2

आपल्या ‘व्हॉटस्ॲप’वर नियमितपणे लेख मिळविण्यासाठी 85 30 52 85 50 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून, त्यावर आम्हाला ‘हॅलो’ असा मॅसेज पाठवा.

Friday, 27 March 2020

द्वेषाच्या पलीकडे...


मुस्लीम आतंकवाद हे समीकरण आता सामान्य झाले आहे. परंतु हे समीकरण मुळात असे आहे ? हे माध्यामातून रचलेले राजकीय समीकरण आहे? सर्वसमावेशक शत्रू उभा करण्याचं हे सोपं साधन आहे? याची चर्चा मात्र सामान्य पातळीवर होत नाही. अगदी तुरळक बुद्धिवादी आणि कलासक्त परिघामध्ये याबद्दल चर्चा होते, मात्र केंद्रीभूत पद्धतीने सर्वसमावेशक चर्चा होत नाही. सार्वजनिक पद्धतीने कुणी हा प्रयत्न केला तर त्याला ट्रोलकरून पाकिस्तानचे तिकीट काढून दिले जाते. मुस्लीम धार्मिक मूलतत्त्ववाद किंवा मुस्लीम कट्टरपंथी हे तर अतूट समीकरण तयार झाले आहे. जसे काही इतर धर्मात कट्टरपंथी नाहीतच. कट्टरतावाद हा आता आधुनिक जगाचा व आपल्या जगण्याचा एक भाग आहे.

या अरिष्टात गुरफटलेल्या मुस्लीम मनाच्या घुसमटीला व अवहेलनेला आपल्या साहित्यातून प्रभावीपणे मांडणारे लेखक आहेत मोहसीन हमीद. हमीद हे मूळचे पाकिस्तानी. त्यांचा जन्म लाहोरचा. पंजाबी आणि काश्मिरी आईवडिलांसोबत हमीद यांचे बालपण अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये गेले. त्यांचे वडील अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठात प्राध्यापक होते. ते पाकिस्तानात परतल्यानंतर हमीदही त्यांच्यासोबत परत आले. लाहोर अमेरिकन स्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतले.

पुढे उच्चशिक्षणासाठी ते पुन्हा अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठात दाखल झाले. इथे शिक्षण घेत असतानाच त्यांनी टोनी मॉरिसन यांच्यासोबत काम करताना एक कादंबरी लिहायला सुरुवात केली होती. तेथील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हमीद आपली पहिली कादंबरी पूर्ण करण्यासाठी पुन्हा पाकिस्तानात आले. मात्र अमेरिकेत शिक्षणासाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी त्यांना पुन्हा अमेरिकेत काम करण्यासाठी जावे लागले. वर्षभरात काम करून तीन महिने सुट्टी घेऊन ते कादंबरी पूर्ण करण्यासाठी पुन्हा पाकिस्तानात येत होते. असं करत त्यांची पहिली कादंबरी मॉथ स्मोक 2000 मध्ये प्रकाशित झाली. त्यानंतर पुढची काही वर्ष त्यांनी न्यूयॉर्क व लंडन येथे जाहिरात क्षेत्रात नोकरी केली. मात्र कादंबरी लिहिण्यासाठी ते पुन्हा पुन्हा पाकिस्तानात येत राहिले. 2007 साली त्यांची द रिलॅक्टंट फंडामेंटलिस्टही कादंबरी प्रकाशित झाली. अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या या कादंबरीच्या एका वर्षात दहा लाखांपेक्षा जास्त प्रती विकल्या गेल्या व मॅन बुकरसाठीही नामांकन मिळाले. हमीद यांच्या जवळपास सर्व कादंबर्‍यांची मुख्य पात्र मुस्लीम आहेत व त्यातील बरीचशी पाकिस्तानी आहेत. पश्‍चिमी सभ्यता आणि पूर्वेची संस्कृती या पोकळीत जगणारी ही माणसं.

त्यांच्याकडे मात्र कुणी माणूस म्हणून बघायला तयार नाही. पश्‍चिमी जगतासाठी ती मुस्लीम आहेत आणि म्हणून संशयित आतंकवादी आहेत.  तर ही कादंबरी मीरा नायर या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या चित्रपट दिग्दर्शिकेच्या वाचनात आली. त्यांनी या कादंबरीवर चित्रपट बनवण्याचे ठरवले व हमीद यांना संपर्क केला. हमीद मीरा नायर यांच्या चित्रपटाचे चाहते असल्याने त्यांनी लगेच होकार दिला. मात्र हा चित्रपट तयार होणे ही खूप मोठी अडथळ्याची शर्यत होती. पहिलं मोठं काम होतं कादंबरीचे चित्रपटाच्या पटकथेत रूपांतर करणं. कादंबरीचे कथानक खूप नाजूक होतं. एक पाकिस्तानी तरुण आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत अमेरिकेत जातो. तिथे उच्च शिक्षण घेतो. न्यूयॉर्कमध्ये एक मोठ्या कंपनीत मोठ्या पगाराच्या पदावर पोहोचतो. जग जिंकल्याच्या आविर्भावात असताना नऊ अकराला वर्ल्ड ट्रेड सेंटरवरचा हमला होतो.

या घटनेने त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होतं व तो पाकिस्तानात परत येतो. इथे एका रेस्टॉरंटमध्ये बसून एका गुमनाम अमेरिकन व्यक्तीला तो आपली कथा सांगतोय अशा आशयाची कादंबरी. इथे चहा पीत पीत घडणारं संभाषण हीच संपूर्ण कादंबरी आहे. मात्र चित्रपटासाठी ही पटकथा होऊ शकत नव्हती. हमीद यांना सुरुवातीला सोबत घेऊन अनेक बदल कथेत केले गेले. दोन स्वतंत्र पटकथा लेखक नेमले गेले.  त्यांनी मिळून पटकथा लिहून पूर्ण केली. मात्र त्यांना यासाठी तीन वर्षे लागली. मूळ कादंबरी लिखाणापेक्षा हा वेळ जास्त होता. इतर अनेक कारणांसाठी हा चित्रपट बनवणे कठीण होते.

अमेरिकेचे वर्चस्व असलेल्या पश्‍चिम आणि उर्वरित जग अशा दोन संशयास्पद जगातील वैचारिक संघर्ष मांडणारा हा चित्रपट प्रेक्षकांना कितपत रुचेल हा एक भाग. दुसरे म्हणजे पाकिस्तानी नायक आणि  द्वेष, परकेपणा, अर्थहीनपणा आणि अर्थातच, सभ्यतेचा संघर्ष अशा काही गंभीर सामाजिक समस्यांकडे लक्ष देणार्‍या चित्रपटासाठी कोण पैसे गुंतवणार. दुसरा प्रश्‍न चित्रपट पूर्ण करण्यासाठी अधिक महत्त्वाचा होतं. चित्रपटातील कथेचा नायक पाकिस्तानी मुस्लीम तरुण ही कल्पनाच कुणाला ऐकायची नव्हती. पाकिस्तानात जाऊन शूटिंग करायला कुणीही तयार होत नव्हते. मात्र नायर यांना अशा लोकांनाच आरसा दाखवायचा होता. मात्र कुणीही पैसा गुंतवायला तयार नसल्यामुळे हा चित्रपट तयार होतो की नाही असे नायर यांना वाटायला लागले होते. शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश आले व कतारमधील दोहा फिल्म इन्स्टिट्यूटने या चित्रपटासाठीची संपूर्ण गुंतवणूक केली. पाकिस्तानऐवजी भारतात दिल्लीमध्ये लाहोरचे शूटिंग पूर्ण केले गेले.

चित्रपटात मात्र हे ओळखायलाही येत नाही एवढे साम्य या दोन शहरांत आहे. असे करत साधारण साडेपाच वर्षांनंतर चित्रपट पूर्ण झाला. कादंबरीला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. जगभरातील जवळपास सत्तरेक भाषांमध्ये भाषांतरित झालेल्या या कादंबरीवरच्या चित्रपटाला मात्र प्रेक्षकांचा काहीच प्रतिसाद मिळाला नाही. समीक्षकांनी तेवढी या चित्रपटाची प्रशंसा केली.

चित्रपटाच्या पटकथेसाठी मूळ कादंबरीच्या कथेत खूप बदल करण्यात आले. कथेचा नायक चंगेज खान कुणाला आपली कथा सांगतोय हे मूळ कथेत गोपनीय आहे. चित्रपटात हे दाखवणे शक्य नव्हते. त्यासाठी अमेरिकी गुप्तचर संस्था सीआयएचा एक एजंट पत्रकार बनून चंगेजला भेटायला येतो व त्या दोघांमधील संवादामध्ये संपूर्ण चित्रपटाचे कथानक घडते. खरे तर अमेरिकेचा मुस्लीम द्वेष किती निरर्थक आहे हेच मूळ कथाबीज आणि तेच एक अमेरिकन एजंटला सागितले जातंय. चंगेज खानची कादंबरीतील कथा तो अमेरिकेतील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून पाकिस्तानात परत येतो इथेच संपते. चित्रपटाची कथा मात्र तो पुढे पाकिस्तानी तरुणांचा आवाज बनतो इथपर्यंत पुढे जाते. चंगेज खानची प्रेमकहाणी चित्रपटाचा बराच भाग व्यापते. मात्र तरीही मुस्लीम आणि गैरमुस्लीम या संघर्षाची जी जाणीव चित्रपट करून देतो ती खूप अस्वस्थ करणारी आहे. या पलीकडच्या म्हणजे दुसर्‍या बाजूचा विचार आपण कधी केलेला नसतो. ही दुसरी बाजू जाणून वा समजून घेण्यासाठी हा चित्रपट खूप महत्त्वाचा आहे. या जाणिवेचे भान हेच कादंबरीच्या कथेच्या मुळाशी आहे.

लाहोर विद्यापीठातून एका प्राध्यापकाचे (अमेरिकी) अपहरण केले गेले आहे. याच विद्यापीठातील तरुण प्राध्यापक चंगेज खान या तरुणाकडे सीआयए संशयित म्हणून बघत आहे. सीआयएचा एक एजंट पत्रकार बनून चंगेज खानला भेटायला एका हॉटेलसारख्या टी हाऊसमध्ये आलाय. इथे त्या दोघांचा संवाद सुरू होतो. या संवादातूनच चंगेज खान त्याची आपबिती सांगतोय. चंगेजने अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठातून पदवी घेऊन एका वित्तीय कंपनीत कामाला सुरुवात केली आहे इथपासून तो आपली गोष्ट सांगतोय. त्याचे काम चांगले सुरू आहे. मोठी कंपनी, मोठे काम, मोठा पगार, मस्त मौज मजा असं सगळं व्यवस्थित चालू आहे. ही संधी त्याला अमेरिकेतच मिळू शकते. तिथे माणसांच्या ज्ञानाची, कौशल्याची व कामाची किंमत केली जाते. यासाठी तो अमेरिकेच्या प्रेमात आहे. असंच एक दिवस न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये फिरताना त्याची ओळख एका फोटोग्राफर तरुणीशी होते. तिचे नाव इरिका. ती अमेरिकेचे प्रतीक आहे.

अमेरिकेच्या स्पेलिंगमधले  स् काढले की तिचे नाव राहते ते र्िंग्म्. ती कलाकार आहे. तिच्या पुढच्या भेटींमध्ये चंगेज तिच्या प्रेमात पडतो. अगदी कमी दिवसांत चांगले काम करून चंगेज आपल्या बॉसला खूश करतो, बदल्यात त्याला बॉस मोठ्या पदावर बढती देतो. चंगेज याबद्दल स्वत:वर खूप खूश आहे. याच आनंदात तो टीव्ही सुरू करतो. त्याला वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्याची बातमी दिसते. ती दृश्य बघून तो अचंबित होतो. दुसर्‍या दिवशी विमानतळावर पाकिस्तानी मुस्लीम आहे म्हणून त्याची तपासणी केली जाते. संपूर्ण नग्न करून त्याची तपासणी घेतली जाते. इथे पहिल्यांदा त्याला अमेरिकेचे वेगळे रूप दिसते. फक्त मुस्लीम आहे म्हणून त्याची ही अवहेलना झालेली आहे हे वास्तव त्याला अस्वस्थ करतं.

त्याच्या ऑफिसमध्ये सर्व सहकारी मुस्लिमांबद्दल द्वेषाने बोलत आहेत ते चंगेजला ऐकून नकोसं होतं. अमेरिकेत अचानक देशभक्तीला आलेलं उधाण पाहून तो अचंबित होतो. असंच एक दिवस पार्किंगमधील त्याच्या कारची चारही चाकाची हवा सोडून देऊन एक अमेरिकी नागरिक त्याच्यावर थुंकतो. इरिका तो वेगळाच माणूस आहे असं म्हणून त्याला झिडकारते. काही दिवसांनंतर एक दिवस अचानक ऑफिससमोरील रस्त्यावर चालत असताना पोलीस चंगेजला अटक करून कोठडीत टाकतात. त्याला अफगाणिस्तानात ट्रेनिंग घेतले का विचारतात. खूप प्रश्‍न विचारून त्याला वैतागून सोडतात. नंतर सोडून देतात. त्यानंतर तो इरिकाने केलेल्या एका कला प्रदर्शनाला भेट देतो. ते बघून इरिकाने त्याच्या पाकिस्तानी मुस्लीम असण्याचा कलात्मकबाजार मांडला असे त्याला वाटते. तिच्यासोबत भांडण करून तो तिथून बाहेर पडतो. पुढे एका कामानिमित्ताने इस्तंबूल शहरातील एका प्रकाशन संस्थेच्या कामासाठी जातो. तेथील प्रकाशक त्याला त्याच्याच वडिलाच्या कवितांचे तुर्की भाषेत अनुवादित केलेले पुस्तक देतो. दुपारच्या जेवणासोबतच्या गप्पांमध्ये त्याला एक गोष्ट सांगतो, ती गोष्ट चंगेजच्या सर्व अस्वस्थ प्रश्‍नांचे उत्तर देते. त्याच क्षणाला चंगेज आपली नोकरी सोडतो.

परत पाकिस्तानात येतो आणि लाहोर विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू होतो. तिथे तो नव्या पाकिस्तानच्या स्वप्नांविषयी बोलतो. विद्यार्थ्यांना व इतरही तरुणांना ते आवडायला लागतं. तो अल्पावधीतच त्यांचा आवाज बनतो. हा चंगेज पाकिस्तानात परत आल्यानंतर घडणारा कथानकाचा भाग चित्रपटात आहे, मात्र मूळ कथेत नाही. चंगेज पाकिस्तानात परत आला इथेच कादंबरी संपते. कादंबरी अशी अचानक व गूढ वळणावर संपते. चित्रपट मात्र चंगेज आपली भूमिका मांडून झाल्यावर संपतो. बोल की सच जिंदा है... बोल की लाब आझाद है तेरे... या फैज अहमद फैज यांच्या शब्दांनी चित्रपट संपतो...

नऊ अकराच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हमाल्यानंतर जग दोन भागांत विभागलं. तुम्ही एकतर अमेरिकेच्या बाजूचे किंवा विरोधातले. धाकल्या बुश यांची ही करामत. वॉर ऑन टेररया आवेशात अमेरिकेने किती निष्पाप अफगाणिस्तानी मारले असतील याची गणतीच नाही. हीच बाब इराण, इराक यांच्याबाबतीतही. थोडे मागे गेल्यास व्हिएतमान वगैरे बरेच काही सापडायला लागेल. आतापर्यंत आतंकवाद्यांपेक्षा जास्त माणसे अमेरिकेने वेगवेगळ्या युद्धात व मोहिमेत नक्कीच मारली असतील. पण कुणी अमेरिकेला आतंकवादी म्हणत नाही. उलट त्याविरोधात लढण्याचा मक्ता जगाने त्यांना दिलाय. आता तर ट्रम्प याचं मुस्लिमांना अमेरिकेत यायला बंदी घालायचं चाललंय. त्याच काळात हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने अमेरिकन वृत्तीसमोर आरसा धरला पण त्यात बघायला कुणी तयारच नाही.

राजकारणाचा हा सोपा मार्ग पुढे इतर सर्वांनी स्वीकारला. आता मुस्लीम द्वेष ही एक सामान्य बाब झाली आहे. आतंकवादाचा बागुलबुवा उभा करून, लोकांमध्ये भय व असुरक्षितता निर्माण करून सत्ता मिळवणे हा आता सोपा खेळ झालय. त्यासाठी मुस्लीम आतंकवादी आहेत असे लोकांच्या मनावर बिंबवत राहणे एवढेच पुरेसे आहे. या कारस्थानाला मुस्लीमही बळी पडत अजून हिंसक मार्ग स्वीकारत आहेत. यामुळे हा अरिष्टाचा फेरा तुटायला तयार नाही. हा फेरा कसा तोडायचा याचे उत्तर चित्रपटाच्या शेवटी चंगेज खान देतो. मात्र ते करण्यासाठी खूप हिंमत, शक्ती आणि शांतता असावी लागणार आहे. ती आपल्याकडे नाही. आपल्याकडे उतावीळ वाचाळवीर फार आहेत.  त्यामुळे आपणही या फेर्‍यात पुरते अडकलोय. दिल्लीतील हिंसाचार हे त्याचे ताजे उदाहरण. शाहीन बाग आंदोलनातील कुणाचे काही ऐकण्याची गरज आपल्याला वाटत नाही. जेएनयू व जामियामध्ये नक्की काय घडलं याच्याशी आपल्याला काही देणंघेणं राहिलेलं नाही. आपल्याच माणसांबद्दलचा हा बेदरकारपणा आणि द्वेष आपल्याला कुठे घेऊन जाईल माहीत नाही. आपल्या मुलांसाठी आपण काय भविष्य ठेवून जाणार आहोत याचे उत्तर आपण द्यायला हवे...!
- संदीप गिर्‍हे

Friday, 20 March 2020

मॉब्ज, मोबाईल्स आणि दडपलेल्या स्मृती

इंग्रजी भाषेच्या क्षितिजावरजमाव’ (मॉब्ज) या शब्दाचा उदय सतराव्या शतकाच्या शेवटी झालेला आढळतो. सुरवातीच्या काळात याचमॉबशब्दाचा वापर विविध शब्दांना पर्यायी शब्द म्हणून केला गेला. आजच्या सत्योत्तरी काळात याचमॉबशब्दाचा वापर अनेक अर्थाने बदलत गेला. त्या अर्थच्छटांची आजच्या काळातील अर्थांशी तुलना करायची झाली तरशब्दार्थ उगम शास्त्रसांगणारे एखादे छोटे पुस्तकच लिहावे लागेल! फ्रेंन्च राज्यक्रांती आणि त्यानंतरच्या संपूर्ण एकोणिसाव्या शतकाच्या काळातमॉबशब्द सामाजिक अपराधाच्या वर्णनांतील एक अचूक अर्थवाही शब्द म्हणून वापरला गेला. त्यानंतरच्या सुमारे अर्ध्या शतकानंतर मॉब या शब्दातून व्यक्त होणार्या माणसांच्या संमिश्र समूहाचीमानवीबाजू लक्षात घेतली जाऊ लागली. हे कधी घडले? तर कोणत्याही सामाजिक क्रांतीची सुरुवात माणसांत जागृती करून त्यांना सामाजिक हालचालींसाठी प्रेरित करणे, ‘मोबिलायजेशनकरणे, ही पहिली पायरी आहे, असा सकारात्मक अर्थ मॉब शब्दाला राजकीय परिभाषेत प्राप्त झाला तेंव्हा. त्याही पुढे जाऊनमॉबया शब्दाला आणखी सहानुभूती मिळाली तीमोबाइलम्हणजे हलता/फिरता अशीयांत्रिक स्थितीदर्शविण्यासाठी पोषक शब्द म्हणून याचा वापर सुरू झाला तेव्हा. म्हणजेमॉबसमूह म्हणजे माणसांचा जमाव असेल, तरमोबाइलया शब्दाचा अर्थ हलता/फिरता किंवा वाहता असा घेतला जात असला तरी त्यालापूर्णपणे यांत्रिक व्यवस्थाअसे अर्थांचे परिमाण आहे.
मोबाइलशब्द प्रत्येक वेळी यंत्रप्रणीत वाहन/गाडी अशा अर्थाने वापरला जात नसला तरी त्यातूनगतिमानता गुंफलेली कृतीअसा अर्थ मुख्यत: व्यक्त होत असे. एका अर्थाने संपूर्ण विसाव्या शतकात मॉब्ज (जमाव) आणिमोबाइल्सहे शब्द परस्पर विरुद्ध आशय व्यक्त करण्यासाठी वापरले गेले. सध्या हे दोन्ही शब्द आधुनिक इतिहासाच्या केंद्रस्थानी विराजमान झालेले दिसतात.
सामाजिक/राजकीय क्रांती घडताना यामॉब्जनी (माणसांचे समूह) निर्णायक भूमिका बजावली तर औद्योगिक क्रांती घडताना गतीमान लोखंडी यंत्रांनी महत्त्वाचे स्थान प्राप्त केले. मोबिलिटी किंवा गतिमानता, मग ती मानवप्रणित असो वा यंत्र-प्रणीत असो ही गतिमानताच, आजच्या आधुनिकतेच्या केंद्रस्थानी आहे. विसाव्या शतकातमॉब्जम्हणजे माणसांचा समूह सामाजिक किंवा सांस्कृतिक स्मृतीत हिणकस समुह असा नोंदला गेला. मॉब किंवा समूह म्हणजे श्रीमंत नसलेली, उच्चजातीची नसलेली, राजघराण्यातील नसलेली सामान्य माणसं!
औद्योगिक क्रांतीच्या भट्टीतून तावून सुलाखून निघालेल्या मोबाइल्सना म्हणजेच यंत्रप्रणालींना स्वत:ची अशी सांगण्याजोगी स्मृती नसते; परंतु स्मृती म्हणजे काही शरीराचा एखादा दाखवण्यासारखा असा मेंदूचा भाग नसतो. स्मृती ही मानवी मेंदूचा एक अविभाज्य हिस्सा असते. मानवी उत्क्रांतीत माणसाने आत्मसात केलेली ती एक प्रक्रिया असते. विसाव्या शतकाच्या अखेरीला आजच्या होमो-सेपियन्सनी एक सामूहिक पण मूक असा निर्णय घेतलेला दिसतोय. तो म्हणजे, स्मृतींचे संश्लेषण करून ती साठवणे आणि आवश्यकतेनुसार पुनर्निमिती करणे यासाठी माणसांनीश्रमकरणे तितकंसं श्रेयस्कर नाही! ही सर्व किचकट कामे माणसाने बुद्धिमान यंत्रे आणि कृत्रिम माहिती संग्रहकचिप्सवर सोपविण्यास सुरुवात केली. आता या चिप्सनी स्मृती साठवण्यास सुरुवात केली आणि मोबाइल्स (भ्रमणध्वनी यंत्र) ही माहिती संग्रहालय म्हणून काम करू लागली. आधीच्या शतकात त्या माणसांनीच स्वत:च्या स्वातंत्र्य, समता, मानवी प्रतिष्ठा आणि हक्कांसाठी महत्त्वाचे लढे केले होते; पण त्या लढ्यांच्या स्मृती नष्ट झालेले हे मानवी समूहमॉब्जआता यंत्रासारखे वागू लागलेत आणि मोबाइल्स जणू मॉब्जसारखे महत्त्वाकांक्षी होऊ लागलेत! हे दोन्ही घटक आता मानवी स्मृति नव्याने घडवू लागलेत.
आजच्या एकविसाव्या शतकातील जाणत्या माणसांसाठी (होमो-सेपियन्सना) स्मृतीचा फारसा उपयोग उरलेला नाही. आता हे होमो सेपियन्स सतत आपल्या भविष्याच्या विचाराने उत्तेजित होतात. त्यांचे क्रेडिट कार्ड किती सुस्थितीत आहे आणि आपल्या संभाव्य आमदनीचा वापर आपण कसा करू शकतो यावर त्यांचे आनंद आणि समाधान अवलंबून असते. पृथ्वीच्या सुरक्षित भविष्यासाठी राखून ठेवलेल्या सर्व नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करण्यापुरते होमोसेपियन्सचे पृथ्वीशी नाते उरले आहे. आपण आजवर कसे जगलो याचा विचार करणे त्यांना पसंत नाही. तर यापुढे किती दीर्घकाळ आपण जगणार आहोत याचाच फक्त विचार करणे त्यांना आवडते. अशा या नव्या मानवी प्रजातीचा उल्लेखसायबोर्ग्जकिंवाहोमो ड्युअस्अशा शब्दात केला जातो. या प्रजातीलास्मृतीचा फारसा उपयोग नसतो. छोनछोकीन लाडावलेल्या 69व्या शतकातल्या कलाकारांना वाटायचं, जगणं.. ते तर नोकरही जगतात! अशाप्रकारे विचार करणारी मंडळी काहीशा बेजबाबदारपणे असं गृहीत धरतात की, ‘स्मृतीम्हणजे ती पूर्वी असायची. त्या वेळी स्मृती गरजेची होती; आता मानवाला स्मृतीचा काहीच उपयोग नाही.
मोबाइल्स आणि मल्टी-टास्कड (बहुद्देशीय) टॅबलेट्स अशी साधनं आपल्यासमोर खोटी आशा निर्माण करणारे जग उभे करतात. ही साधनं आपल्यातर्फे खरेदी-विक्रीचे व्यवहार करतात, आपल्या भावना इतरांपर्यंत पोहोचवतात. माणसांसाठी अत्यंत अपरिचित वाटावी अशी नवी काल्पनिक विश्व उघडतात. माणसांची आयुष्यस्थिर फोटोग्राफीमार्फत जणू गोठवून टाकतात. ही साधने आता माणसांसाठी विचार करू शकतात आणि निराश-हताश माणसांनासेल्फीकाढण्याची संधी देऊन त्यांची सांत्वनाही करतात. थोडक्यात सांगायचं तर माणसाचं माणूसपण सिद्ध करणारी बहुतांश कामे आता मोबाइल्स आणि टॅबलेट्स करू लागले आहेत. एवढेच नाही तर या साधनांना माणसांपेक्षा आणखी एक वेगळी शक्ती प्राप्त झाली आहे. ती म्हणजे ही साधने क्षणार्धांत अतिदूर संपर्क-संवाद साधू शकतात.
मोबाइल्स आता मानवी स्मृतींची साठवण करू लागले आहेत आणि माणसानं ते काम सोडून दिले आहे. परिणामी याच मानवी समूहांनी गेल्या शतकात निर्माण केलेली शासने आता माणसांची स्मृति पूर्णांशाने पुसून टाकण्याच्या कामाला लागली आहेत. आजची सत्ताधारी शासने मोबाइलधारक ट्रोल्सची फौज बाळगतात. आपल्याच नागरिकांच्या स्मृतींत आपल्याला अनुकूल बदल घडवण्यात ती आज दंग आहेत. लोकांनी वास्तविक इतिहास विसरून जावा आणि सत्ताधार्यांना अनुकूल विकृत इतिहास मान्य करावा यासाठी प्रयत्नशील आहेत. ही मोबाइलसज्ज फौज आपल्याला सांगते की, गांधींनी भारताची फाळणी केली. मोबाइल फौज आम्हाला सांगते की, गोडसे ही एकमहान विभूतीहोती, पंडित नेहरू भारतीयांचे शत्रू होते. इतकंच नाही तर ही मंडळी आपल्याला असंही सांगतात की, आमच्या प्राचीन भारतात प्लॅस्टिक सर्जरीचे तंत्रज्ञान विकसित झाले होते आणि उंच उडणारी विमाने उत्पादित केली जात होती. आपल्या प्राचीन भारतातील अशा आजवर आपल्याला माहीत नसलेल्या अनेक मनोरंजक गोष्टी ते आपल्याला सांगतात. पण एवढचं नाही तर आपल्या अवतीभोवती छान, सुंदर कामं त्यांनी घडवलीत आणि त्यांच्या वैचारिक तत्त्वज्ञानाच्या प्रभावाने पावन झाल्यामुळे कशी वेगवान प्रगती देशात घडत आहे, अशा माहितीचा अखंड वर्षाव ते करत रहातात. त्यासाठी ते आंतरराष्ट्रीय मानांकन संस्थांचे अनेक उत्तमोत्तम ताजे अहवाल अक्षरश: शून्यातून निर्माण करतात. त्यातून त्यांनी साध्य केलेल्या दैदिप्यमान यशाची माहिती मिळते. त्यातून तथ्य, काल्पनिक तथ्य आणि भीती अशा घटकांचे एक अद्वितीयकॉकटेलतयार होते. म्हणजे आता माणसांच्या समूहांना काही आठवणारच नाही आणि त्यांना काही आठवले तरी मोबाइल्स अशा स्मरणाचे सुख मिळू देणार नाहीत. असे मॉब्ज आता सरकारची धोरणे ठरवत आहेत. न्यायपालीकेंचे निर्णय ठरवत आहेत. ते आता नागरीक आहेत. इतर सारे देशद्रोही.
सार्वकालिक महान जर्मन लेखक हेन्रिक हाईन याने कायमचे लक्षात राहील असे एक धक्कादायक वाक्य लिहिलं आहे. तो लिहितो, ‘ही तर केवळ नांदी होती; ते आत्ता पुस्तकं जाळतायत, शेवटी ते लोकांनाही जाळणारेत.’ मे, 1933 मध्ये नाझी विद्यार्थी संघ, एसएस आणि हिटलर युथ या संघटनांनी मारिया रिमार्क, कार्ल मार्क्स, अल्बर्ट आइन्स्टाईन आणि अन्य अनेक लेखकांच्या पुस्तकांची जाहीरपणे होळी केली होती. त्यांनी बर्लिनमधील बेबलप्लाझ या ठिकाणी सुमारे 20,000 पुस्तकं जाळली होती. या पुस्तकातून त्यांना मान्य नसणारे विचार आणि भूमिका मांडण्यात आले होते; म्हणून पुस्तकं जाळण्यात आली होती. हाईन याने या भीषण घटनेवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
जोसेफ स्टालिनच्या राजवटीत अलेक्झांडर सोल्झेनित्सिनवर त्याने आक्रमक संघटना स्थापन केल्याचा आरोप करण्यात आला. त्यासाठी त्याला लुबयन्का तुरुंगात टाकण्यात आले. दुसरे महायुद्ध समाप्त होत असतानाच फेब्रुवारी, 1945 सालात घडलेली ही घटना. तो या महायुद्धात रशियाचा एक सैनिक म्हणून लढला होता; पण त्याला या महायुद्धातील विजयाचा उत्सव त्याच्या तुरुंगाच्या कोठडीच्या खिडकीतून स्वत:चा जीव धोक्यात घालून बघावा लागला होता. नंतर पुढे त्याला त्याच्या गाजलेल्याद गुलाग अर्केपॅलिगोया कलाकृतीसाठी एकांत कोठडीत पाठविण्यात आले. आपल्याला जे दिसतंय तेच लिहिले म्हणून तुरुंगात टाकल्या गेलेल्या असंख्य लेखकांपैकी सोल्झेनित्सिन हा एक होता.
काही महिन्यापूर्वी कोलकात्यात ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. माझ्या मते ही घटना आपणवैचारिक विविधता आणि विरोधी मतांबाबत असहिष्णू होत असल्याचे लक्षण आहे. आपल्या देशातील बदलत्या आर्थिक धोरणाच्या नव्या चौकटीमुळे आपली मनोभूमिका आणि लोकशाही संकल्पना किती बदलली आहे याचे द्योतक आहे. एका अर्थी ही एक अत्यंत लक्षणीय ऐतिहासिक घटना आहे. एकोणिसाव्या शतकातील भारतातील आधुनिक वैचारिक पुनरुत्थानाची सुरुवात बंगालमध्ये झाली होती.
भारतातील प्रभावी बुद्धिवादी मध्यमवर्गाचा उदय एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस बंगालमध्ये झाला होता. 1960च्या दशकात याच बंगालमध्ये अति डाव्या विचारप्रवाहाचाही उगम झाला होता आणि याच बंगालमध्ये या शतकाच्या आरंभी डाव्या विचारप्रवाहाची पीछेहाटही सुरू झाली. या पार्श्वभूमीवर ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची मोडतोड बघायला हवी. ही घटना म्हणजे भारतात उजव्या विचारसरणीने राजकीय पटलावर मध्यवर्ती स्थान मिळवल्याचे आणि हिंसेच्या तत्त्वज्ञानाची द्वाही आहे, हे लक्षात घ्यायला हवे. मे 2019 मधील या घटनेची इतिहासतज्ज्ञांना यापुढील अनेक वर्षे दखल घ्यावी लागेल. हाईनचे लिखाण परत वाचणे म्हणूनच मनोवेधक ठरावे.
- गणेश देवी
(सुप्रसिद्ध भाषातज्ज्ञ व विचारवंत गणेश देवी यांच्या ‘आपले वाड्‌मय वृत्त’ मासिकात प्रसिद्ध झालेल्या लेखमालेचे पुस्तक लवकरच…)

Monday, 17 February 2020

भाषेची हिंसा आणि लोकतांत्रिक प्रत्युत्तर


भाषा ही अर्थ-वहनाची इतकी विचित्र बांधणी आहे की, काही वेळा अगदी सोप्या वाटणार्‍या शब्दाचा नक्की अर्थ सांगण्यात नाकी-नऊ येऊ शकतात; आणि त्याउलट कितीतरी क्लिष्ट वाटणार्‍या शब्दाचा नेमका अर्थ अगदी सहजासहजी सांगता येऊ शकतो. उदाहरणार्थ ‘अँथ्रोपोसिनी’ या नव्यानेच इंग्रजीमध्ये रूढ होत असलेल्या शब्दाचा अर्थ आहे ‘मानवाने पर्यावरणावर आणि प्रकृतीवर उठवलेला ठसा पर्याप्त मर्यादा ओलांडून विनाशकारी बनला ते युग’ हे ठणकावून सांगता येते. पण, जर ‘प्रकृती’ चा अर्थ शोधायचा असेल तर, शारीर-प्रकृती का निसर्ग? ह्या द्विधेमध्ये आपण अडकतो. शिवाय, निसर्ग केवळ  जीव (लाइफ) सृष्टीच्या आधी आणि नंतर असतो, का मग संपूर्ण जीवसृष्टीला धरून असतो? हा न सुटणारा प्रश्‍नही समोर उभा राहतो. शिवाय, ‘संस्कृती’ आणि ‘प्रकृती’, म्हणजे एका बाजूला मानवी इच्छा आणि बुद्धी आणि दुसर्‍या बाजूला सारे न-मानवीय, यांच्यातले सततचे परस्पर-विरोध आपल्याला आठवायला लागतात.

एकंदरीत ‘अर्थ’ कसा ‘उद्भवतो’, त्याचा चलन-व्यवहार कसा नक्की ठरतो, हे अजूनही पूर्णपणे न सुटलेले कोडे आहे.  मुळात ‘अर्थ’ या शब्दाचा अर्थच फारसा स्पष्ट नाही. आपण सामान्यत: कठीण शब्दांचे अर्थ समजून घेण्यासाठी शब्दकोशाची मदत घेतो. मी इंग्रजीमध्ये ‘मिनिंग’ या शब्दासाठी ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी उघडली तेव्हा त्यात जो ‘अर्थ’ सापडला तो असा : what is meant by a word, action or idea. मराठीत त्याचा गोषवारा होईल ‘एखाद्या शब्दाने विशिष्ट कृती, संकल्पना किंवा शब्द यांचा अभिप्रेत होत असलेला अर्थबोध’ यात पुन्हा आपण ‘अर्थबोध’ म्हणजे काय? असे त्या शब्दकोशाला विचारले, तर गोल-गोल फिरत शब्दकोश आपल्याला पुन्हा त्याच घोटाळ्यावर आणून उभा करेल. ते न विचारणेच योग्य. शब्दकोशाची निर्मिती अर्थ समजावून सांगण्यासाठी झाली असली तरीही, अर्थ शब्दाचा संपूर्ण अर्थ ते आपल्याला सांगू शकणार नाहीत. ह्यात कारण हे नाही की शब्दकोशांना भाषेच्या सगळ्या लकबी माहीत नसतात. उलट, त्या त्यांना सगळ्या माहीत असतात म्हणून ते शब्दकोश बर्‍याचशा शब्दांचे अर्थ अनुत्तरित स्वरूपात नोंद-करत असतात. त्यांना हे पक्के माहीत असते की शब्दांचे अर्थ सतत शब्दांच्या पुढे धावत राहतात, सतत बदलत राहतात.  हे झाले शब्दकोशांचे. स्वत: शब्दही बर्‍याचदा अशा रीतीने वापरले जातात की त्यांचे प्रस्थापित अर्थ मोडीत निघावेत आणि त्या नव्या वापरातून काही नवे अर्थ त्या विशिष्ट शब्दांना चिकटावेत.  गेल्या पाच-सहा वर्षांत मी कितीतरी शब्दांचे प्रस्थापित अर्थ बदललत असलेले पाहत आलो आहे. अशा शब्दांची --आणि त्यातून बनवलेल्या वाक्यांची -- एक ‘धोबी-लिस्ट’ देतो. ही यादी ‘समग्र शब्दसूची’ नाही. ती एक सहज बनवलेली, केवळ अगदीच नजरेआड करता येणार नाहीत अशा शब्द-वाक्यांची आहे. सोबत त्यांचे नवे अर्थही आहेत. वाचक स्वत:ही त्यात बरीच भर घालू शकतील.     

‘मनापासून पुस्तके वाचणारे, ज्ञानाच्या-कलेच्या क्षेत्रात आणि सामाजिक जीवनात आपला ठसा उमटवणारे आणि वेळोवेळी आपली मते निर्भीडपणे माध्यमातून व्यक्त करणारे’ या सगळ्यांसाठी आता ‘खानमार्केट बुद्धिजीवी’ हे लेबल वापरले जाते.

ज्यांना देशात काश्मीरपासून आसामपर्यंत कोणत्याही भागांत अन्याय झाला तर दुःख होते, जे ती वेदना जाणीवपूर्वक व्यक्त करतात त्यांना ‘तुकडे-तुकडे गँग’ म्हणण्यात येते.

जे सरकारची प्रजा-विरोधी धोरणांशी सहमत नाहीत ते ‘देशद्रोही’ आणि जे अशा जनहितविरोधी धोरणांची जबाबदारी पंतप्रधानांची आहे असे स्पष्ट बोलतात, तसे लिहितात ते ‘अर्बन नक्सलाइट’ ह्या शब्दात संबोधले जातात.

घोळके आणि झुंडी बनवून एखाद्या निरपराध व्यक्तीस जे क्रूरपणे पिटतात त्यांना ‘गौरक्षक’ म्हटले जाते. ज्या व्यक्तीस पिटण्यात येते त्या व्यक्तीस ‘ऑफेंडर’/गुन्हेगार मानण्यात येते.

‘घरमे घुसके मारुंगा’ तसेच ‘चुन-चुनके  मारुंगा’ म्हणजे ‘लोकहितदक्ष राज्यव्यवस्थेची नवी व्याख्या’; ‘आश्रितांना नागरिकत्व बहाल करणे’ म्हणजे काही विशिष्ट धर्माच्या लोकांनी देशात राहू नये अशी परिस्थिती निर्माण करणे’; ‘कपडेसे पहचान जाते है’ म्हणजे  इतिहासातील गर्दीत घरातून निसटलेले बालक चुकू नये म्हणून पाच लाखांच्या कोटावर त्याचे नाव हजारोवेळ लिहून घेणे.

‘चौकीदार’ म्हणजे ‘आपल्या आवडीच्या कोट्यधीशांना व्यवस्था करून देणारा’; ‘बेटी बचाओ’ म्हणजे बलात्कारी नेत्यांचा सार्वजनिक सत्कार करणे.

‘ऑपरेशन कमल’ म्हणजे ‘नैतिकतेला सार्वजनिक सुट्टी देणे’; ‘किसीको डरनेकी जरुरत नंही है’ म्हणजे युनिव्हर्सिटी विद्यार्थ्यांना बेदम चोपण्यासाठी गँग्स पाठवणे; ‘परदेशात प्रतिष्ठा वाढलीय ’ म्हणजे ‘सगळ्या प्रमुख परदेशी वर्तमानपत्रात भारत सरकारवर प्रखर टीकेचे लेख येतायत’; सायन्स काँग्रेसचे उद्घाटन करणे म्हणजे पुराणातल्या तद्दन अशास्त्रीय गोष्टी शास्त्रज्ञांना सांगत बसणे; ‘छप्पन इंच छाती’ म्हणजे फाशी लावून घेणार्‍या शेतकारी वर्गाची निर्मम अवहेलना सुरू ठेवण्याचे साहस; ‘परीक्षेपे चर्चा’ म्हणजे थर्डरेट व्यक्तींना व्हाईसचान्सलर म्हणून नेमणे; नेहरू सेक्युलर होते असे संसदेत सांगणे म्हणजे नेहरू मेमोरियल लायब्ररी या संस्थेची वाट लावणे; प्रधान सेवक म्हणजे लोक काय म्हणतात याकडे कायम दुर्लक्ष करणे.

निवडणूक म्हणजे आपण स्वत: हे भारत आणि इतर सारे हे पाकिस्तान असा खेळ. जवळपास युद्धच! 

साहित्य विषय शिकणार्‍या कॉलेज विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत एक प्रश्‍न हमखास विचारला जातो, तो म्हणजे ‘कोणत्या युगकर्त्या कवी-लेखनाने आपल्या भाषेत किती नव्या शब्दांची भर घातली?’ आणि विद्यार्थी मोठ्या आवडीने कालिदास असो, शेक्सपियर असो, तुकाराम असो, जो महान कवी-लेखक प्रश्‍नात असेल त्याच्या शब्दसंपत्तीबद्दल लिहितात. त्या शब्दसंपत्तीच्या आधारावर, त्या त्या युगकर्त्या कवीने निर्माण केलेल्या साहित्ययुगाची प्रमुख लक्षणे अधोरेखित केली जातात.

सध्याच्या नव्या शब्दसंभारात एक खास गुण दिसून येतो, तो म्हणजे घृणा, तिरस्कार, धुत्कार यांची रेलचेल. या अभ्यासातील नियत झालेल्या पद्धतीने जायचे झाल्यास आपण या नव्या शब्दांच्या निर्मात्यांना ‘युगकार’ म्हणू शकू, आणि त्यांनी देशाला ज्या युगात फरपटत आणून पोहोचवले आहे त्याला ‘घृणायुग’ अथवा ‘तिरस्कार युग’ म्हणू शकतो. एखाद्या काळात अनेक लेखककवी काही नवीन निर्माण करत असतील तर त्यांचा उल्लेख इंग्रजीमधून ‘स्कूल’ असा केला जातो. त्या प्रमाणे आपण या नव्या वेदनेच्या कर्त्यांना ‘हेट-स्कूल’ म्हणू शकतो इतकी विपुल हेट-शब्द संपत्ती त्यांनी आपल्या सामाजिक जीवनातील परिभाषेत आणून टाकली आहे.

मनोवैज्ञानिक सिगमंड फ्रॉइडच्या पद्धतीने या नव्या हेट भाषेचे विश्‍लेषण करायचे झाल्यास, ह्या ‘हेटकी’ त ‘स्वत:च्या मनात सतत पछाडणारा न्यूनगंड आक्रमकपणाने व्यक्त करण्याची प्रबळ भावना’ दिसून येईल. ‘आजपर्यंत मला नाकारलेत काय? आता दाखवतो तुम्हाला’ --हा आवेश आणि त्यापोटी, देशाने परिश्रमातून आणि विचारपूर्वक उभ्या केलेल्या अनेक संविधानिक संस्था तोडायला लागल्या तरी त्यांची ऐसी-की-तैसी! इतिहासकारांना या नव्या भाषेचे आणि ती निर्माण करणार्‍या भाषिकांचे वर्णन करायला दिले तर ते, देश आर्थिक गर्तेत गेलेला असताना त्याकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून उभा केलेला शब्दिकी प्रचार या दृष्टीने पाहतील.

भाषाशास्त्र मात्र जरा वेगळ्या दृष्टीने हा प्रकार पाहील. ते याला ‘डिस्कोर्स अनालिसिस’ चे नियम लावून तपासतील.  ते, म्हणजे भाषाशास्त्री, म्हणतील ‘काहीही असो, भाषा ही शेवटी एक सामाजिक व्यवस्था असते’. एकदा कोणत्याही शब्दाचा वापर काही नव्याच अर्थाने केला गेला तर त्यानंतर तो वापर तसाच करण्याची कायम-मक्तेदारी त्या पहिल्या वापर-दाराकडे राहत नाही. सुरुवातीस, असे ‘नवे’ अर्थ शब्दात ओतताना त्या प्रथम वापरदारास आपण काही तरी महान नैतिक काम करतो आहे असे वाटणे स्वाभाविक आहे; पण नंतर जेव्हा हे सारे शब्द इतरही वापरू लागतात तेव्हा समाजात आणि भाषेत केवळ चिखलफेक आणि कचराफेक माजतात.

‘हेटकी’ ने भारतीय समाज जीवनात ही कचराफेक आणि चिखलफेक रुजवलेत. या पूर्वी, आपल्या समाज जीवनात कितीतरी महात्म्यांनी आपल्यासाठी नवीन शब्द तयार केले: गांधींनी आपल्याला दिले ‘स्वराज’, ‘सत्याग्रह’, ‘अहिंसा’, ‘असहकार’, ‘सविनय कायदेभंग’ सहयोग, बाबासाहेबांनी दिले ‘समानता’, ‘अधिकार’, ‘संविधान’ विनोबांनी ‘भूदान,’ आणि ‘जेपींनी’, ‘संपूर्ण क्रांती’. या सार्‍या शब्दात समाजमनाची उंची वाढवण्याची ताकद होती. हेटकीमध्ये ती नाही, उलट समाजाचा नीतीस्तर कितीतरी खाली ढकलण्याची खटपट त्यात आहे. रोज सकाळ-संध्याकाळ टीव्ही सेट्समधून आपल्या घरात हेटकी ओतली जाते आणि आता आपल्या घराघरात ती रुळून गेली आहे. घृणा आणि त्यातून निर्माण होणारी हिंसा या वेदनादायक आणि अनिछिनीय असतात; पण त्याहूनही जास्त दु:खद असते ते म्हणजे त्यांचे ‘नॉर्मलायझेशन’ रुळून जाणे. ते झाले आहे.

शब्दकोशांना ‘अर्थ’ शब्दाचा अर्थ पूर्णपणे माहीत नसेल, काही हरकत नाही. पण हिंसेच्या भाषेचा समाजावर सखोल परिणाम होत चालला तर त्याला कसे सामोरे जावे हे मानवी समुदायांना मात्र फार चांगले माहीत असते. भाषा ही खरोखरच एक विलक्षण सामाजिक व्यवस्था आहे. तिचा आपला एक प्रतिकाराचा प्रकार असतो. जेव्हा हिंसेचे शब्द भाषेचीही हिंसा करू लागतात तेव्हा भाषा ‘संपावर जाते’, ती तिच्या अर्थ-व्यवस्थेचे खालावलेले स्तर सांभाळून ठेवायला पुढे येते. ती काही संवाद अशक्य बनवते. हा तिचा संप. आणि काही नवे संवाद ती निर्माण करते. ही तिची कृती. भाषेच्या कोणत्याही अभ्यासकाला विचारा, तो/ती आपल्याला सांगेल की देशात उफाळून आलेला प्रोटेस्टचा महापूर हा मात्र नागरिकत्व मुद्यासाठीचा, मात्र सिटिझनशिप रजिस्टरच्या मुद्द्यालाच नाही. तो हेटकीच्या विरोधात पण आहे. मुळात तो त्यातूनच निर्माण झालेला आहे. आपल्या देशातील तरुणांनी आणि आजपर्यंत कधीही रस्त्यावर न उतरलेल्या स्त्रियांनी हेटकीला भर चौकात आणलंय. ते संविधानाच्या नावाने आणि तिरंग्याच्या छायेत संवाद मागताहेत. ते हेटकी नाकारताहेत, कारण ते हिंसेची भाषा आणि भाषेची हिंसा यापासून समाजमुक्त करायला उद्युक्त झालेत.

- गणेश देवी

Wednesday, 22 January 2020

लोक, राष्ट्र आणि नागरिक : निषेधाचे शास्त्रीय निदान


(छायाचित्र : संदेश भंडारे)
मानवी इतिहासामध्ये मानवी समुदाय ‘लोक’ स्वरूपात एकत्र येऊ लागले आणि नंतर कालक्रमाने ते ‘नागरिक’ बनले. ही प्रक्रिया सुरू होऊन ती पुरी व्हायला, होमो-सेपियन्स --माणूस-- प्राण्याच्या इतिहासातील फार प्रदीर्घकाळ लागला आहे. मानवाच्या अगदी सुरुवातीपासून जरी नसले तरी, माणूस विचार व्यक्त करण्यासाठी भाषा वापरू लागला, भाषेचा विकास करू लागला, त्यातून मानवी समुदायांची जडण-घडण होत गेली, त्या कालखंडापासून तरी ‘लोक’ या घटिताची सुरुवात झाली असावी. भाषेमधून विचार व्यक्त करण्याची क्षमता जेव्हा माणसांमध्ये आली त्या प्रक्रियेतून होमो-सेपियन्समधून ‘लोक’ बनणे सुरू झाले.


भाषेच्या माध्यमातून जाणीव विकसित होत जाणे आणि त्यातून भाषा वापरणार्‍या समाजात, ज्याला तत्त्ववेत्त्यांनी ‘phenomenological communities’ (जाणीव, अनुभव या माध्यमातून विचार करणारा समाज) असे म्हटले आहे, त्यातून ‘लोक’ निर्माण झाले. हे असे मानवी समूह एका ठिकाणी किंवा भटकंतीच्या स्वरूपात फार मोठ्या आणि व्यापक इतिहास प्रवाहात विकसित होत गेले. हे कोणते लोकसमूह होते? हा प्रश्‍न येथे फारसा महत्त्वाचा नाही. पण तत्कालीन भाषा वापरणार्‍या आणि त्यामुळे विकसित होत जाणार्‍या समाजात एकमेकांना जोडल्या जाणार्‍या संकल्पना व शारीर अनुभव यांच्या अनुषंगाने काही नेटवर्किंग तयार होत गेले आणि यातून आकलन, ज्ञान किंवा काही बोधनात्मक व्यवहार आणि त्याला मिळणारा भावनात्मक प्रतिसाद नियंत्रित होत गेले. अर्थात हे लोकसमूह. तोपर्यंत समाज बनले नव्हते. प्रत्येक कालखंडात ते बदलत राहिले. सामाजिक अभिसरणाची ही प्रक्रिया सातत्याने घडत राहिली. यातून एकमेकांचे आदान-प्रदान होत राहिले. या गोष्टी फार उघडपणे घडल्या असाव्यात असे म्हणता येणार नाही. म्हणजेच, या भाषिक इतिहासामध्ये लोकसमूहांचे विचार, संकल्पना, ग्रहीतके, एकमेकांच्या अपेक्षा याचे आदान-प्रदान फार उघडपणे झाले असेल असे नाही. एकमेकांना देण्याघेण्यातून आणि बर्‍याचशा अव्यक्त अशा रूपातून हा पाया मजबूत होत गेला, ज्यातून ‘लोक’ नावाची सामाजिक घडण आकाराला आली.

‘राष्ट्र’ ही संज्ञा खूप काळ ‘लोक’ यासाठी संपूर्णत: नसली तरी अल्पांशाने समानअर्थी म्हणून वापरली जात होती. राष्ट्र ही संकल्पना प्रामुख्याने प्रदेश/ जमिनीच्या अनुषंगाने आली. लोक ज्या प्रदेशात किंवा भूभागावर त्यांना आणि त्या प्रदेशाला ‘राष्ट्र’ म्हणून ओळखले जाऊ लागले. सुरुवातीला, राष्ट्र याचा एक अर्थ ‘नियंत्रित झालेले लोक’ असा होता. तरीही, आर्थिक देवाण-घेवाण, श्रमाची विभागणी, समाजातील व्यक्तीची सुरक्षितता, यांच्यातील वाढत्या गुंतागुंतीमुळे ‘लोक’-समाजाने ‘राष्ट्र’ ही संकल्पना स्वीकारली. ही प्रक्रिया पूर्ण व्हायला काही हजार वर्षे जावी लागली. व्यक्ती आणि राष्ट्र यांच्यातील नात्याचे स्वरूप पाहता त्या दोहोंत एक ‘सामाजिक करार’ (रुसोंच्या भाषेत) निर्माण झाला. कालांतराने लोकांना राष्ट्र नावाच्या गोष्टीला आणि त्या राष्ट्राचे ‘नागरिक’ म्हणून कवटाळायला भाग पाडले गेले.

वेगवेगळ्या रूपात होणारी उघड आक्रमणे आणि हल्ले आणि छुप्या हिंसा या बाबतीत राष्ट्राने नागरिकांची सुरक्षितता करावी अशी लोकांची अपेक्षा असते. आपल्यावर होणार्‍या किंवा नियंत्रित केल्या जाणार्‍या हिंसेच्या बदल्यांत देशाकडे असणार्‍या हिंसेच्या नियंत्रणाला ते शरण जातात. सौंदर्य, उद्दात-भावना, संस्कृती, आशय दडवण्याचा कला-सदृश्य प्रयत्न किंवा सर्वसाधारण परिस्थितीतसुद्धा देश आणि नागरिक या नात्यांचे बर्‍याचदा विविध रूपात उदात्तीकरण केले जाते; वेगवेगळे आकार धारण करून हे अनेक संस्कृतीत घडलेले आहे. गेल्या दोन शतकांत या उदात्तीकरणाने, राष्ट्र संकल्पनेला जगभर हातभार लावला आहे; तो बराचसा आभासी विचार रुजवला आहे.

राष्ट्र हळूहळू लोकांना नागरिक बनवत राहते. इतिहासाच्या ओघात एकदा माणसाचे ‘लोक’, लोकांचे ‘राष्ट्र’ आणि राष्ट्रातील समाज ‘नागरिक’ झाले की नंतर बहुतेक ते नागरिक सतत स्वत:ला नागरिक या स्वरूपातच ओळखायला लागतात, आणि आपण लोकही आहोत हे हळूहळू विसरायला लागतात. तथापि, कधीतरी एखाद्या देशाचे नागरिक जेव्हा प्रचंड मानसिक ताणाखाली येतात तेव्हा ते नागरिक म्हणून राहण्यापेक्षा पुन्हा एकदा ‘लोक’ म्हणून राहणे पसंत करतात, कारण हे त्यांचे मूळ स्वरूप आहे. लोकांना त्यांच्या स्वत्वाचा असा पुनःशोध लागणे असे क्षण हे इतिहासात खूप महत्त्वाचे असतात; इतिहास बदलण्याच्या क्षणांना ते अधोरेखित करतात. असा ऐतिहासिक एक क्षण आपण आपल्या देशाने जेव्हा आपल्या देशाची घटना (Constitution) लागू करण्यात आली तेव्हा अनुभवलेला आहे. ‘वुई द पीपल ऑफ इंडिया’ ‘आम्ही भारतातील लोक’ भारताच्या लोकशाहीचे चिन्ह म्हणून ओळखले जाणारे हेच ते आपल्या घटनेच्या सुरुवातीचे सश्रद्ध शब्द. ही घटनेची अभिव्यक्ती प्रत्येक भारतीयाच्या वुई द पीपल ऑफ इंडिया मनाच्या खोल तळात वुई द पीपल ऑफ इंडिया रुतून गेली आहे. त्यांच्या जाणिवेतून ती आता दूर करणे हे कधीच शक्य होणार नाही. आज आपल्या वर्तमानात घडत असलेली घटना हा एक असाच एक क्षण आहे. आहोत आणि त्यामुळे कदाचित आपल्याला ही सारी प्रक्रिया नीट आकलन करून घेणे कठीणच आहे. ण् म्हणजेच नागरिकत्व कायदा दुरुस्तीने (Citizenship Amendment Act, 2019) आपणांस सगळीकडून घेरले आहे.

हे असे घडले…

राष्ट्रीय लोकशाही युती (The National Democratic Alliance, NDA) हे उजव्या राजकीय पक्षांचे सरकार मे 2019 मध्ये पुन्हा भरपूर बहुमताने सत्तेत आले. प्रथमत: या सरकारने काय केले? तर जम्मू, काश्मीर आणि लडाख या संयुक्त राज्याचे लहान लहान व स्वतंत्र राज्यात तुकडे केले. नंतर ते अयोध्यावर घसरले; अयोध्या प्रश्‍नावरचा निर्णय. शंभरेक वर्षापूर्वीची मस्जिद उद्ध्वस्त केली जाणे हा एक गुन्हा आहे;, ही वस्तुस्थिती बाजूला सारून राममंदिर बांधण्याचा निर्णय देण्यात आला. काही आठवड्यांनंतर, 2002च्या गुजरात दंगलीमधील सहअपराधिता आणि गुन्ह्यात सामील असण्याविषयीच्या संदर्भात नरेंद्र मोदी यांना क्लीनचिट देण्यात आली आणि शेवटी, जग जेव्हा आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन साजरा करत होते, या दिवशी हे बिल लोकसभेत पारित करण्यात आले, नंतर ते राज्यसभेमध्ये सुद्धा पारित करण्यात आले. हे बिल देशाच्या राष्ट्रपतींनी ताबडतोब मंजूर केले आणि हा कायदा अमलात आला. ज्या वेगाने या घटना घडल्या आणि हे वादळ उठवून दिले व ज्या निष्ठुरपणे आणि क्रूरपणे नागरिकत्व दुरुस्तीचा कायदा स्वीकारला गेला, ते पाहता या कायद्यातून धर्मभेद आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा हेतू होता हे स्पष्ट आहे.. हा आपल्या देशाचा आता स्थायीभाव झालेला आहे. पण यातून देशातल्या नागरिकांच्या ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्या मोदी-शहा शासनाने आजपर्यंत अनुभवलेल्या नव्हत्या.

सर्वप्रथम, सर्वोच्च न्यायालयात लोकांनी शंभरेक जनहितार्थ याचिका दाखल केल्या, न्याय व्यवस्थेची विश्‍वासार्हता ही निकृष्ट दर्जाची आहे, तरीदेखील ही घटना फार महत्त्वाची ठरली. सरकारच्या या विभाजक कृतीविरोधी देशातील विद्यापीठांच्या परिसरात विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी आंदोलन छेडायला सुरुवात केली. धर्मभेद, जात, पंथ विसरून देशातील सर्वसामान्य जनता यांनी निषेध नोंदवायला सुरुवात केली. यासंदर्भात शेकडो बैठका, निषेध मोर्चे आणि रेलीज यांचे आयोजन होऊ लागले. भाजपच्या प्रचार यंत्र ज्यांची सतत निंदा करत असतात ती ‘तुकडे-तुकडे-गँग’ (म्हणजे उदारमतवादी आणि फॅसिझम विरोधी मंडळी) नव्हते. हे ‘खान मार्केट इंटलेक्च्युअल्स’ ही नव्हते. हे ‘लोक’ होते; माणसे होती लहान-मोठ्या गावातून आणि शहरातून आलेली. हा संताप, आणि हा क्रोध, हा निषेध लोकांचा होता; तो देशातील सर्व परिसरांतून येत होता. ‘राष्ट्रीय’ मीडियाने या देशभर पसरलेल्या निषेधाच्या गोष्टींना आपल्या कॅमेर्‍यात कैद करावे, ही अपेक्षा कोणाचीच नव्हती. पण देशातल्या स्थानिक, छोट्या-मोठ्या वर्तमानपत्रांनी आणि सोशल मीडियावर या देशभर पसरलेल्या निषेधाची नोंद भरपूर घेतली गेली. एकामागून एक देशातील राज्याने NRC (National Register of Citizens भारतीय राष्ट्रीय नागरिक रजिस्टर) अमलात आणणार नाही याचा निर्धार केला. उसळलेल्या लोकक्षोभाला अनुसरून राजकीय पक्षांनी सभा घेतल्या, निषेधमोर्चे काढले. अपेक्षेप्रमाणे निषेध मोर्चे, सभा यावर निर्दयपणे क्रूर पोलीस हल्ले करण्यात आले. हिंसा भडकली आणि अनेकांना आपले प्राण गमवावे लागले.

भाजप आरएसएसचा हिंदुत्व अजेंडा राबवत आहे, त्याच्या विरोधात, त्याला नाकारण्यासाठीचा, हा जनक्षोभ होता का? बहुतेक नाही; कारण सात महिन्यांपूर्वी याच लोकांनी भाजपला निवडून दिले आहे. अगदी उघडपणे आणि अविवेकी ‘वर्गीकरणावर’ ण् आधारलेले आहे ज्यामध्ये केवळ काही देशांतील स्थलांतरितांना आश्रय देण्याची तरतूद केली आहे म्हणून हा क्षोभ उसळला का? बहुतेक नाही. अशाच घटना याही पूर्वी झालेल्या आहेत. पूर्वीच्या शासनांनी, राजकीय पक्षांनी अशा कायदेशीर करारांना अधिकृतपणे पाठिंबा दिला आहे. हा एक नेहमीच्या रूटीन प्रशासकीय आखणीचा भाग होता. एका किंवा अनेक राजकीय पक्षांचे किंवा सामाजिक संघटनांचे त्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया किंवा पडसाद होते का?.

पश्‍चिम बंगाल आणि र्‍ण् - बाधीत उत्तर पूर्व प्रदेश सोडले तर भारताच्या इतर कोणत्याही प्रदेशात याबद्दल काही ताबडतोब घाईची प्रतिक्रिया देण्याचे काही कारण नव्हते. या संपूर्ण निषेधपर्वात कुठेही एकच नेता या सर्वांचे नेतृत्व करत नव्हता. हा क्षोभ मग देशातल्या एकुणात आर्थिक परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या बेकारी आणि मंदीचा परिणाम असावा का? बहुतेक हेही कारण नसावे. या गोंधळाच्या आणि धांदलीच्या परिस्थितीतसुद्धा भांडवली बाजाराचे निर्देशांक हे वाढत चाललेले होते. यावेळी रोटी-कपडा-मकानसारखे प्रत्यक्ष प्रश्‍नही मूर्त असे नव्हते. हा प्रतिसाद नेणिवेतून कार्यान्वित झाला होता. हा निषेध राजकीय किंवा आर्थिक नव्हता; तो ‘आपण लोक आहोत’ या नेणिवेतून उद्भवलेला होता.

जबरदस्तीने निर्णय घ्यायला मदतरूप होईल असे बहुमत, सरकारची बहुसंख्याक अभिमुखता, जम्मू आणि काश्मीर याची विभागणी, नागरिकत्व दुरुस्तीचा कायदा आणि भारतीय राष्ट्रीय नागरिक रजिस्टर (NRC)  बद्दलची अस्वस्थता आणि विद्यापीठांच्या कॅम्पसमधून विद्यार्थी प्राध्यापक स्थानबद्ध करणे, अटक करून तुरुंगात डांबून ठेवणे या सर्वांचा तो एकत्रित परिणाम होता. यात नागरिकांना जबरदस्तीने ‘राष्ट्र’ बनवले जात होते. राष्ट्र, देशभक्ती, देशद्रोह हे शब्द (संज्ञा) सार्वजनिकरीत्या लोकांच्या बोलण्यातून वारंवार येत आहेत; हे असे यापूर्वी कधी घडले नव्हते. लोकांना या शब्दांचा ओव्हरडोस झाला आहे. त्यामुळे त्यांच्या भावना या उद्दीपित झाल्या आहेत. या देशातल्या नागरिकांची मने या शब्दामुळे हेंदकळायला लागली आहे. त्यांच्या स्मृतीत आता केवळ एक राष्ट्र नव्हे तर आपण अनेक उप-राष्ट्रे आहोत अशा भावना निर्माण होऊ लागल्या आहेत. या वर्षीच्या हिवाळ्यातील आंदोलनाने केंद्र सरकारचा बराच मोठा कायदेशीर विश्‍वासार्हतेचा भाग हिरावून घेतला आहे आणि याउलट भारतीय राज्यांना तो मोठ्या प्रमाणात प्राप्त झाला आहे. कोणत्याही राजकीय विश्‍लेषण तज्ज्ञाच्या नजरेतून न सुटणारी बाब आहे. अजूनही काही अधिक घडले. NRC मुळे भारतीय नागरिक एका विचित्र कचाट्यात सापडले आहेत, यानिमित्ताने ‘आपण लोक आहोत’ या भावनेचा त्यांना पुन:स्पर्श झाला. हा निषेध अरब स्प्रिंग आंदोलनासारखा किंवा हाँगकाँगचा निषेध निश्‍चितच नव्हता; तो खास भारतीय होता. या निषेधामुळे भारतीयांना ‘आपण लोक आहोत’ त्याचे स्मरण झाले. हीच आपली ओळख आहे हेही त्यांना पुनश्‍च लक्षात आले. धर्म, भाषा, वांशिकता यापलीकडे जाऊन ज्या नियतीशी करार केला (ट्रस्ट विथ डेस्टिनी), ते लोक बोलले. भारतीय लोकांच्या पुन्हा धैर्यच्या प्राप्तीसाठी हे एकच कारण पुरेसे आहे.
- गणेश देवी
(अनुवाद : दीपक बोरगावे)

Wednesday, 18 December 2019

लोकशाहीच्या वृद्धीसाठी नव्या आशेचा किरण

मी चार-पाच वर्षांचा होतो तेव्हा माझ्या वडिलांनी रेडिओ घरी आणला. त्या घटनेला आता सहा दशके होऊन गेली आहेत. त्या काळात घरी रेडिओ असणे ही गोष्ट फार प्रतिष्ठेची असे.त्या रेडिओ-सेटचा ‘मेक’  मार्कोनी, फिलिप्स का अजून कोणत्या कंपनीचा होता, हे मला आज स्पष्टसं आठवत नाही. पण घरात आणल्या-आणल्या वडिलांनी तो लगेचच ‘ऑन’ केला, हे मात्र चांगलं आठवतं.  त्यात के. एल. सैगल, हेमंत कुमार, खुर्शिद आणि तलद मेहमूद यांची गाणी वाजायची. ही सारी गाणी आजही मला शब्दश: आठवतात. तेव्हापासून रेडिओवर  संगीताचे कार्यक्रम मी ऐकत आलो आहे. अर्थात, गाणी मी रेडिओ व्यतिरिक्त इतरही माध्यमातून ऐकत आलो आहे. घरातील ज्येष्ठ मंडळी काम करत असताना गुणगुणत असायची ती गाणी, सणासुदीला, लग्न समारंभात, घरात बारश्यामध्ये  ऐकायला मिळालेली गाणी, गावोगाव भटकणारे, शेतात खपणारे कष्टकरी  म्हणतात ती, लोणचे-पापड घालताना स्त्रिया म्हणतात ती  गाणी, किर्तन, भजन, भारूड, तमाशा या व अशा प्रसंगातून ऐकलेली गाणी. सर्वात मधुर म्हणजे बाळाला झोपवत असताना आया गुणगुणतात ती अंगाई.

बऱ्याच काळानंतर, मी जेव्हा माझ्या तिशीत होतो, तेव्हा पश्‍चिम भारतातील आदिवासी लोकांमध्ये मी काम करू लागलो होतो. बर्‍याचदा आमचे बोलणे त्यांच्या अस्मितेसंबंधी असायचे. बहुतेक आदिवासी अस्मितेच्या संदर्भात त्यांच्या गीत-परंपरेविषयी बोलायचे. तोपर्यंत मी मार्क्स, गांधी, आंबेडकर, लोहिया वाचले होते.  मला वाटायचे की, त्यांच्यावर (आदिवासींवर) होणार्‍या अन्यायामुळे आदिवासी अत्यंत संतप्त असतील, ज्या व्यवस्थेने त्यांना ही वेदना दिली, त्याबद्दल ते काहीतरी बोलतील. पण आदिवासींच्या बोलण्यात त्या बाबी क्वचितच यायच्या. मला त्याचे आश्‍चर्य वाटायचे. त्यांच्या बोलण्यात थेट राजकीय बाबी जवळपास नसायच्याच. ते जे काही बोलत असत त्याला ‘सांस्कृतिक’ म्हणता येईल. त्यांच्याबरोबर काम करताना माझा असंख्य आदिवासी समुदायांशी संबंध बनला होता. त्यातल्या काहींचे स्वत:चे महाभारत होते, व ते त्यांचे संपूर्ण महाभारत गाऊ शकतात, हा अनुभव मी घेऊ शकलो. गुजरात आणि राजस्थानच्या सीमेवर राहणार्‍या भिल्ल-आदिवासींची स्वत:ची अशी चार महाकाव्ये आहेत. ही गाणारी मंडळी संपूर्ण महाकाव्ये गातात. त्यातील एकही शब्द न गाळता त्याचे सादरीकरण करतात. मध्य भारतातील जंगलातील राज्यात भर्तरी जमातीचे काही आदिवासी माझ्या संपर्कात आले. त्यांना मी विचारल्यावर (केवळ मी विचारले म्हणून), एका राजाच्या आयुष्यावर आधारित संपूर्ण गीतरूप गोष्ट मला गाऊन दाखवली. ‘बंजारा’ समुदायातील माझ्या एका मित्राने मला सांगितले की त्यांच्यात लेहंगी नावाचा काव्य प्रकार असतो. मी सुचवले की त्याला जितक्या आठवतील,जशा माहीत असतील तशा त्या त्याने लिहून काढाव्यात. तो म्हणाला, जवळपास 6,000 ‘लेहंगी’ त्याच्या लक्षात आहेत. हे ऐकून मला फारसे आश्‍चर्य वाटले नाही, कारण यापूर्वी ‘नायक’ जमातीतल्या माझ्या एका मित्राने मला सांगितले होते की, त्याला त्यांच्या साहित्य-संस्कृतीतील 9,000 गाणी त्याच्या लक्षात होती आणि हा गाणारा पक्का. त्याचा आवाज जबरदस्त.  एका गाण्यानंतर दुसरे गाणे असे तो सलग ही ‘गाणी’ म्हणत असे. आजही ही गाणी आठवली तर, मी रोमांचित होऊन जातो. भारतीय समाजात ‘ट्राईब’ आणि ‘जात’ हे दोन वेगळ्या प्रकारचे समुदाय आहेत. जे ‘जाती’ आहेत ते ‘ट्राईब’ नाहीत आणि जे ‘ट्राईब’ आहेत ते ‘जाती’ च्या पिरॅमिडमध्ये नाहीत. मात्र हा फरक दोहोंच्यात असणार्‍या गीत-सोसामुळे नाहीसा होतो. संगीत प्रेमात हे एकत्र येतात.

माझ्याच वयोगटातल्या व्यक्तींबरोबर किशोरवयात आणि तारुण्यात असताना मी खूप प्रवास केला आहे. या प्रत्येक प्रवासात आम्ही एक खेळ खेळायचो, ज्याला आपण ‘अंताक्षरी’ किंवा ‘गाण्याच्या भेंड्या’ असे म्हणतो. तो कदाचित फक्त भारतीय आणि कदाचित आफ्रिकन्स, खेळतात. या खेळाला बोर्ड, बॅट, बॉल... कोणतीच साधनसामुग्री लागत नाही. यात केवळ एकाच गोष्टीची आवश्यकता असते आणि ती म्हणजे, तुम्हाला गाता आले पाहिजे. यात दोन टीम्स असतात. हा खेळ सतत खेळता येतो. याला अंत नसतो. या खेळात हार आणि जीत असे काही नसते. यासाठी कोणत्याही प्रशिक्षणाची गरज नसते, किंवा तुमचा आवाज खूप गोड वगैरे असावा अशीही अपेक्षा नसते. मला माहीत असलेला हा ‘अंताक्षरीचा खेळ’ कदाचित सर्वात लोकशाहीवादी असावा.

गाणी आणि गाणारे यांची भारताची ऐतिहासिक संस्मरणे समृद्ध आहेत; ती दुसर्‍या संस्कृतीतील मानकांच्या तुलनेत  कितीतरी जास्त समृद्ध आहेत. मध्ययुगीन कालखंडाचा आपण  जेव्हा विचार करतो तेव्हा जी नावे आपल्या समोर पटकन उभी राहतात ती म्हणजे कबीर आणि मीरा, जयदेव आणि चंडीदास, सूरदास आणि नानक, अक्का महादेवी आणि तुकाराम, त्यागराज आणि नरसी मेहता. यातील प्रत्येकजणानं श्रेष्ठ दर्जाची गाणी निर्माण केली आणि हे प्रत्येकजण आपापल्या कालखंडात वैशिष्ट्यपूर्ण गायक म्हणून ओळखले गेले.  त्यांच्यातल्या प्रत्येकाचे स्वतःचे असे विशिष्ट तत्त्वज्ञान होते. तरीही यातील प्रत्येकजण ‘प्रेमाचे गाणे’ म्हणणारे म्हणून भारताच्या स्मरणात राहिले आहेत.

‘रघुपती राघव राजाराम’ किंवा ‘वैष्णव जन तो तेणे रे कहिये’ ही गांधीजींना प्रिय असणारी भजनं प्रत्येक भारतीय केव्हा-ना-केव्हा  गायलेला असतो. यातून संगीताबद्दलची गांधीजींची आस्थाही जाणवते. रवींद्रनाथ टागोर यांची प्रतिभा एखाद्या विस्तृत-पटलाची होती;  तत्त्वज्ञान, शिक्षण, नाटक, राजकारण, कथा-कादंबरी, चित्र आणि काव्य यात स्वैर भरारी घेणारी होती. विसाव्या शतकातील भारतीय संस्कृतीवर त्यांची  अमिट छाप आहे. तथापि, रविंद्रनाथ टागोर लोकमानसात थेटवर रुजले त्याचे सगळ्यात जास्त श्रेय जाते रवींद्र संगीताला.

मोठ्या प्रमाणात स्मरणात राहिलेली गाणी आठवून गुणगुणण्याची सवय  ही सर्वसामान्य भारतीयांचा ‘म.सा.वि.’-- किमान गुण--असावा. भले तो कुठल्याही आवाजात, कसंही गाणं म्हणो; या बाबतीत भारताचा जगात पहिला नंबर लागेल यात शंका नाही. राजस्थानमधील सुफी, बंगालमधील बाउल, महाराष्ट्रातील वारकरी, आसाममधील बिहू गाणी आणि गुजरातमधील प्रत्येक तरुण आणि तरुणी ज्या उत्साहाने गरबा नृत्यात गाणी म्हणत सहभागी होतात हे ऐकल्यावर/पाहिल्यावर, आपण सारेजण गाणी आणि संगीतावर अत्यंतिक प्रेम करणारे आहोत हे स्पष्ट  होते.  यातून एक राष्ट्र म्हणून आपली अस्मिता निश्‍चित झाली आहे. मज्जासंस्थेच्या किंवा मेंदुच्या विकारांवर उपचार करणार्‍या तज्ज्ञांच्या मते, मेंदूमध्ये भाषा आणि संगीत याच्या आकलनाची दोन वेगवेगळी केंद्रे असतात: एका भागात भाषेची जाण आणि तर्कबुद्धी तर, दुसर्‍या स्मरणभागातील एका कप्प्यात संगीत लयींचे आलेख कोरलेले असतात. ‘गाण्याचा तुडवडा’ असणार्‍या दुसर्‍या संस्कृतीतील लोकांच्या मनांपेक्षा भारतीय मन हे ‘अतिरिक्त गाण्यांना’ आणि भाषेच्या गारुडाला प्रतिसाद देणारे आहे, हे विधान जरी थोडे धाडसाचे असले तरी, ते सर्वसाधारण तर्काला धरून आहे असे वाटते. वसाहतवादामुळे प्रत्येक तर्काधिष्ठित आणि सर्जन क्षेत्रात आपली अभिरुची बदलत गेली, पण भारतात संगीताची अभिरुची बहुतांशी तीच राहिली आणि आपण त्याच्याशी वसाहतवादी कालखंडात आणि नंतर सुद्धा निगडीत राहिलो.   विशेषत: उत्तर-वसाहतीक कालखंडात सिनेमा नावाची आधुनिक गोष्ट आपल्याकडे आली; ही कला संपूर्णत: तंत्राधिष्टीत गोष्टींवर आधारलेली होती. या आधुनिक कलेला आपण मनापासून स्वीकारले आणि यात आपण ताबडतोब गाण्याचा बेसुमार वापर करायला सुरुवात केली. सिनेमातली ही गाणी आपल्यासाठी अधिकच  महत्त्वाची ठरली. शिवाय ती बर्‍याचदा आपल्या सामुदायिक कृतीच्या केंद्रस्थानी राहिली. एक मध्य पूर्व देशातील चित्रपट अपवाद म्हणून सोडला तर, ही गोष्ट जगामध्ये इतरत्र कोणत्याही सिनेमा इतिहासात  घडलेली आपणांस दिसत नाही. त्यामुळे ‘गीत’  भारतीय महासंस्कृतीचे खास वैशिष्ट्य, गुणविशेष किंवा अंग आहे, असे म्हटले तर यात फारसे चुकीचे नाही.

गेल्या महिन्यात जेव्हा बेंगलोरमध्ये अनेक ठिकाणी ग्राफिटी (graffiti, सार्वजनिक ठिकाणी भिंतींवर वगैरे काढलेली चित्रे किंवा लिहिलेला मजकूर, भित्तिचित्र, भित्तिलेख, भिंती चितारणे वगैरे) लिहिल्या जात आहे हे समजल्यावर, हे वर नोंदवलेले विचार माझ्या मनात आले. या ग्राफिटीचा संदर्भ असा होता :  रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्समध्ये  जे गाण्याचे लाईव्ह कार्यक्रम होत असतात ते बंद करून त्याबद्दल कठोर आणि कडक कारवाई केली जाईल अशा आशयाच्या सूचना कर्नाटक सरकारने दिल्या. त्याच्या प्रतिकारासाठी ग्राफिटी आली. लोकांनी या अशा कारवाईबद्दल या ग्राफिटींमधून सरकारला काही संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. ‘संगीत मुक्त करा, सरकारचे नियंत्रण नको, संगीत हा लोकांचा आत्मा आहे, त्याला तुम्ही लोकांपासून हिरावून घेऊ नका’ अशा प्रकारच्या ग्राफिटीज लोकांनी लिहिल्या होत्या. अचानकपणे बेंगलोरमधील महात्मा गांधी मार्ग, म्युझियम मार्ग, लॉवेलं आणि सेन्ट-मार्कस मार्ग या महत्त्वाच्या रस्त्यांवर या ग्राफिटीज झळकायला लागल्या. आजची तरूणाई ही या रस्त्यांवरून बहुतांशी नजरेस पडते. ज्या पोलिस यंत्रणेने या तरुणाईचे संगीत बंद केले होते, ते लिहू लागले होते, 'Remember to forget, Four Ders, Sammzie, Rastad, King Turac, Guess who, King and Zero’ यांचा उद्घोष सुरू झाला. आणि या ग्राफिटीबद्दलचा राज्यसंस्थेचा प्रतिसाद काय होता, तर हा उद्योग कोणी केला? याचा शोध राज्यसंस्था घेऊ लागली आणि त्यांना कस्टडीत ठेवण्याची तयारी करू लागली. ‘गाण्या’ बद्दलची आस्था असणार्‍या कोणत्याही भारतीयाला हे समजणे कठीण नाही की, हा निषेध ‘गाणी’, ‘संगीत’ किंवा इंद्रिय सुखाबद्दलचा नव्हताच. या निषेधाचा  मतितार्थ हा खोलवर जाणार आहे आणि उघड उघड प्रगतिशील राजकारणाचा आहे.  इ. स. 2000 च्या आसपास जन्माला आलेल्या या नव्या तरुण पिढीकडून आलेला हा प्रश्‍न आहे. सांस्कृतिक प्रश्‍नांची चिकित्सा करणार्‍या समीक्षकासमोर हा बेंगलोरमधल्या ग्राफिटीचा प्रश्‍न ठेवला तर, याबद्दलचे काय विवेचन असू शकते? अलिकडेच महाराष्ट्र आणि हरियाणा येथील जनतेने सत्ताधारी पक्षाला त्यांची जागा दाखवून दिली आणि याचदरम्यान तरुणाईची ही ग्राफिटी बेंगलोरमधील रस्त्यांवर उमटलेली दिसते. हा काही योगायोगाचा भाग नाही. हा केवळ भाषण, लेखन, इ. कोणत्या तरी हेतूने केलेला पक्षपाती स्वरुपाचा राजकीय मतप्रदर्शनाचा किंवा प्रवृत्तीचा हेतुपुरस्सर भाग आहे म्हणून याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. बेंगलोरमध्ये येऊ लागलेले हे ग्राफिटी लेखन सत्ताधार्‍यांना  अधिक बारकाईने वाचावे लागेल. हे असे अजुनी एक ’गाणे’ लोकशाहीच्या वृद्धीसाठी. या नव्या  गीत-आंदोलनांत एक नव्या आशेचा किरण दिसतोय.

- गणेश देवी
भाषांतर : दिपक बोरगावे

(What unites indians is a love for songs' - The Telegraph - 1.11.19 या मूळ इंग्रजी लेखाचे मराठी भाषांतर)

Tuesday, 17 December 2019

शौकत कैफी आझमी आनंदोत्सव


अनेक संस्कृतीत जन्माप्रमाणे मृत्यूचाही उत्सव केला जातो. मरण हे मानवी वास्तव जीवनाचा भागच आहे. परंतु मृत माणसांच्या आठवणी त्याच्या चांगल्या स्मृती व कार्य यांची आठवण म्हणजे सेलेब्रेशन होय!

26 नोव्हेंबर, 2019 रोजी मुंबईत जलाराम सभागृह, विलेपार्ले येथे शौकत कैफी आझम यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. या श्रद्धांजली सभेला आझमी कुटुंबीयांच्या कल्पक आयोजनामुळे आनंदोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते. शबाना आझमी, बाबा आझमी या शौकतच्या मुलांनी आणि कुटुंबीयांनी अभिनव पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित करून सर्वांना मोहित केले.
सुप्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल, राकेश रोशन, अभिनेत्री काजोल व तब्बूसह अनेक सहकलाकारांनी शौकतजींना आदरांजली वाहिली.

शौकत आझमी यांचे व्यक्तिमत्त्व भारदस्त होते. त्या स्वत: कलावंत होत्या व त्यांना अभिनय संगीत, कविता यांची चांगली जाण होती व चांगले जीवन जगण्याची कलाही त्यांना अवगत होती. हैद्राबाद संस्थानाच्या मोठ्या अधिकार्‍याची मुलगी लखनऊच्या जमीनदार घराण्याचे बंडखोर शायर असलेल्या कैफी आझमी यांच्या प्रेमात पडली. खरं पाहता आधी त्यांच्या शायरीच्या व नंतर शायरच्या प्रेमात पडली असे म्हणणे जास्त योग्य होईल. स्वभावच बंडखोर असलेल्या शौकतजींनी घरातला विरोध मोडून काढला व आपल्या वडिलांना मुंबईत येऊन 40रु. महिना घेऊन खोलीत कम्युनमध्ये राहणार्‍या कैफी आझमीशी लग्न करून देण्यास भाग पाडले! हे तत्कालीन समाज स्थितीत मोठे क्रांतिकारीच होते! अत्यंत सुस्थितीत राहणारी ही मुलगी मुंबईत एका खोलीत कम्युनमध्ये राहण्यास आली! लखनऊ व हैद्राबाद या दोन शहरांना तत्कालीन काळात गंगा-जमुना तहजीब म्हणत असत, म्हणजे, ती हिंदू-मुस्लीम एकत्र राहण्याची शहरे होती व त्याचा प्रभाव आयुष्यभर त्यांच्यावर होता. कम्युनिस्ट नसलेली ही महिला आपल्या प्रेमासाठी कम्युनिस्ट झाली व अंतापर्यंत चांगली कम्युनिस्ट म्हणून जगली तिची जीवनमूल्ये इतरांना प्रेरणादायी ठरली.

कार्यक्रमाची सुरुवात सतारवादनांनी व नंतर आझमी कुटुंबीयांचाच घनिष्ठ स्नेह असलेल्या सिंग या प्रतिभावान गायकाच्या गाण्याने झाली, कैफी आझमीची एक लम्हा, ही गझल व नंतर मिर्झा गालिब, शौकत आझमी यांची आवडती गझल गाऊन या गायकाने रंगत आणली व मैफल जमवली. शबाना आझमीने आपल्या निवेदनात आपल्या आईवडिलांच्या अनेक आठवणी जागवल्या.

शौकत आझमी दररोज सकाळी तब्येतीत चहा घेत असत! त्यावरून कैफीनी ‘तुम कुछ ना कहो, मैं कुछ ना कहुँ’, ही गझल लिहिली होती. शबाना यांनी आपल्या वडिलांची व शौकतजींना गप्प करण्याची इच्छाच या निमित्ताने व्यक्त केली असे सांगितले.

शौकत आझमी यांनी ‘‘कैफी आणि मी’’ हे पुस्तक लिहिले. ते इंग्रजीत आले. तेव्हा नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांनी त्या बद्दल फारच चांगले लिहिले. ते आपल्या आईला वाचून दाखवल्यावर त्यांनी हे अमर्त्य सेन कोण? असे विचारले शबानाने ते मोठे अर्थतज्ज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते आहेत, हे सांगितल्यावर सायंकाळी शौकत जी 16 साड्या विकत घेऊन आल्या! शबानाने हे काय? मी पण एवढ्या साड्या एकदम आणल्या नाहीत हे सांगितले! त्यावर तुझी स्तुती अमर्त्य सेन यांनी केली का? असा प्रश्‍न विचारून आपला आनंद शौकतजींनी व्यक्त केल्याची आठवणही शबानाने सांगितली.

सुप्रसिद्ध ड्रेस डिझाईनर भावना सोमय्या या शबाना आझमीच्या मैत्रिणी आहेत. तसेच त्या कुटुंबांच्या सदस्यदेखील! त्यांनी शौकतजीच्या साडी प्रेमाबद्दल, मॅचिंगच्या त्यांच्या आग्रहाबद्दल सांगतानाच, मला साडी नेसव, लिपस्टिक पावडर लाव, चादर नीट कर, कारण डॉक्टर येणार आहेत असे सांगणार्‍या एका वेगळ्याच व्यक्तिमत्त्वाची शौकतजीची ओळख करून दिली. इप्टाचे जावेद आनंद यांनी त्यांच्या कलाकार म्हणून असलेल्या कामगिरीची व उच्चदर्जाच्या अभिनयाची माहिती दिली. विशेषत: भूमिकेत समरस होणार्‍या त्यांच्या अभिनयाच्या ताकदीची उदाहरणे त्यांनी उमरावजान व इतर चित्रपटातील अभिनयाची उदाहरणे दिली.

शौकतची सून व त्यांची मुलगी तन्वी आझमी यांनी आपल्या सासूबद्दल अनेक छोट्यामोठ्या घटना सांगून त्यांचे व्यक्तित्व उलगडले. विशेषत: लग्न झाल्यावर कैफीजींनी स्त्री स्वातंत्र्य, सक्षमीकरण, व्यक्तिमत्त्व विकास याबद्दल सतत बोलणार्‍या  सासूपासून सावधान राहण्याचा दिलेला इशारा फारच  महत्त्वाच्या पैलूंची आठवण करून देणारा ठरला.

जावेद अख्तर या त्यांच्या जावयाने फारच चांगल्या व योग्य तर्‍हेने शौकतजीच्या व्यक्तित्वाचा आढावा घेतला. अखंड प्रेमात पडलेली स्त्री, वाहत जाऊन शेवटी दासी वा गुलाम होते. परंतु शौकतजींनी ते होऊ दिले नाही. त्यांनी शैलीवर, त्यांच्या काव्यावर जिवापाड प्रेम केले. 55 वर्षे त्यांना साथ दिली. स्वतंत्र व्यक्तिमत्त्व व ओळख कायम ठेवली. हे त्यांचे जगणे अवघड परंतु तेवढेच महत्त्वाचे होते.

त्यांना खोटे बोलणे जमायचे नाही. त्यामुळे सलीम-जावेद यांचा ‘इमान धरम’ हा चित्रपट चालणार नाही. हे त्यांनी स्पष्टपणे जावेद अख्तर, यांना त्याचा खास शो पाहिल्यावर सांगितले होते. त्यानंतर काही आठवड्यांनी जावेद अख्तर हा प्रसंग विसरले असताना, ‘त्रिशूल’ या चित्रपटाचा शो पाहून त्यांनी जावेद यांना हा चांगला चित्रपट आहे, असे आवर्जून सांगून, जुन्या इमान-धरमच्या वेळी केलेल्या व्यक्तव्याची आठवण करून दिली.

एका जीवनपटात शबाना यांनी नेसलेली साडी व ब्लाऊज यांच्या बद्दल काय बेकार मॅचिंग आहे असे सर्वांसमोर त्यांनी आपले मत मांडण्याचा किस्साही सांगितला. त्या आजारी असताना त्यांच्या नातीने त्यांची केलेली देखभाल ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वासाठी प्रेमाच्या आठवणी ठरल्या. या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.

हिंदू-मुस्लीम असा भेद न मानणारे हे कम्युनिस्ट कुटुंब आहे. याची जाणीव जेव्हा शबानाजींना झाली तेव्हा त्यांनी सर्वांना नमस्कार न करता लाल सलाम केला.

या आदरांजली सभेला कॉ. सुरेश धोपेश्वरकर, कॉ. राजन बावडेकर, कॉ. प्रकाश रेड्डी, कॉ. चारुल जोशी व इतर अनेक पक्ष व इप्टा सदस्य उपस्थित होते.

- डॉ. भालचंद्र कानगो

माणगाव परिषद : बहिष्कृतांचे रणशिंग - उत्तम कांबळे

'अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद ’ हा उत्तम कांबळे यांचा ग्रंथ ‘ लोकवाङ् ‌ मय गृह ’ तर्फे लवकरच वाचकांच्या भेटीसाठी येत आहे. एका ऐति...