्यांचे प्रारंभिक लेखन समाविष्ट आहे. प्रस्थापित लेखकांच्या लोकप्रियतेचे दडपण त्यांच्यावर कधीच नसे. त्यामुळेच श्री. ना. पेंडसे, पु. . देशपांडे आणि वसंत कानेटकर यांचे साहित्य स्वप्नरंजनपर, एकसुरी व वाचकानुनय करणारे आहे, असा परखड विचार ते मांडू शकले.

गो. मा. पवार हे नेहमीच आधुनिक साहित्याचे पुरस्कर्ते राहिले. सकस, गुणवान लेखनाचे सामर्थ्यस्थळ तेवढ्याच हिरिरीने ते मांडत. रूढ वाटा टाळून लेखन करणार्या भालचंद्र नेमाडे, भाऊ पाध्ये, चारुता सागर, बाबूराव बागूल आदी लेखकांच्या साहित्यासंबंधी नवा विचार त्यांनी मांडला. भाऊ पाध्ये यांच्या लेखनातील नवनैतिकतेचे स्वरूप, मध्यमवर्गाचे खरेखुरे अंतर्भेदी चित्रण आणि शैलीतील अनुत्कटचे स्वरूप त्यांनी उलगडून दाखवले. सत्तर-ऐंशीच्या दशकातील वाङ्मयीन चळवळीचे ते समानधर्मी राहिले. वाङ्मयविषयक खुला आणि व्यापक दृष्टिकोन त्यांच्या लेखनात होता. त्यांनी नेहमीच गुणसंपन्न साहित्याची दखल घेतली. ग्रामीण संवेदनशीलतेसंबंधी व साहित्याच्या समाजशास्त्रासंबंधीचा मूलभूत विचार सरांनी मांडला. लेखकाची घडण, त्याचा मनपिंड, परिसर भूगोल आणि रूपतत्त्वे यातली मौलिकता त्यांनी स्पष्ट केली. बदलते जीवनभान आणि साहित्य यांतल्या परस्परनात्याचा शोध घेत साहित्याविषयीचे नवे आकलन त्यांनी मांडले. मराठीतल्या अनेक महत्त्वाच्या लेखकांची स्थाननिश्चिती केली. गंगाधर गाडगीळांच्या विनोदात्मक लेखनाचा आवाका तसेच व्यंकटेश माडगूळकरांच्या कथेतील दलित विद्रोही जाणिवेचे रूपदर्शन व देशीयतेची सखोल मीमांसा सरांनी केली आहे.

त्यांच्या सबंध लेखनात अभिरुचिविचाशला केंद्रीय स्थान आहे. लेखक आणि वाचकपक्षी असणार्या दुहेरी स्वरूपाच्या अभिरुचीचा विचार त्यांच्या बव्हंशी लेखनात आहे. वाङ्मयीन संस्कृतीतील अभिरुचिद्वंद्वाचे ध्वनी सतत त्यांच्या लेखनात आहेत. अभिरुचीतले खाचखळगे, संघर्ष आणि टकरावाची सखोल मीमांसा त्यांनी केली. समूह-अभिरुचीला शरण जाणारे लेखक आणि नवी अभिरुची घडवणारे लेखक यांच्यातल्या आंतरसंबंधाचे सुस्पष्ट असे चित्र त्यांच्या समीक्षेत आहे. अभिरुचिसंघर्षाचे मूळ बदलत्या सामाजिक-सांस्कृतिक वातावरणात व बदलत्या वाङ्मयविषयक जाणिवांत असल्याचे ते नमूद करतात. एका अर्थाने या काळातील मराठी वाचनसंस्कृतीचा नकाशा सुसंगतपणे त्यांच्या लेखनात आहे. ज्या काळात वर्णनपर, आस्वादपर समीक्षेची मराठीत लाट होती, त्या काळात साहित्यस्वरूपाचे मर्म ते व्यापक सामाजिक, सांस्कृतिक परिप्रेक्ष्यात उलगडून दाखवत होते. यामागे सरांची जीवनसंबद्ध भूमिका होतीच, पण त्यांचा साहित्याकलनाचा पेसही व्यापक होता.

मराठी तसेच भारतीय साहित्यात अपवादभूत ठरावे अशी त्यांची विनोदी वाङ्मयाची समीक्षा आहे. विनोदी वाङ्मयाची निर्मिती ते तिच्या स्वरूपासंबंधी त्यांनी विचार मांडला. विनोदात्मक वाङ्मयासंबंधी सैद्धान्तिक व उपयोजित लेखन केले. ‘विनोद : तत्त्व आणि स्वरूपआणिमराठी विनोद : विविध आविष्कार रूपेहे त्यांचे या विषयावरील महत्त्वाचे ग्रंथ. पाश्चात्त्य व भारतीय विनोद मीमांसेची वाट पुसत त्यांनी स्वत:चा नवा विचार मांडला. संकल्पनात्मक मांडणी तसेच मराठी विनोदी वाङ्मय परंपरा अधोरेखित केली. चक्रधर, संत तुकाराम, महर्षी शिंदे, चिं. वि. जोशी, पु. . देशपांडे, गंगाधर गाडगीळ ते राम नगरकरांच्या व एकंदरीत मराठी विनोदी वाङ्मय परंपरेचे स्वरूप निश्चित केले. चिं. वि. जोशी यांच्या साहित्यातील व्यापक समाज-संस्कृती चित्रणामुळे त्यांचा त्यांनी कादंबरीकार म्हणून केलेला उल्लेख महत्त्वाचा ठरतो.

महर्षी शिंदे यांच्या जीवनकार्याचा शोध हा सरांच्या संशोधनकार्यातील महत्त्वाचा टप्पा होय. त्यांच्यामुळे महर्षी शिंदे यांचे अप्रकाशित वाङ्मय उजेडात आले. महर्षींच्या कार्याविषयी जवळपास दहाहून अधिक ग्रंथ त्यांनी लिहिले. त्यासाठी अफाट आणि अचंबित करणारी संदर्भसाधने मिळवली. महर्षींच्या अनेक डायर्या, पत्रे, तत्कालीन वृत्तपत्रे, अहवाल, दुर्मीळ कागदपत्रे मिळवली. तौलनिक धर्मशास्त्राच्या अध्ययनासाठी महर्षी मँचेस्टर कॉलेज, ऑक्सफर्डला होते. पवार सर तिथे गेले. ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्यहा जवळपास सातशे पृष्ठांचा चरित्रग्रंथ सरांनी लिहिला. महर्षींच्या जीवनचरित्राबरोबर त्यांच्या कार्याचे असंख्य पैलू, धागेदोरे साधार उलगडून दाखवले. त्यामुळेच समाजसुधारकांबरोबर साक्षेपी विचारवंत, संशोधक, भाषाशास्त्रज्ञ व गुणसंपन्न लेखक म्हणून महर्षींच्या कार्याकडे महाराष्ट्राचे लक्ष वेधले गेले. प्रा. राम बापट यांनी या चरित्राबद्दल म्हटले आहे की, ‘महर्षींचे एवढे सविस्तर, सांगोपांग, समतोल, गौरवपर, त्याच वेळी तटस्थ आणि अस्सल साधनांवर आधारलेले हे मराठीतले पहिलेच चरित्र आहे.’ महर्षींच्या कार्याची थोरवी मांडत असताना महर्षींच्या व्यक्तिमत्त्वाचा, अंतरंग-भावदर्शनाचा खोलवरचा ठसा स्वाभाविकपणेच पवार सरांच्या जीवनदृष्टीवर पडला.

त्यांचे व्यक्तीविषयक लेखनसुहृद आणि संस्मरणेया लेखसंग्रहात समाविष्ट आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाला उंची प्राप्त होत असते व्यक्तींच्या कार्यामुळे, असे त्यांचे मत होते. मानवी संबंधातील हृदय अनुभवांनी स्वत:ला संपन्न केल्याची धन्यता त्यांच्या मनात निरंतर वसत असे. त्यामुळेच वडीलधार्या भगवंतराव देशमुख वा वा.. कुळकर्णी यांच्यावर जेवढ्या प्रेमभावाने ते लिहितात तेवढेच आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या रमेश ढावरे या सहकार्यावरनिरागस अंत:करणाचा जिव्हाळ्याचा सहकारीअसा लेख लिहितात. भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्यातील गुणवत्ता आणि सौंदर्यनिर्माणक परिकल्पना सांगण्याबरोबरच नेमाडे यांचेरात्रीच्या प्रहरी नीरव शांततेत त्यांचे सर्जनकार्य चालू असते आणि त्याचा त्यांच्या आनंदाचा स्रोत त्यांच्या अंत:करणात दडलेला असतोहेही ते आवर्जून नमूद करतात. त्यांच्या पत्नी सौ. सुजाता माई या महर्षींच्या नात. याचा त्यांना फार अभिमान आणि धन्यता वाटे. सुधीर रसाळ यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचेनवनीतमृदू आणि वज्रकठोर मित्रअसे केलेले वर्णन सार्थ असेच आहे.

जीवनातील प्रत्येक अवस्था ही आनंददायक असते. तसेच जीवन हे आनंदाने तुडुंब भरलेले आहे, हा अनुभव आपण पूर्ण क्षमतेने घ्यायला पाहिजे व त्यास अनुरूप अशी आपली मनोवृत्ती असली पाहिजे, या भूमिकेतून ते जीवनाकडे पाहत. व्यवसायावरची अपार निष्ठा, अखंड ज्ञानसाधना, मानवी नात्यांनी आलेली समृद्धता त्यांना महत्त्वाची वाटे. बौद्ध तत्त्वज्ञानातील ब्रह्मविहारातीलमुदिता’ (इतरांच्या सुखाने आनंद होणे.) या तत्त्वाचा अखंड ध्यास त्यांच्या मनात वसे. साक्षेपी समीक्षक, महर्षी शिंदे यांच्या जीवनकार्याचे  अभ्यासक आणि तळमळीच्या विद्यार्थिप्रिय शिक्षकाला महाराष्ट्र मुकला आहे.
- रणधीर शिंदे
(सौजन्य लोकसत्ता)

मराठी माणसांची ‘पुरोगामी’ प्रतिबिंबे


कादंबरीमधून मराठी समाजाला पडणारे प्रश्न हाताळण्याचा प्रयत्न अगदी कमी लेखक करतात. म्हटले तर तो खास मध्यमवर्गीय साहित्याला मारलेला जोराचा फटकाच, कारण बहुतांश कादंबर्या समस्या अथवा पेच यांची उकल करायला धजत नाहीत. भूमिका घ्यावी लागणे हा लेखक म्हणून एक भयंकर प्रकार लेखकांना गार करत असतो. नोकरदार अन् व्यावसायिक कर्तव्य सांभाळीत मराठी समाजाचे प्रश्न मांडायचा प्रयत्न त्यांच्या अंगलट येऊ शकतो. त्यापेक्षा काही तरी आविर्भावात्मक मांडावे  अथवा जाता जाता स्पर्श करावा, अशा प्रकारचे लेखन मग बहरते. त्यात संशोधन, वाचन, अनुभव, कल्पनाशक्ती यांची टंचाई त्या लेखनाचे सौष्ठव काही ठसू देत नाही. सबब मराठी कादंबर्या विद्यमान राज्यकर्त्यांसारख्या बडबड्या, भाषणबाज अन् बोलक्याच जास्त. राकेश वानखेडे यांचीपुरोगामीही कादंबरी दलित चळवळीच्या निमित्ताने डावे कार्यकर्ते, परिवर्तन चाहणारे नेते यांची कशी फरफट झाली, याचा शोध घेण्याचा एक प्रयत्न करावे.

शुद्धोधन शिवशरण हा आंबेडकरी चळवळीतील एक नोकरदार कार्यकर्ता आपली कहाणी आपण स्वत: आणि आतला आवाज धनू यांच्या माध्यमातून आपल्या सांगत राहतो. आरंभी काही पृष्ठे मराठवाड्यातील आपली पाळेमुळे कशी आहेत, हे सांगता सांगता नायक शुद्धोधन कादंबरीचे मुख्य सूत्र उलगडतो. यशवंत बर्वे नामक साहित्यिकाच्या स्मारकासाठी ठिकठिकाणाहून जमवलेले 15 लाख रुपये शुद्धोधन कोषाध्यक्ष म्हणून खर्चतो आणि काही दिवसांनी लक्षात येते, की स्मारकासाठी निवडलेली जमीन व तिचा मालक ही सारी बनवाबनवी असते. केवळ साहित्यावर लुब्ध असलेला शुद्धोधन मुंबईतील फसवाफसवीच्या प्रचंड उलाढालीत सहज सापडतो. सारे कार्यकर्ते, सहानुभूतीदार, मित्र, समविचारी, सहप्रवासी त्याच्यावर संशय घेतात. त्याची यथेच्छ बदनामी सुरू होते. परतफेडीचीही स्थिती नसते. प्रत्यक्ष दोषी नाही; मात्र शंका, चारित्र्यहनन व आरोप यामुळे शुद्धोधन एकाकी पडतो. कोणी त्याला मदत करीत नाही. अशा अवस्थेत महाराष्ट्रातील तमाम डाव्या चळवळींची समीक्षा हा नायक  करत जातो. चर्चा आणि लेखन यांचा आधार घेत, अनेक मुद्द्यांचा ऊहापोह  करीत पुरोगामीस्वत:चा ठावठिकाणा घेत पुढे जातो.

शुद्धोधनचा आंतरजातीय विवाह आहे. कर्मठ ब्राह्मण घरातील तरुणी बौद्ध नायकाशी लग्न करते. ती बदलते, पण सून व मुलगा मुलांची नावे वेदान्त व वैदेही ठेवून त्यांना धक्का देतात. पुरोगामित्वाची चर्चा मग प्रत्येकाच्या घरापासून होते. पुढे ओबीसी, नेमाडेसर, विद्रोही साहित्यिक, आंबेडकरवादी साहित्य, पानतावणेसरांचेअस्मितादर्श’, पँथर चळवळ, ढसाळ अशा अनेक विषयांची चर्चा करीत ही कादंबरी वाचनीय ठरते. नक्षलवादावरही चार पाने तीत आहेत.

एका संधिसाधू, पथभ्रष्ट आणि प्रसिद्धिलंपट पात्रामधून शुद्धोधन दलित-आदिवासी संबंधांचाही ऊहापोह करतो. ‘आदिवासींनी कधी आंबेडकरवाद्यांना पाठिंबा दिला?’ असा एक प्रश्न मग नायकाला छळतो; पण हाच नायक विबळवाडा नावे गावातील जमिनीच्या लुटीचा प्रश्न समाजापुढे मांडतो आणि एक हिरोही बनतो.

अशा किती तरी राजकीय - सामाजिक घडामोडींनीपुरोगामीव्यवस्थित नोंद घेते, निर्भयपणे मतेही मांडते. ज्यांचे वय साठच्या आसपास असेल, त्यांना ही कादंबरी खूप ओळखीची वाटेल. लेखकाचे वय तेवढे नाही. तरीही त्याने मोठ्या मेहनतीने माहिती जमवत, इतिहास सांगत कादंबरी लिहून खूप मोठी उलाढाल केली आहे. म्हटले तर आत्मपरीक्षण, म्हटले तर परखड मीमांसा असे स्वरूप या कादंबरीस आले आहे. मात्र चर्चात्मक रूप पूर्ण न देता घटना, प्रसंग, वर्णने यातून लेखकाने रंगत वाढवली आहे. नायकाची पुतणी आदिवासी भागात जाऊन लढ्यात सामील होते, मार्क्सवादी तत्त्वज्ञानाजवळ जाते असे कथानक रचून लेखकाने नेमका संदेशही अखेरीस दिला आहे. शुद्धोधन एका आंदोलनानंतर तुरुंगात धाडला जातो. शेवटच्या पानावर कादंबरी सांगते, की त्याला 18 महिन्यांनंतरही जामीन मिळालेला नाही. त्याच्यावरडावेपणाचा आरोप झालेला आहे. कादंबरी कधी कधी पूर्वसूचना देत असते. कोरेगाव भीमा येथील आंदोलनानंतर असेच नाही का काही झाले?
- जयदेव डोळे
(लोकसत्ता-लोकरंग साभार)
पुरोगामी
राकेश वानखडे
किंमत 400 रु. / पाने 328

वर्षानुवर्षांच्या असहिष्णू काळात (कविता)


खूप दीर्घ
चालल्या नंतरही
हाती लागतायत सुकी पाने
रान तुडवत जाताना
माती कपाळाला लावून
उजळून घ्यावा म्हणतो माथा
कुणास ठाऊक
भोवतालच्या पिढीजात दु:खाच्या
आजन्म कारावासाची
वेदना सलत राहतानाच्या या दिवसात
भोवतालच अधिक हिंस्र होत जाताना
मातीचीही संवेदनशीलता
हरवून बसण्याची शक्यता नाकारता येत नाही
या अविश्वासाच्या दिवसात
ठेवता आला नाही विश्वास नशिबावर
नाही तर या वर्षानुवर्षांच्या असहिष्णू काळात
बांधता आलेही असते स्वप्नांचे मजले
खोटे जगणे यथार्थ यशस्वी केल्याचे
आणि पापपुण्याच्या भाकड कथा सांगत
गाता आली असतीही गाथा
कदाचित इंद्रायनीत गाथा बुडाल्याचे सांगत
आम्हीही धर्ममार्तंड होण्यासाठी
रचली असती नवी कहाणी
कोणत्याही काळात असहिष्णुतेला इथूनच तर प्रारंभ होतो
आणि जात-धर्माच्या मुक्तीची
भाषा बोलता बोलता
त्याचाच तर दोरखंड अधिक घट्ट बांधला जातो!

- अजय कांडर

(कवी अजय कांडर हे मराठीतील नवदोत्तर पिढीतील महत्त्वाचे कवी आहेत. कोणत्याही कवीची राजकीय समज हीच त्याची समाजातील बहुसांस्कृतिकता टिकविण्याची समज ठरत असते. त्यांच्या कवितेत याचीच प्रचीती येते. इथे प्रसिद्ध होत असलेल्या या कविताही त्याला अपवाद नाहीत. कांडर यांची 2012 मध्ये प्रसिद्ध झालेलीहत्ती इलोही बहुचर्चित दीर्घ राजकीय कविता हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. त्यांचाआवानओलहा पहिला काव्यसंग्रह 2005 साली प्रसिद्ध झाला. त्याला महाराष्ट्र फाऊंडेशनसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाले. अनेक विद्यापीठ, शालेय अभ्यासक्रमामध्ये त्यातील कवितांचा समावेश होतानाच त्या इंग्रजी, हिंदी, मल्याळम, उर्दू आदी भाषांमध्ये भाषांतरित झाल्या.)

एवढ्या लवकर (कविता)


नीरव शांततेत
नकळत यावी वार्याची झुळूक
तसा घडतो आहे एखादाच संवाद
खूप दूर चालून वाटा तुडवल्यानंतरही
अपघातानेच सापडावी
आपल्याला हवी ती वाट
तसा एखादाच भेटतोय जिवाभावाचा माणूसही
दिवसा उजेडा शोधूनही दिसून येऊ नये
आपल्या पायाखालचा चमचमता काचेचा तुकडा
तसा आयुष्यभर आपण
ज्याला जीव लावला
त्याच्याच डोळ्यातून निसटून जातो आहे
आपल्याबद्दलचा ओल्याव्याचा प्रकाश
आता
एवढी खंत तर राहीलच
चालताना पुढील दीर्घ प्रवास
प्रयत्न करूनही
अंधाराच्या राशी उघडता आल्या नाहीत
म्हणून सगळीकडेच अंधार आहे
असे अजिबात समजू नये
पण कधीच कसं लक्षात आलं नाही
माणूस अंधाराकडे जाण्याच्या वाटा
शोधू लागेल एवढ्या लवकर आपल्या आत!

- अजय कांडर

(कवी अजय कांडर हे मराठीतील नवदोत्तर पिढीतील महत्त्वाचे कवी आहेत. कोणत्याही कवीची राजकीय समज हीच त्याची समाजातील बहुसांस्कृतिकता टिकविण्याची समज ठरत असते. त्यांच्या कवितेत याचीच प्रचीती येते. इथे प्रसिद्ध होत असलेल्या या कविताही त्याला अपवाद नाहीत. कांडर यांची 2012 मध्ये प्रसिद्ध झालेलीहत्ती इलोही बहुचर्चित दीर्घ राजकीय कविता हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. त्यांचाआवानओलहा पहिला काव्यसंग्रह 2005 साली प्रसिद्ध झाला. त्याला महाराष्ट्र फाऊंडेशनसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाले. अनेक विद्यापीठ, शालेय अभ्यासक्रमामध्ये त्यातील कवितांचा समावेश होतानाच त्या इंग्रजी, हिंदी, मल्याळम, उर्दू आदी भाषांमध्ये भाषांतरित झाल्या.)

सर्वकालीन प्रार्थनेचा स्वर (कविता)


दु:खाला
आपलंसं करून चालणार्यांच्या हृदयात
कायमच वसलेली असते एक वाहती नदी
वेदनेचा कोणता झरा
सतत त्यांच्यात पाझरत असतो
हे नसते माहीत
तरीही निर्वासिताची
सलती वेदना घेऊन भटकणार्यांच्याही
चेहर्यावर स्थैर्याचे भाव दिसून येतात
तेव्हा त्यांच्यासाठी जोडले जावू नयेत हात कधीही
फक्त भूमिहीन होण्यानंतरही त्यांच्यात वाढत जाणार्या
सहृदयी भावनेत आपल्याही भावनांची वाहू द्यावी नदी
आईच्या पान्ह्याची कदर न राखताही
गुराढोरांना, पशुपक्ष्यांना मातेसमान माना म्हणत
जे देतायत सूचक इशारे
त्यांच्या साध्या करड्या नजरेनेही भयभीत होऊन
जे सोडू पाहताय आपली भूमी
त्यांच्याही शब्दात सापडत जातेय सद्भावनेची आर्तता
खरं तर माणसाच्या दु:खाची वेदनाच
सुखाच्या निर्मितीचा क्षण अनुभवत असते तहहयात
म्हणूनच तर
दलित-पददलितांच्या स्पर्श अस्पर्शतेच्या
विद्रोहातून निर्माण होत असतो
माणसाच्या समतेचा जन्म
शोषित, वंचितांच्या सहवासातून शोधता येतायत दु:खाची मुळे
अखेर
दु:खाच्या खपल्या वाढत जाणार्या
अंत:करणातूनच तर ना
निनादत राहतोय सर्वकालीन प्रार्थनेचा स्वर
माणसाच्या असण्यासाठी!

- अजय कांडर

(कवी अजय कांडर हे मराठीतील नवदोत्तर पिढीतील महत्त्वाचे कवी आहेत. कोणत्याही कवीची राजकीय समज हीच त्याची समाजातील बहुसांस्कृतिकता टिकविण्याची समज ठरत असते. त्यांच्या कवितेत याचीच प्रचीती येते. इथे प्रसिद्ध होत असलेल्या या कविताही त्याला अपवाद नाहीत. कांडर यांची 2012 मध्ये प्रसिद्ध झालेलीहत्ती इलोही बहुचर्चित दीर्घ राजकीय कविता हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. त्यांचाआवानओलहा पहिला काव्यसंग्रह 2005 साली प्रसिद्ध झाला. त्याला महाराष्ट्र फाऊंडेशनसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाले. अनेक विद्यापीठ, शालेय अभ्यासक्रमामध्ये त्यातील कवितांचा समावेश होतानाच त्या इंग्रजी, हिंदी, मल्याळम, उर्दू आदी भाषांमध्ये भाषांतरित झाल्या.)

शाई (कविता)


लिखित शब्दाच्या शाईला
महत्त्व असतंच
म्हणूनच निळ्या, काळ्या शाईने
लिहिणार्यांना त्यांनी
काळाची शाई समजून घेण्याची
सरळ सरळ धमकीच दिली
कोणताही काळ असो
आमचं पेन
रक्ताच्याच शाईने माखलेलं असेल
हे मी आधी
ऐकलं होतंच
आता तर
रक्ताच्या शाईचा थेंबाथेंब
धर्मग्रंथाच्या पानावर.   

- अजय कांडर

(कवी अजय कांडर हे मराठीतील नवदोत्तर पिढीतील महत्त्वाचे कवी आहेत. कोणत्याही कवीची राजकीय समज हीच त्याची समाजातील बहुसांस्कृतिकता टिकविण्याची समज ठरत असते. त्यांच्या कवितेत याचीच प्रचीती येते. इथे प्रसिद्ध होत असलेल्या या कविताही त्याला अपवाद नाहीत. कांडर यांची 2012 मध्ये प्रसिद्ध झालेलीहत्ती इलोही बहुचर्चित दीर्घ राजकीय कविता हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. त्यांचाआवानओलहा पहिला काव्यसंग्रह 2005 साली प्रसिद्ध झाला. त्याला महाराष्ट्र फाऊंडेशनसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाले. अनेक विद्यापीठ, शालेय अभ्यासक्रमामध्ये त्यातील कवितांचा समावेश होतानाच त्या इंग्रजी, हिंदी, मल्याळम, उर्दू आदी भाषांमध्ये भाषांतरित झाल्या.)

अन्वयार्थ - भाग १, २, ३


सार्वजनिक विरुद्ध खासगी क्षेत्रे

5.1 ब्रिटनमध्ये चाळीस वर्षांनी एक वर्तुळ पूर्ण होतेय :

आपल्या देशात ज्या वेळी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाची मागणी केली जात आहे त्याच वेळी ब्रिटनमध्ये लंबक उजव्या टोकाकडून डावीकडे येण्यासाठी निघाला आहे. एक वर्तुळ पूर्ण होतेय. 1978च्या पुढे-मागे ब्रिटनच्या तेव्हाच्या पंतप्रधानआयर्न लेडीमार्गारेट थॅचर यांनी एकामागोमाग एक सार्वजनिक मालकीच्या उद्योगांचे खासगीकरण करण्यास सुरुवात केली. चाळीस वर्षांनंतर त्याच ब्रिटनमध्ये जीवनावश्यक पायाभूत सुविधा पुरवणार्या खासगी कंपन्यांचेपुनर्सार्वजनिककरणं करावे काय याबद्दल जोरदार चर्चा, त्यासाठी जनआंदोलने सुरू झाली आहेत.

उदा. लंडन ते एडिनबर्ग या प्रतिष्ठेच्या रेल्वेलाइनचे पुनर्राष्ट्रीयीकरण केले जात आहे. ब्रिटनमध्ये अलीकडेच घेतल्या गेलेल्या सर्व्हेप्रमाणे ऊर्जा, इंधन, गॅस या सेवा सार्वजनिक क्षेत्रातून देण्यात याव्यात, असा कौल एकचतुर्थांश नागरिकांनी दिला आहे.

विवेकी ग्राहक/ नागरिक : सामान्य नागरिक फक्त सहनशीलच नसतात तर विवेकी / रॅशनलदेखील असतात. ते विरोधासाठी विरोध करीत नाहीत. जर कोणी राजकीय नेता विरोधासाठी विरोध करीत असेल तर त्याला साथ देत नाहीत. सेवासुविधांच्या गुणवत्तेत सुखावह सुधारणा झाली तर ते वाढीव दर द्यायलादेखील तयार असतात; पण नळाला पाणीच येत नाहीये, हवा तसा दाब नाहीये आणि पाणीपट्टी वाढवली तर असंतोषाचा भडका उडतो.

कोणत्याही देशातील ग्राहक नेहमीच आपल्याशी व सामुदायिकपणे एक त्रैराशिक मांडून त्याचे उत्तर पडताळून बघत असतात. हे त्रैराशिक असते - () सेवांची गुणवत्ता, () वीज बिल, पाणी बिल, बस व रेल्वेची तिकिटे इत्यादी द्यावे लागणारे उपभोक्ता मूल्य (युजर चार्जेस;) आणि () कुटुंबाचे मासिक बजेट यातील समीकरण.

या तिन्ही बाबींमध्ये कमीजास्त संतुलित असेल तर सामान्य नागरिक काही गोष्टी सहन करतात. महागाई निर्देशांकाप्रमाणे मासिक वेतनात वाढ झाली तर त्यातील काही हिस्सा वाढीव वीज बिल व पाणी बिलात द्यायची त्यांची तयारी असते. कारण पाणी व वीज कंपनीलादेखील महागाईची झळ बसलेली असेल हे ते जाणतात; पण मासिक उत्पन्न वाढत नाहीये, पण पायाभूत क्षेत्राच्या सेवा महाग होत गेल्या की पाणी त्यांच्या नाकातोंडात जाऊ लागते. ते प्रतिक्रिया द्यावयास सुरुवात करतात.

ब्रिटनमध्ये पिण्याचे पाणी, वीज, सार्वजनिक वाहतूक रेल्वे यांच्या उपभोक्ता दरात (युजर चार्जेस) गेली अनेक दशके सातत्याने वाढ झाली. त्यामानाने मासिक उत्पन्नात वाढ झाली नाही. ब्रिटनमध्ये सामान्य नागरिकांच्या मनात अनेक वर्षे वसणारा हा असंतोष आता बाहेर येऊ पाहत आहे.

ब्रिटनमधील वाहणारे वारे : त्या भावनेला आवाज देत आहेत जेरेमी कॉर्बिन. ब्रिटनच्या मजूर पक्षात नव्याने जान फुंकणारे, तेथील तरुणांना जनकेंद्री राजकारणाकडे आकृष्ट करू शकणारे. यांच्या नेतृत्वाखाली कात टाकणार्या ब्रिटिश मजूर पक्षाने पुनर्सार्वजनिकीकरण (Re- Nationalization)  ची मागणी लावून धरली आहे.                                                                                                      

अलीकडच्या संसदीय निवडणुकांत कॉर्बिन यांच्या मजूर पक्षाने जोरदार मुसंडी मारली. अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळवल्या. कॉर्बिन यांच्या यशाचे विश्लेषण करताना अनेक सर्व्हेमध्ये हे पुढे येत आहे की, मानवी जीवनाला अत्यावश्यक असणार्या वीज, पाणी, ऊर्जा, सार्वजनिक वाहतूक या पायाभूत सुविधांचेपुनर्सार्वजनिकीकरणकरण्याच्या त्यांच्या इराद्यांना सामान्य नागरिकांचा पाठिंबा वाढत आहे. कॉर्बिन यांची मांडणी व त्या आधारित पुनर्राष्ट्रीयीकरणासारख्या मागण्या लोकांना अपील होत आहेत.

ऐतिहासिक न्याय : थॅचरबाईंना फक्त ब्रिटनमध्येच आर्थिक सुधारणा राबवण्याचे श्रेय नाही, तर अमेरिकेचे तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्या जोडीने त्यांनी नवउदारमतवादी आर्थिक तत्त्वज्ञानाचा जोरदार पुरस्कार केला. या नवीन आर्थिक तत्त्वज्ञानाच्या या दोघांच्या नेतृत्वाखाली उठवलेल्या लाटा जोमदार होत्या. पडद्यामागून जागतिक बँक, नाणेनिधी (आयएमएफ) व काही वर्षांनी जागतिक व्यापार संघटना (डब्ल्यूूटीओ) काम करीत होत्या. नंतरच्या काळात या लाटांनी जगभर प्रचंड धुमाकूळ घातला. ऐंशी-नव्वदीच्या दशकात भारतासकट अनेक गरीब, विकसनशील राष्ट्रांना विशिष्ट आर्थिक नीती आत्मसात करण्यास भाग पाडण्यात आले.

ब्रिटनमध्ये नाही तर अनेक देशांत या अत्यावश्यक पायाभूत सुविधांचे पुनर्सार्वजनिकीकरण होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आज नाही तर उद्या, उद्या नाहीतर परवा तर निश्चितच. हे तेव्हाच होईल व भविष्यात टिकेल ज्या वेळी एकविसाव्या शतकातीलसार्वजनिकमालकीचे उद्योग विसाव्या शतकापेक्षा निराळे असतील. हे तेव्हाच होईल ज्या वेळी सार्वजनिक क्षेत्रात काम करण्यास, त्या क्षेत्रात कामे करण्याची आव्हाने पेलण्यास शिकलेले तरुण प्रोफेशनल्स पुढे येतील.

5.2 नफा खासगी; तोटा मात्र सार्वजनिक !

कमी जोखीम आणि जास्त नफाहे तर खासगी भांडवलाचे लाइफ मिशनच आहे. नवउदारमतवादी आर्थिक विचार कोणताही आडपडदा न ठेवता खासगी क्षेत्राचा पुरस्कार करतो. मग प्रश्न असा विचारला पाहिजे की, ज्या राष्ट्रात नवउदारमतवादी आपले तत्त्वज्ञान पुढे रेटतात त्या राष्ट्रात जास्त जोखमीची व कमी नफा मिळणारी किंवा तोट्यातच जाणारी कामे कोणी करायची? त्याबद्दल नवउदारमतवादी बिनदिक्कतपणे सांगतात, ते तर सार्वजनिक क्षेत्राचे काम आहे.

भारतासारख्या देशाच्या अर्थव्यवस्थेत जास्त जोखीम व नफादेखील नसण्याच्या वेळा बर्याच वेळा येतात. देशातील गरिबांच्या प्रचंड संख्येमुळे व संसदीय लोकशाही अजूनही जिवंत असल्यामुळे सत्तेवर कोणताही राजकीय पक्ष आला तरी त्याला लोककल्याणकारी योजना प्रतीकात्मक का होईना राबवावयास लागतातच. उदा. जनधन योजना, मुद्रा, गॅस सिलिंडर इत्यादी. त्यासाठी अर्थसंकल्पीय तरतुदी कराव्या लागतात.

मोठी कॉर्पोरेट्स सार्वजनिक वित्तीय साधनसामग्रीवर ताण येण्यासाठी कारणीभूत ठरतात ती त्यांच्या राजकीय नेत्यांच्या साट्यालोट्याच्या संबंधांमुळे. त्यांच्या थकीत कर्जांमुळे, कंपन्यांच्या गैरव्यवस्थापनामुळे सार्वजनिक (बँका) व खासगी क्षेत्रातील (आयएलएफएस) मोठ्या बँका कोसळतात. सार्वजनिक पैसे वापरून त्यांना बेल आऊट करणे हे पूर्ण अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी अत्यावश्यक बनते.

वाईट याचे वाटते की, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम व त्यांची साधनसामग्री लोककल्याणासाठी कमी वापरली जाते. धनदांडग्यांनी व राजकारणी लोकांनी केलेल्या कृत्यांना निस्तरण्यासाठी जास्त वापरली जाते. त्या त्या काळातील सत्ताधार्यांच्या धोरणांच्या सोयीसाठी, आपल्या मिलीभगत कॉर्पोरेट्सना गैरमार्गाने कोट्यवधींचा मलिदा मिळवून देण्यासाठी जास्त वापरली जाते. मग ते सत्ताधारी यूपीएचे असोत नाही तर एनडीएचे. काँग्रेसचे असोत नाही तर भाजपचे.

सार्वजनिक कंपन्या; आघाडीवरचे सैनिक : ज्या ज्या वेळी अर्थव्यवस्था संकटात असेल, देशातील गरिबांसाठीच्या लोककल्याणाच्या योजना राबवायच्या असतील, सरकारला अर्थसंकल्पीय तूट भरून काढायची असेल, शेअर बाजार अधिक कोसळू नये म्हणून हस्तक्षेप करायचा असेल, तर आघाडीवरच्या सैनिकासारखे कोणाला पाठवले जाते? तर सार्वजनिक उपक्रमांना!

अलीकडच्या काळातील खालील उदाहरणे बघू या ज्यात सार्वजनिक उपक्रमांना हजारो, लाखो कोटी रुपयांच्या रकमा गुंतवण्यास सांगितले गेले.

* 2008च्या जागतिक अरिष्टात भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सार्वजनिक बँकांना पुढाकार घेण्यास लावले त्यामुळे पायाभूत क्षेत्रातील मोठ्या प्रकल्पांना मोठी कर्जे दिली; जी आज अनुत्पादक/एनपीए बनून त्यांच्या मानगुटीवर बसली आहेत. त्यामुळे सार्वजनिक बँकांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.

* ओएनजीसीला एचपीसीएलमधील भारत सरकारचे 51 भागभांडवल घेण्यास लावले, की ज्यामुळे सरकारची अर्थसंकल्पीय तूट अंशत: भरून निघेल.

* एलआयसीला सार्वजनिक क्षेत्रातील आयडीबीआय बँकेला आणि खासगी क्षेत्रातील आयएलएफएसला बेल आऊट करायला लावण्यात आले.

* आयएलएफएसच्या अरिष्टानंतर अनेक एनबीएफसी कंपन्या घायकुतीला आल्या होत्या. त्यांना एसबीआयने बेल आऊट केले.

* वीजनिर्मिती करणार्या खासगी क्षेत्रातील आजारी कंपन्यांना एनटीपीसी (NTPC)च्या गळ्यात मारण्याच्या चर्चा आहेत.

या सगळ्यांसाठी वित्तीय किंमत मोजावी लागते. त्यातून नफ्यात चालणार्या सार्वजनिक कंपन्या तोट्यात जातात, त्यांचा ताळेबंद बिघडतो. खालील एकाच उदाहरणावरून हा मुद्दा लक्षात येईल.

पंतप्रधान जनधन योजनेतील 95 टक्के खाती (जवळपास 30 कोटी), जी धंदा करण्यासाठी खासगी बँकांना अनाकर्षक आहेत, सार्वजनिक बँकांनी उघडली होती. ती उघडताना आलेला खर्च, ती खाती सांभाळताना येणारा खर्च सार्वजनिक बँकांनी सोसला आहे. ही खाती शून्य ठेवीची (झिरो बॅलन्स) खाती आहेत. खासगी बँका मात्र कमीत कमी बॅलन्स 10,000 रुपये पाहिजे म्हणून अट घालणार, त्यावर व्याज कमावणार, छोट्या खातेदारांना दरवाजाबाहेर ठेवणार. वर आम्ही किती नफा कमावला, तुम्हाला किती तोटा झाला म्हणून सार्वजनिक बँकांना हिणवणार.

नवउदारमतवादाचा अप्रामाणिकपणा : स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या 70 वर्षांत सार्वजनिक उपक्रमांनी देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी नक्की काय केले याची यादी केली तर त्यासाठी अनेक पाने खर्ची पडतील. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम देशाप्रति कर्तव्य निभावतील, पण त्यांना वित्तीयदृष्ट्या सक्षम तर करा, त्यांच्या व्यवस्थापनाला निर्णयस्वातंत्र्य तरी द्या, त्यांच्या पायात बांधलेल्या साखळ्या काढा! त्याबद्दल नवउदारमतवाद एक शब्ददेखील बोलत नाही.

गेली 25 वर्षे ज्या नवउदारमतवादी आर्थिक तत्त्वज्ञानाने देशाची आर्थिक धोरणे ठरवताना वर्चस्व गाजवले, त्याने सार्वजनिक उपक्रमांना सापत्न वागणूक दिली आहे. सार्वजनिक क्षेत्राची बदनामी करण्याची एकही संधी सोडलेली नाही. ‘सार्वजनिक क्षेत्र चांगले का खासगी क्षेत्र चांगलेअशा वादातून सामान्य नागरिकांचा बुद्धिभेद केला गेला.

5.3 परदेशी भांडवल व मेक इन इंडिया

आपल्या देशात सर्वच पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये (इन्फ्रास्ट्रक्चर) मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीची गरज आहे. सर्वच पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर) प्रकल्प अतिशय भांडवल सघन (capital intensive) असतात. साहजिकच देशाला या क्षेत्रासाठी प्रचंड भांडवलाची गरज आहे. एका अंदाजानुसार यासाठी देशाला पुढच्या काही वर्षांत 70 लाख कोटी रुपये लागणार आहेत.

पायाभूत सुविधा क्षेत्राचा एक भाग आहे नागरी सार्वजनिक वाहतूक क्षेत्र. देशात नऊ शहरांत सध्या मेट्रो रेल्वे धावत आहे; (मुंबईसह) पाच शहरांत कामे चालू आहेत आणि अजून 20 ते 30 शहरांत प्रकल्प विविध अवस्थांत आहेत. या मेट्रोच्या प्रकल्पासाठी 5 लाख कोटी रुपये लागतील असा अंदाज आहे.

असे हजारो-लाखो कोटी भांडवल लागणारे प्रकल्प उभारण्यासाठी एक तर देशांतर्गत अर्थसंकल्पीय तरतुदी कराव्या लागतील नाही तर देशाच्या बाहेरून पैसे उभे करावे लागतील. आपल्या केंद्र व राज्य सरकारांच्या अर्थसंकल्पाचे आकार बघितले की कळते, की बाहेरच्या स्रोतांकडून पैसे उभारणे टाळता येणारे नाही.

देशाच्या बाहेरचे स्रोत प्रामुख्याने दोन प्रकारचे असतात (एक) जागतिक बँक, आशियाई विकास बँक, चीनच्या अखत्यारीतील एआयआयबी अशा विकास संस्था किंवा परकीय सरकारकडून द्विपक्षीय मदत इत्यादी. (दोन) परकीय गुंतवणूकदार (भागभांडवल व कर्ज पुरवणारे).

जागतिक भांडवल आपल्या देशात यायला तयार आहे; पण हे व्यवहार वरकरणी वाटतात तेवढे सरळ व्यापारी नसतात. त्यात भांडवल पुरवणार्यांचा छुपा अजेंडा असतो. आपल्याला देशातील मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राला प्रोत्साहनदेखील द्यायचे आहे. त्यासाठी आपणमेक इन इंडियासारख्या घोषणादेखील केल्या आहेत. आपला हा कार्यक्रम व जागतिक भांडवलाचा भांडवल पुरवठा करतानाचा अजेंडा एकमेकांना छेद देणारे आहेत. कारण जागतिक भांडवलाला आपण त्यांच्याकडून भांडवलाबरोबर विविध मशिनरी, कमोडिटीजदेखील आयात कराव्यात अशी इच्छा आहे. मेट्रो रेल्वेच्या प्रकल्पातून हे नाट्यमयरीत्या पुढे येत आहे.

मेक इन इंडिया व मेट्रो प्रकल्प : भारताचे ठोकळ उत्पादन बर्यापैकी वाढत असले तरी त्यातील औद्योगिक क्षेत्राचा वाटा फार वाढत नाहीये. त्यासाठी केंद्र सरकारनेमेक इन इंडियाही योजना बनवली ज्यातून देशातील औद्योगिक क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे ठरले.

मेक इन इंडियाचे स्पिरिट लक्षात ठेवून केंद्र सरकारच्या नगर विकास मंत्रालयाने एक फतवा काढला की, ज्या शहरात मेट्रो प्रकल्प प्रस्तावित आहे त्यातील 75 टक्के डबे देशी बनावटीचे असले पाहिजेत. हा फतवा सरसकट सर्व शहरांना लागू नव्हता. अहमदाबाद व नागपूर या शहरांना जाचक अटींतून आधीच वगळण्यात आले होते. (ती आपल्या पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांची शहरे आहेत हा योगायोग समजावा.)

मेक इन इंडियामागील हेतू चांगला आहे, नगर विकास मंत्रालयाने काढलेला फतवा सुहेतूने काढला हे सगळे खरे; पण योजना राबवण्यासाठी देश म्हणून कोणतीही पूर्वतयारी न करता योजना आखल्या की काय होऊ शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील आर्थिक शक्ती कशा हात पिरगाळू शकतात हे लक्षात घेतले नाही तर काय होते ते समोर येत आहे.

मुंबईतील मेट्रोसाठी आशियाई विकास बँक मोठ्या प्रमाणावर कर्जाऊ पैसे देत आहे. आंतरराष्ट्रीयीकरणाला कटिबद्ध असणार्या आशियाई विकास बँकेने या असल्यासंकुचित’(!) राष्ट्रहित पाहणार्यामेक इन इंडियाच्या फतव्याला विरोध केला. आमच्याकडून आर्थिक साहाय्य हवे असेल तर मेट्रोसाठी लागणार्या डब्यांची बाहेरून मुक्त आयात करण्यास परवानगी द्यावीच लागेल, असे ठणकावून सांगितले.

या सगळ्यातून आता तोमेक इन इंडियावाला फतवा एका एका मेट्रो प्रकल्पांसाठी मागे घेण्यात येत आहे. हे फक्त मेट्रो प्रकल्पांसाठीच होत आहे असे नव्हे, तर इतर अनेक पायाभूत सुविधांसाठी, संरक्षण सामग्रीसाठी भविष्यात होऊ शकते म्हणून याचे अन्वयार्थ लावले पाहिजेत.

पायाभूत सुविधा, संरक्षण सामग्री, रेल्वे ही सारी क्षेत्रे भांडवल सघन आहेत. यातील अनेक क्षेत्रांमध्ये 100 टक्के परदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली आहे. जे परकीय गुंतवणूकदार येणार त्यांचा स्वत:चा अजेंडा असतो. तुम्हाला भांडवल कमी पडते म्हणून तुम्हाला त्यांच्याकडून मिळू शकणार्या भांडवलात रस असेल; पण त्यांना फक्त भांडवल गुंतवण्यात रस नसतो (तसा असता तर त्यांनी आपल्या शेअर मार्केटमध्येच पैसे ओतले असते.) तर आपल्या देशातील मालाला, तंत्रज्ञानाला मार्केट मिळावे हादेखील असतो. (उदा. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला आर्थिक साहाय्य करण्यात जपानचा छुपा अजेंडा आहे.) त्यामुळे मेट्रो रेल्वेबाबत जे घडत आहे ते इतर अनेक औद्योगिक क्षेत्रात घडू शकते आणिमेक इन इंडियासारख्या योजना जाहिरातीपुरत्याच राहायची भीती आहे. 
- संजीव चांदोरकर

माणगाव परिषद : बहिष्कृतांचे रणशिंग - उत्तम कांबळे

'अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद ’ हा उत्तम कांबळे यांचा ग्रंथ ‘ लोकवाङ् ‌ मय गृह ’ तर्फे लवकरच वाचकांच्या भेटीसाठी येत आहे. एका ऐति...