2

आपल्या ‘व्हॉटस्ॲप’वर नियमितपणे लेख मिळविण्यासाठी 85 30 52 85 50 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून, त्यावर आम्हाला ‘हॅलो’ असा मॅसेज पाठवा.

Thursday, 7 November 2019

93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आश्वासक निवड


ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची उस्मानाबाद येथे होणार्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. ही बातमी कळताच वसईकरांमध्ये आणि मराठी सारस्वतात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. निवड समितीच्या या निर्णयाचे महाराष्ट्रात सर्व स्तरांवरून स्वागत झाले. मराठी साहित्यातील ते एक वाचकप्रिय लेखक, संत साहित्याचे अभ्यासक, क्रियाशील संपादक, पर्यावरणाच्या रक्षणासाठी झटणारा भूमाफियाविरुद्ध आवाज उठवणारा सजग कार्यकर्ता म्हणून ओळखले जातात. आजच्या उन्मादी काळात संत साहित्याशी नाते असणार्या साहित्यिकाची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणं खूपच दिलासादायक आश्वासक आहे अशा सकारात्मक प्रतिक्रिया अनेकांनी नोंदवल्या. फादर यांच्या निवडीचं असं दमदार स्वागत होण्याला फादर यांचं साहित्यविचार आणि त्या विचाराला असलेली कृतिशीलतेची जोड कारणीभूत आहे. ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊलेम्हणूनच फादर यांच्याकडे रसिक वाचकांचा आणि सामाजिक चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा इतका ओढा आहे.

1972 साली कॅथलिक पंथीय ख्रिस्ती धर्मगुरुपदाची दीक्षा घेतल्यानंतर केवळ देवळातला पुजारी होता प्रार्थनेला  कृतीची जोड देत त्यांनी ईश्वरसेवेतून जनसेवेचा मार्ग स्वीकारला.

जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले
तो ची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा

या संत तुकारामांच्या वचनानुसार माणसाच्या व्यथा वेदनांना  त्यांनी आपल्या लेखनात आणले. ‘दु:खिताचे तिमिर जावोया प्रेरणेने त्यांनी आपले लेखन केले. फादर यांच्या लेखनविचार आणि कृतीत संत साहित्यातील माधुर्य विचार आणि येशूख्रिस्ताची करुणा याचा अपूर्व मिलाप पाहायला मिळतो. याच्या संंयोगातून, त्यांंच्या लेखनातून आलेलं माधुर्य आणि लेखनातून व्यक्त झालेली करुणा म्हणजे मराठी सारस्वताला मिळालेली अनमोल अशी देणगी आहे.

निसर्गसंपन्न वसईतील नंदाखाल येथे जन्म झालेल्या फादर यांनी निसर्गाकडून काय घेतले असेल तर ते म्हणजे निसर्गाची प्रसन्नता. ही प्रसन्नता त्यांच्या लेखनात उतरली. भारतीय संत साहित्याचा अभ्यास आणि ख्रिस्ती धर्माचे तत्त्वज्ञान यातून मिळालेल्या मानवी दु:खाचा कळवळा, विचारांची चौफेर बैठक आणि स्पष्टता आणि शब्दावरची अपार श्रद्धा, निसर्गाकडे पाहण्याचा मानवतावादी दृष्टिकोन अशा संस्कारांंनी त्यांना लिहिते केले. जैसी पुष्पांमाजी पुष्प मोगरी परिमळांमाजी कस्तुरी तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी अशा शब्दात मराठी भाषेचा गौरव करणार्या फा. स्टिफन यांचा वारसा फादर यांनी समर्थपणे पेलला.

वसईतल्या निसर्गाची प्रसन्नता आणि इथल्या झाडा फुलांचा सुवास त्यांनी आपल्या लेखनातून जगभर पसरविला. ‘तेजाची पाऊले’, ‘सृजनाचा मोहोरया संग्रहातील  प्रासादिक शैलीतील ललितलेख वाचून पु. . देशपांडे यांनी, ‘या लेखांना वसईच्या मळ्यांचा’, ‘जीवनाचा गंध येत आहे.’ असे गौरवोद्गार काढले होते.

साहित्य चंद्रावर बसून लिहिले जात नाही. समाजाविषयी आस्था बाळगून समाजातील व्यथा, वेदना, प्रवाह, आंतरप्रवाह यांची नोंद साहित्यात घेतली पाहिजे. माणसाच्या दु:खाला, वेदनामय मौनाला उद्गार देणारं साहित्य निर्माण व्हायला हवे. साहित्याचं कोणतंच टेक्स्टबुक नाही माणूस आणि त्याचं जगणं हेच साहित्याचं टेक्स्ट आहे.’ असे मानणार्या फादर यांनी   माणसाच्या आयुष्याला स्पर्शून आणि निसर्गाचे अनेक विभ्रम अनुभवत केलेल्या चिंतनाचा आविष्कार त्यांच्या साहित्यातून केला. निसर्ग माणसाला खूप काही शिकवितो असे मानून  निसर्गाची भाषा जाणणार्या फादर यांनीवेदनेचे गाणेया साधनासाठी लिहिलेल्या लेखात कोकिळेच्या गुंजनातून मानवी मूल्यांचे होणारे अवमूल्यन रेखाटले आहे. निसर्गावर अपार प्रेम असणार्यालाच निसर्गाची मानवासाठी असलेली कु हू कु हू ऐकता आली.

शब्द बापुडे पोकळ वारानसूनप्रारंभी शब्द होता...’ या बायबल वचनाला अनुसरूनआम्हा घरी शब्दाचीच रत्ने...’ असे अलोट शब्दधनाचे भाग्य लाभलेले फादर गेले अर्ध शतकाहून अधिक काळ शब्दांंची उपासना करीत आहेत. ही उपासना केवळ देवळातल्या उपासनेसारखी नाही. 

नव्वदच्या दशकात भूमाफिया सत्तेचा गैरवापर करून वसईच्या निसर्गसौंदर्याला धक्के देणारे निर्णय घेऊ लागले होते. दहशत पसरवून लोकांच्या जमिनी लुटणे, पाणीउपसा, विकास आराखडा लादून निसर्गाचा गैरफायदा घेण्याचे षङ्यंत्र रचले जात होते, विकासाच्या नावाखाली निसर्गाचा होऊ घातलेला विनाश निसर्ग वाचू-अनुभवू शकणार्या फादर यांनी ओळखला. मी जिथे जातो, तिथे मला निसर्ग खुणावतो असे म्हणणार्या फादर यांना निसर्गाच्या हाका ऐकू येत असाव्यात. त्या त्यांनी ऐकल्या. भूमाफियांच्या संगनमतीने राज्यकर्त्यांनी वसईवर लादलेला विकास आराखडा वसईच्या संस्कृती आणि पर्यावरणावर दूरगामी परिणाम करणारा आहे हे दूरदृष्टी असलेल्या फादर यांनी वेळीच ओळखले. त्या काळात माफियांच्या, गुंडाच्या दहशतीविरोधात ब्र काढण्याची हिंमत नसताना फादर त्याविरोधात खंबीरपणे उभे राहिले. प्रवचन आणि प्रबोधन करून पुरेसे नाही, प्रत्यक्ष कृती केली पाहिजे, भक्तीचे रूपांतर सामाजिक बांधिलकीमध्ये झाले पाहिजे, असा उदात्त विचार करून, सुवार्तेच्या माध्यमातून. ‘नाठाळांच्या माथी हाणावी काठीया उक्तीनुसार निसर्गाची लूट करण्याचा कट रचणार्या आणि जमिनी लाटण्यासाठी दहशत निर्माण करणार्या विरोधात त्यांनी आपली लेखणी सिद्ध केली. हरित वसई संरक्षण समितीच्या माध्यमातून हरित वसईची समृद्धी टिकून राहावी म्हणून समविचारी सहकार्याच्या साहाय्याने लोकलढा उभा केला. यासाठी त्यांना अनेक लोकांचा, महाराष्ट्रातील अनेक साहित्यिकांचा, चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळाला. फादर यांनी लावलेली पर्यावरणविषयक जाणिवांची ही ज्योत आम्हा वसईकरांच्या मनात आजही प्रज्वलित आहे. आजही फादर वसईतल्या पर्यावरण चळवळीचे खंदे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या प्रेरणेने सातत्याने निसर्ग संवर्धनासाठीचा लढा अनेक तरुण सकारात्मक विचाराने लढत आहेत.

पथिकाची नामयात्राया अनुवादित पुस्तकांपासून सुरू झालेली त्यांची लेखनयात्राआनंदाचे तरंग’, ‘मदर तेरेसा’, ‘पॉप दुसरे जॉन पॉल’, ‘मुलांचे बायबलअशा धार्मिक पुस्तकांपासून पुढे धर्मधर्मचिकित्सता करणारापरिवर्तनासाठी धर्महा लेखसंग्रह; सूक्ष्म निरीक्षण लालित्यपूर्ण शैलीतीलओअॅसिसच्या शोधात’, ‘संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची ही प्रवासवर्णने; ‘सृजनाचा मळाअशा विविध वाङ्मय प्रकारात स्वत:चा ठसा उमटवत आहे.

त्यांनी   बायबलचा केलेला सुबोध अनुवादावर महाराष्ट्रात सर्वधर्मीय वाचकांची पसंतीची मोहोर उमटली आहे. या कामासाठी त्यांना साहित्य अकादमीने उत्कृष्ट अनुवादाचा पुरस्कार देऊन गौरविले आहे. ज्ञानोबा तुकोबा पुरस्कार त्यांना संताच्या भूमीत  आळंदी येथे प्रदान करण्यात आला. तसेच अनेक मानाच्या पुरस्काराने त्यांना आतापर्यंत सन्मानित करण्यात आले आहे. ‘नाही मी एकलाअसे म्हणत फादर यांनी आपल्या  साहित्यिक  प्रवासात  वसईकर जनतेला आपल्यासोबत घेतले. 20  वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांनी सुवार्तेच्या संपादकपदाची धुरा सांभाळली. त्यांच्या या कार्यकीर्दीत त्यांनी वसईतल्या कॅथलिक समाजाचे मुखपत्र असलेले सुवार्ता मासिक  महाराष्ट्रभर पोहोचवले. साहित्यिक प्रबोधनाची जवळपास अडीच दशके यशस्वी धुरा सांभाळत त्यांनी खर्या अर्थाने वसईचे सांस्कृतिक नेतृत्व केले. 

त्यांनी चालविलेल्या चळवळीने वसईचा सांस्कृतिक वारसा अधिक समृद्ध केला. उपासकालीन व्याख्यानमाला, सुवार्ता साहित्य मेळावा, वाचक मेळावा यासारखे अनेक उपक्रम त्यांनी राबविले. लोकाभिमुख केले. त्यांना लोकाश्रय मिळाला. त्यांच्या साहित्याने वसईला महाराष्ट्राच्या साहित्यिक, सांस्कृतिक पटलावर आणले. वसईकरांना साहित्याच्या अधिक समीप आणले. अनेकांना साहित्याची आवड निर्माण झाली. अनेक तरुण लिहिते झाले, या विचारांच्या उत्सवातून, देवाणघेवाणीतून वसईतील प्रबोधनाची परंपरा आणि निसर्गविषयक आस्था आताच्या तरुणांपर्यंत झिरपत आली आहे, त्यामुळेच  प्रबोधन उपक्रमाचा वारसा, निसर्ग रक्षणाचा लढा तरुण पुढे नेत आहेत, जपून ठेवत आहेत, त्याचे प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक फादर आहेत.

सध्या जगभर आणि देशभर धार्मिक उन्मादी वातावरण निर्माण झाले आहे, या परिस्थितीत फादर यांच्यासारख्या व्यक्तीची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणं दिलासादायक आणि आश्वासक असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. कारण आधुनिक काळात धर्म संघर्षासाठी नसून परिवर्तनासाठी आहे अशी फादर यांची भूमिका आहे. धार्मिक उन्माद हा विशिष्ट लोकांनी आपल्या स्वार्थासाठी कृत्रिमरीत्या निर्माण केलेला आहे. मात्र अनेक धर्म हजारो वर्षे येथे नांदत आहेत, परस्परविरोधी तत्त्वज्ञान, उपासना पद्धती भिन्न असूनही भारताची सहिष्णुता आपण जपली आहे, जोपासली आहे. सहिष्णुता, करुणा, सहभाव, बंधुत्व, क्षमाशीलता आणि मानवता या मूल्यांचा आग्रह धर्माने धरला पाहिजे असे मानून त्यासाठी त्यांनी सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि धार्मिक अशा विविध प्रकारच्या उपक्रमातून स्वत:ला समाजाशी, अन्य धर्मीयांशी जोडून घेतले आहे. धर्मांधतेच्या विषयावर सर्वधर्ममैत्री आणि सर्वधर्मसंवाद हा फादर यांचा कृतिशील विचार आजच्या काळात फार महत्त्वाचा  ठरणार आहे, या संवादासाठी ते आग्रही आणि प्रयत्नशील आहेत.

भारताच्या एकात्मता संवाद आणि मैत्रीच्या आधारावर टिकून राहील असा त्यांना विश्वास आहे त्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमातून संवादासाठी वेगवेगळे प्रयोग ते राबवीत आहेत..

अनेक अन्य धर्मीय व्यक्ती, संस्था, संघटना यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्या संवादी उपक्रमांना त्यांना चांगला प्रतिसादही मिळाला आहे. पुणे येथीलजंगली महाराज मंदिरआणि मुंबई वरळी येथीलहनुमान मंदिरयेथे त्यांनी प्रवचनं दिली आहेत. वसईतील वाघोली येथील एका मंदिरात त्यांनी ज्ञानेश्वर माऊलीने जगाच्या कल्याणासाठी मागितलेल्या पसायदानाचे निरूपण केले, त्याला श्रोत्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता.

अनेक संस्था, व्यक्ती, चळवळीतील कार्यकर्त्यांना फादर नेहमी आपले वाटत आले आहेत. या सर्वांना फादर यांनी नेहमीच आपला कृतिशील पाठिंबा प्रोत्साहन दिले आहे.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडीबाबत फादर यांना विचारले असता फादर यांनी, ‘मला गुरुवर्य असलेल्या  कुसुमाग्रज, पु..देशपांडे यांच्यासह अनेक दिग्गजांनी आतापर्यंत हे पद भूषविले आहे. मला माझ्या मर्यादांची जाणीव आहे म्हणूनच ही निवड माझ्यासाठी अनपेक्षित आहे, तरी या पदाचा बहुमान मिळाला याचा मला आनंद आहे.’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्याबरोबरच संमेलन साधेपणाने व्हावे आणि साहित्य संमेलन केवळ दोन-तीन दिवस चालणारे नसते तर ते अखंड चालूच असते असेही मत नोंदवले आहे.

सुबोध बायबलच्या मनोगतात फादर यांनी स्वत:च्या लेखनकामाविषयी म्हणताना
मी तो हमाल भारवाहीअसे म्हटले आहे. म्हणजेच आपण आपले कर्तृत्व करीत राहावे, आपण आपली भूमिका निष्ठेने पार पाडावी, हीच आपल्या धर्माची शिकवण आहे अशी कर्तृत्वनिष्ठ भूमिका फादर यांनी सातत्याने घेतली आहे आणि त्यामुळेच फादर यांंना अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विराजमान होणं मराठी साहित्य परंपरा अधिक समृद्ध करणारं ठरेल, असा विश्वास अनेकांना वाटत आहे.                   

- फेलिक्स डिसोजा

Friday, 13 September 2019

ॲटनबरोंचे गांधी...


गांधींसारखा एक हाडामासाचा चालताबोलता माणूस या पृथ्वीवर होऊन गेला यावर येणार्या पिढ्यांना विश्वास ठेवणे अवघड जाईल किंवा यावर येणार्या पिढ्या विश्वास ठेवणार नाहीत. अशा आशयाचे अल्बर्ट आईनस्टाईन यांचे गांधीजींबद्दलचे एक विधान प्रसिद्ध आहे. आपण सर्वांना सर्वसाधारणपणे हे विधान वाचून वा ऐकून माहीत असते. परंतु, अल्बर्ट आईनस्टाईन सारख्या व्यक्तीला असे का म्हणावेसे वाटले असेल याचा विचार आपण करत नाही. दुसर्या बाजूने गांधी हे अनुल्लेखाने मरता येईल असेही व्यक्तिमत्त्व नाही. विशेष म्हणजे गांधीजींबद्दल एकच एक असा मतप्रवाह किंवा विचारप्रवाह आज या देशात अस्तित्वात नाही. अनेक मतमतांतरांमधून आणि विचारांमधून गांधी आपल्या समोर येत असतात. यात प्रामुख्याने साहित्यिक आणि लिखित माध्यमाचा वाटा खूप मोठा आहे. चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी मालिका असा इतर माध्यमाचा वाटा फार कमी आहे. तर यातील चित्रपट माध्यमाबद्दल आपण आढावा घेऊ.

मोहनदास करमचंद गांधी ऊर्फ बापू ऊर्फ राष्ट्रपिता महात्मा गांधी हे सर्वार्थाने एक 'Larger Than Life' व्यक्तिमत्त्व. तरीही आजपर्यंत जेमतेम दहा चित्रपट गांधीजींच्या जीवनकार्यांवर तयार केले गेले आहेत. त्यातही पहिले दोन मुख्य चित्रपट ब्रिटिश दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी तयार केले आहेत. या सर्व चित्रपट निर्मितीचा काळ आहे 1963 ते 20011 पर्यंतचा. यातही स्वातंत्र्यानंतरची जवळपास 50 वर्षे एकही भारतीयाने गांधीजींवर चित्रपट निर्मित किंवा दिग्दर्शित करण्याचा प्रयत्न केला नाही. गांधीजींच्या मृत्यूनंतर 16 वर्षानेनाईन अवर्स टू रामाहा चित्रपट 1963 मध्ये मार्क रॉबसन यांनी निर्मिती आणि दिग्दर्शन केलेला हा पहिला चित्रपट होता. त्यानंतर पुढे 19 वर्षाने रिचर्ड अॅटनबरो यांचागांधीहा  निर्मिती आणि दिग्दर्शन केलेला दुसरा चित्रपट प्रदर्शित झाला जो खर्या अर्थाने गांधीजींवरचा सर्वश्रेष्ठ चित्रपट मानल्या जातो.

1962 मध्ये एका सामाजिक उपक्रमात लंडनमधील भारतीय नागरी सेवेचे अधिकारी मोतीलाल कोठारी यांची रिचर्ड अॅटनबरो यांच्याशी भेट झाली. मोतीलाल यांनी अॅटनबरो यांच्याकडे गांधीजींवर चित्रपट बनवण्याचा आग्रह धरला. ॅटनबरो यांनी गांधीजींबद्दल अगदी जुजबी, शाळेच्या मुलाएवढी माहिती आहे असे म्हणून टाळले. मोतीलाल यांनी अॅटनबरो यांना गांधीजींबद्दलची अनेक पुस्तके वाचायला दिली. त्या वाचनाने ऍटनबरो प्रभावित झाले आणि त्यांनी चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. मात्र पुढचे काम एवढे सोपे नव्हते. ॅटनबरो यांच्या ओळखीतले कुणीही पैसे गुंतवायला तयार नव्हते.

सामाजिक उपक्रमांना भरघोस देणगी देऊन देऊन अॅटनबरो यांचाही खिसा रिकामा झाला होता. मात्र गांधीजींच्या जीवनकार्य आणि विचाराने रिचर्ड एवढे प्रभावित झाले होते की त्यांना चित्रपटाचा निर्मितीखर्च कमी करण्याची निर्मात्याची अट मान्य नव्हती. त्यांनी हार मानली नाही. प्रयत्न सुरू ठेवले. तब्बल वीस वर्षे रिचर्ड हे स्वप्न साकार करण्यासाठी झटत होते. चित्रपट करण्याचे ठरविल्यानंतर त्यांनी स्वत: गांधीजींबद्दलचे वाचन सुरू केले. डी. जी. तेंडुलकर यांचे महात्मा : मोहनदास करमचंद गांधी यांचे जीवनकार्य या पुस्तकाचे आठ भाग वाचून काढले. लुईस फिशर यांचे लाइफ ऑफ महात्मा गांधी हे पुस्तक वाचले. याच फिशर यांच्या पुस्तकातील प्रसंगावर गांधी या चित्रपटाची मूळ कथा आधारित आहे. फिशर यांचे पत्रकार म्हणून एक पात्रही चित्रपटात आहे. जे गांधी या व्यक्तिमत्त्वाच्या ‘Spirit’ चा अनुभव आपल्याला देतं. हे काम आपल्या आवाक्याबाहेर जातंय असं लक्षात आल्यावर अॅटनबरो यांनी तीन पटकथा लेखक चित्रपटाची कथा लिहिण्यासाठी नेमले. यासाठी लॉरेन्स ऑफ अरेबिया हा महाकाय चित्रपट लिहिणार्या पटकथालेखकाची निवड केली. 1964 मधील पहिला ड्राफ्ट वाचल्यानंतर पंडित नेहरूंनी स्वतः खूप मोठ्या प्रमाणावर अॅटनबरो यांना मदत करण्याची व्यवस्था केली. पुढे अनेक ड्राफ्ट होत राहिले.

इंदिरा गांधींनी आपल्या वडिलांचे स्वप्न म्हणून चित्रपटाचे भारतात चित्रीकरण करण्यासाठी पूर्ण मदत केली. आर्थिक बाजू अजूनही भक्कम नव्हती. गोल्डक्रेस्ट फिल्म्सने या चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी काही आर्थिक पाठबळ दिले. ॅॅटनबरो यांच्या मागणीनुसार भारतात प्रत्यक्ष स्थळांवर शुटींग करण्याची परवानगी दिली. भारतात इंदिरा गांधींनी सर्व शक्ती पणाला लावली. 22 मिलियन डॉलर चित्रपटाचे पूर्ण बजेट होते, त्यातील 6.5 मिलियन डॉलर इंदिराजींनी एन.एफ.डी.सी. मधून मिळून दिले. महात्मा गांधीजींच्या अंत्ययात्रेच्या सीनच्या शूटिंगसाठी चार लाख लोकांची एक्स्ट्रा कलाकारांची फौज इंदिराजींनी जमा करून दिली. त्या वेळेतील संसदेच्या अधिवेशनात या खर्चाबद्दल आणि मदतीबद्दल खूप वादळी चर्चा होत होती. परंतु  इंदिराजींनी विरोधांकडे दुर्लक्ष करून मदत केली. पुढे चित्रपट पूर्ण झाला. पाच खंडांतील वेगवेगळ्या देशांतील अभिनेते. वेगवेगळ्या देशांतील शूटींग आणि आर्थिक पाठबळ. 70 एमएमची निर्मिती. सहा साऊंड ट्रॅक. खूप मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष स्थळांवर केलेले चित्रीकरण.

निर्विवादपणेगांधीचित्रपट म्हणून एक अजस्त्र कलानिर्मिती होती. हे एक महाकाव्याचं चित्रण होतं. या चित्रपटाला प्रतिसादही तेवढ्याच प्रमाणावर मिळाला. अकरा ऑस्कर पुरस्कारासाठी या चित्रपटाचे नामनिर्देशन झाले. त्यापैकी आठ ऑस्कर पुरस्कार या चित्रपटाने मिळवले. इतर लहान-मोठ्या पुरस्कारांची तर गणतीच नाही. संपूर्ण जगभरात या चित्रपटाने 100 मिलियन डॉलरपेक्षा जास्त व्यवसाय केला. डीव्हीडी आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवर अजूनही हा चित्रपट व्यवसाय करतोच आहे. नि:ंशकपणे हा जगात सर्वात जास्त बघितलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. दिल्लीला मोठ्या थाटामाटात चित्रपट पहिला शो दाखवला गेला. चित्रपटाची तीन तास अकरा मिनिटांची लांबी लक्षात घेता आंतरराष्ट्रीय स्तरावर हा चित्रपट एवढ्या मोठ्याप्रमाणावर पाहिला गेला हे गांधी या नावाभोवतीच्या वलयामुळेच झाले. गांधीजी हे व्यक्तीमत्त्व जिवंत करणारा अनुभव दिला तो गांधींची भूमिका साकारणारे अभिनेते बेन किंग्जले यांनी. त्यांच्याशिवाय गांधी या चित्रपटाची कल्पनाही करता येणार नाही. बेन हे गांधीजींची भूमिका करण्यासाठीच जन्माला आले असंही त्यांच्याबद्दल नंतर बोललं गेलं. यातील अतिशयोक्ती सोडली तर चित्रपट पाहिल्यावर हे नक्कीच पटतं. बेन गांधीजींच्या रूपात आपल्या स्मरणात कायम राहतात.

गांधीहा एक आगळावेगळा दृश्यानुभव आहे. ॅटनबरो यांनी दिग्दर्शन करताना जे कौशल्य वापरले ते वादातीत आहे. कथानक मांडण्याची शांत संयमी लय, गांधीजींची व्यक्ती आणि विचार चित्रित कराताना केलेला फ्रेम्सचा वापर. महत्त्वाच्या ठिकाणी केलेला वाईड शॉटचा उपयोग. तीन तासांच्या कथानकाची गती टिकवण्यासाठी कॅमेरा अँगल आणि मोमेंट्सचा केलेला वापर. कथानक उलगडत जाण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचे घटनाक्रम. हे सर्व अॅटनबरो यांची 20 वर्षांची मेहनत आणि हा चित्रपट पूर्ण करण्याचा ध्यास याचा परिणाम आहे. ॅटनबरो यांनी गांधी चित्रित करण्याआधी व्यक्ती म्हणून  समजून घेतले. चित्रपटामध्येही त्यांनी गांधी व्यक्ती म्हणून सहज सादर केले. गांधींच्या 'Larger Than Life' व्यक्तिमत्त्व सादर करण्याचा मोह त्यांनी टाळला. गांधीचा प्रभाव आणि करिश्मा सांगण्याऐवजी त्यांनी गांधींजींच्या लहान लहान कृती दाखवून त्याचा सहज परिणाम साधण्यावर भर दिला.

गांधीहे रसायन तयार होण्याचा संपूर्ण प्रवास त्यांनी रेखाटला. त्याची सुरूवात त्यांनी आफ्रिकेतून केली. गांधी तयार होण्याची पहिली ठिणगी इथेच पडली होती. सुटाबुटातले गांधी इथपासून हा प्रवास सुरू होतो. तेथील लढा सुरू करून गांधी भारतात येतात. येथील रस्त्यावरच्या भारतीयांची अवस्था पाहून अस्वस्थ होतात. त्यांचे राजकीय गुरू गोपाळकृष्ण गोखल्यांनी देशभर फिरण्याचा दिलेला सल्ला अमलात आणतात. हा भारतभर फिरण्याचा प्रवास चित्रपटात फार सूक्ष्मपणे मांडला आहे. हाच गांधींजीच्या वैचारिक जडणघडणीचा पाया आहे असे अॅटनबरो दाखवतात. या प्रवासातून परत आल्यावर पहिल्यांदा गांधींना एका राजकीय सभेत भाषण करण्याची संधी मिळते हा प्रसंग चित्रपटात विस्तृतपणे दाखवलेला आहे. गांधींना भाषण सुरू करण्याची विनंती केली जाते.

गांधीला ओळखत नसलेले आणि आधीच्या कंटाळवाण्या भाषणांनी लोक जागेवरून उठून जाऊ लागतात. गांधी मात्र आपले विचार ठामपणे मांडायला सुरूवात करतात. उठून जाणार्या लोकांना लक्षात येतं की हा माणूस काही वेगळे बोलतोय. हा आपल्याबद्दलच बोलतोय. लोक पुन्हा येऊन बसतात. कान देऊन ऐकतात. त्या सामान्य माणसांची एका क्षणात गांधींशी नाळ जोडली गेली ती कायमचीच. पण हे सहज घडलं नाही. ते घडण्याची प्रक्रिया अॅटनबरो उलगडून दाखवतात. अशा एकेक प्रसंगातून अॅटनबरोंनी गांधींचे नेतृत्व कसे घडत गेले आणि त्यांना जनतेचा पाठिंबा कसा मिळत गेला हे क्रमाने दाखवत नेले आहे. या सोबतच अधे मध्ये गांधी व्यक्ती म्हणून किंवा त्यांचे माणूसपण दाखवणारे प्रसंग चित्रित केलेले आहेत. अशा काही प्रसंगांमध्ये गांधीजी स्वत:बद्दल बोलत आहेत. हे प्रसंग लुई फिशर यांच्या पुस्तकातून घेतलेले आहेत. ते तसेच चित्रपटात चित्रित केलेले आहेत. गांधी आणि अमेरिकन पत्रकार यांच्या भेटीचे हे प्रसंग.

अशाच एका प्रसंगात गांधीजी या पत्रकारासोबत संध्याकाळी पोरबंदरच्या समुद्रकिनार्यावर बसून आपल्या लहानपणाबद्दल बोलत आहेत. गांधीजी सांगतात की, त्यांची हिंदू म्हणून वाढ झाली असली त्यांच्या गावातील मंदिरातील पुजारी कुराणही वाचून दाखवत होते याचा माझ्या मनावर खूप परिणाम झाला. याच संदर्भाने एके ठिकाणी लोकांना सांगतातमी हिंदू आहे, मी मुस्लिम आहे, ख्रिश्चन आणि ज्यूही आहे, मी तुम्ही सर्वच आहे.’ याच संदर्भाने फाळणीच्या वेळेला गांधी जिनांना म्हणतात, हिंदू आणि मुस्लीम हे या देशाचे डावा आणि उजवा डोळा आहेत, कुणी गुलाम नाही. कुणी मालक नाही. त्यावर जिना उत्तर देतात की, हे जग म्हणजे महात्मा गांधी नाही, मी सर्वसामान्य माणसांबद्दल बोलतोय. हा गांधी आणि इतर नेत्यांमधील विचारांचा फरकही तुलनात्मक पद्धतीने समोर येतो.

आंदोलनाच्या काळातील एका टप्प्यावर जीनांच्याच घरी सुरू असलेल्या देशातील सर्व महत्त्वाच्या नेत्यांमधील बैठकीत गांधी आपल्या देशात कोणीही मोठा किंवा लहान नाही सर्व समान आहेत व त्याबद्दल ते आग्रही भूमिका मांडतात. आपल्या कृतीतून पटवून देण्यासाठी ते बैठकीकडे चहाचे कप घेऊन उभ्या असणार्या जिनांच्या घरातील नोकराला अडवतात, त्याच्या हातातील कप घेतात व सर्वाना स्वत: चहा वाटतात. असे गांधींच्या मोठेपणातले सहज पदर आणि विचारातला प्रामाणिकपणा अनेक प्रसंगात चित्रित केलेला आहे. सोबतच व्यक्ती म्हणूनही काही प्रसंग चित्रित केलेले आहेत. जसे की कस्तुरबा स्वतः स्वच्छतागृहाची साफसफाई करण्यास नकार देतात तेंव्हा गांधीजी त्यांच्यावर रागावतात आणि हे काम त्यांना करावेच लागेल हे ठामपणे सांगतात. म्हणजे गांधींना रागही येतो इथपर्यंतच हा प्रसंग मर्यादित नाही. गांधी व्यक्ती, विचार आणि काळ या संदर्भाने हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

गांधी चित्रपट 1982 मध्ये प्रदर्शित झाला. तोपर्यंत वेगवेगळ्या प्रोपगंडामधून वेगवेगळे गांधी जनमानसाच्या मानगुटीवर बसलेले होते. टकल्या गांधी, देशाची फाळणी करणारा गांधी, भगतसिंगांना मदत न करणारा गांधी, 55 कोटींचे दान देणारा गांधी असे कितीतरी गांधीजी समाज जीवनात होते. स्वातंत्र्यानंतरच्या या पिढीला अॅटनबरो यांनी हे खरे वास्तववादी गांधी दाखवले. ते लोकांना भावले आणि या चित्रपटाला जगात सर्वत्र भरभरून प्रतिसाद मिळाला.

मी जेव्हा हा चित्रपट पहिल्यांदा पाहिला तेव्हा त्याच्या अवाढव्य रूपाने भारावून गेलो होतो. हळूहळू तो प्रभाव थोडा कमी झाला. मात्र चित्रपट पाहून पहिल्या वेळेस पडलेला प्रश्न अजून गंभीर झाला. 20 वर्षे गांधी चितारण्याचा ध्यास केलेल्या माणसाला गांधींची चित्रकथा सांगण्याची सुरूवात आणि शेवट गांधींना गोळी घालून मारणार्या माणसापासून का करावीशी वाटली असेल ? ‘मी नथुराम गोडसे बोलतोयबद्दल मी एकूण होतो मात्र कधी पाहण्या -  वाचण्याचा संबंध आला नाही. गांधी चित्रपट पाहिल्यानंतर तशी इच्छा आणि गरजही राहिली नाही. त्या गोळीने गांधी शरीराने मेले ते अॅटनबरो आणि बेन यांनी माझ्यासाठी शरीराने आणि सोबत विचाराने पुन्हा जिवंत केले. मात्र आज माझा वर्तमान पुन्हा गांधी संदर्भ घेऊन उभा आहे.

भारतीय स्वातंत्रलढ्याचे भाग म्हणून जनमानसातील गांधींची प्रतिमा  पुसून टाकण्यासाठा आजच्या काळात खूप जोरकस राजकीय प्रोपगंडा राबवल्या जात आहे. गांधी म्हणजे फक्त स्वच्छतेचे पुजारी एवढीच फक्त प्रतिमा निर्मिती केली जातेय. सत्तर वर्षापूर्वी जे शरीर गोळीने मारले त्याचे विचार आता दीडशे वर्षाच्या जयंती पर्वावर झाडूने साफ करण्याची स्वच्छता मोहीम देशभर राबवली जात आहे. दुसर्या बाजूला स्वातंत्र्यलढ्यातील इतर काही निष्प्रभ व्यक्तिमत्त्वांना स्वातंत्र योद्धे व स्वातंत्र्यवीर म्हणून समोर आणले जात आहे. गांधींच्या आश्रमात जाऊन सूत कातून त्याच सुताने गांधी विचारांचा गळा घोटला जातोय.

एका शाळकरी मुलीला गांधींच्या चष्म्याचे बोधचिन्ह सुचते आणि ते तीन रंग मिसळून या स्वच्छता मोहिमेचे बोधचिन्ह बनवते हा वाटायला सहज सोपा भाग. पण अगदी सामान्य माणसालाही काही वावगं वाटणार नाही आणि सर्व काही सहज सोपे वाटेल असा असणे हेच प्रोपगंडाचे पहिले उद्दिष्ट असते. या प्रोपगंडाचे परिणाम लगेच दिसणार नाहीत कदाचित. पण ते दूरगामी असतील. यातील गांभीर्य आज लक्षात येत नसेलही. पण लक्षात येईल तेंव्हा वेळ गेलेली असेल. आज माझा मुलगा अडीच वर्षांचा आहे. त्याला मी अजून वीस वर्षांनी त्याच्या जाणत्या वयात विचारले की गांधीजी कोण होते? तर माझ्या मुलाला गांधीजी कसे माहिती असतील हाच मोठा प्रश्न आहे. त्याला दाखवायला माझ्याकडे अॅटनबरोचे गांधी आहेत एवढाच काय तो दिलासा.

- संदीप गिऱ्हे

Monday, 19 August 2019

भांडवलशाहीत जगायचं तर आजची भांडवलशाही नीट समजावून घ्या...



लोकवाङ्मय प्रकाशन गृह मुंबईने 1 मे 2019 ह्या कामगार दिनाचे औचित्य साधून प्रसिद्ध लेखक, प्राध्यापक, वित्तीय अर्थशास्त्राचे जाणकार व डाव्या विचारसरणीचे वाहक संजीव चांदोरकर ह्यांच्या अन्वयार्थ हा तीन भागांतील अतिशय महत्त्वाचा ग्रंथ प्रकाशित केला आहे. त्याबद्दल लोकवाङ्मयचे अभिनंदन. प्रत्येक भागात सुमारे 120 पृष्ठे आहेत. पुस्तकाचा आकार (6’’×63/4’’) 1/8 डेमी असा छोटा आहे, पण त्यामुळे त्यांची वाहकता (पोर्टेबिलिटी) खूप छान झाली आहे. चांदोरकरांचे अभिनंदन ह्यासाठी आवश्यक आहे की, त्यांनी आजच्या जगात / समाजात जगायचे असेल तर ही समाजव्यवस्था पोषक असावयास हवी. ती मुळात भांडवलशाही आहे, हे अनेकांना माहिती नसते. ती कशी कार्य (आपल्या नजरेआड) करते हेही आपल्याला माहीत नसते. मात्र तिच्या भल्याबुर्या कार्याचे परिणाम साधनहीन, बलहीन, असंघटित सामान्य माणसाला नेहमीच सहन करावे लागतात. ती प्रक्रिया सध्या जोरात चालू आहे. ही परिस्थिती साध्या आणि चालत्या-बोलत्या भाषेत मांडण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांच्या तिन्ही पुस्तकांमधून चांदोरकरांनी केला आहे. जर ही स्थिती बहुतांश गरीब व मध्यम लोकांच्या विकासाला अनुकूल नसेल (तशी ती नाहीच) तर ते समजावून घेऊन लोकशाही पद्धतीने संघर्ष करून, कायदे-नियम-प्रशासन इत्यादींमध्ये उचित बदल करून घेणे आवश्यक आहे. त्याला परिवर्तन असे म्हटले जाते. पलीकडल्या काळातील परिवर्तन आजची तंत्रशिक्षित पण सामाजिक समतेच्या विचाराने समृद्ध असलेली तरुण पिढीच घडवून आणू शकेल, असा चांदोरकरांचा विश्वास आहे. त्यामुळे त्यांनी ह्या तिन्ही पुस्तिका परिवर्तनवादी तरुणांना अर्पण केल्या आहेत.

ह्या तीन पुस्तिका मिळून समान शीर्षकअन्वयार्थअसे आहे. तीनही भाग मिळून अर्थशास्त्र, वित्तीय अर्थशास्त्र आणि तंत्रज्ञानाचे आर्थिक परिणाम ह्यांच्याशी जोडलेल्या बहुतेक सर्व प्रश्नांची उकल आपल्याला वाचायला मिळते. त्यांनी हे सगळे विचार आधी फेसबुकवर टाकले होते. त्यामुळे क्षणोक्षणी त्यांचा ऊहापोह झालेला आहे. आता संकलित स्वरूपात ते वाचकांपुढे येत आहेत.


पहिल्या भागात त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडींचा आढावा घेतला. त्यात मुख्यत: शेतीसंबंधीचे पाच लेख आहेत. शेती प्रश्नाशी जोडून त्यांनी वित्त भांडवल, बहुराष्ट्रीय कंपन्या, डब्ल्यू.टी.. कर्जमाफी, हमीभाव, सबसिडी; विमा ह्यांचा समावेश केला आहे. बेरोजगारीवरील लेखात समग्र संकल्पना; असंतोषाची वाफ; लोकसंख्या नियंत्रण; भाकरी आणि आत्मसन्मान; भाकरी कोठून मिळवायची ह्याचे स्वातंत्र्य इत्यादी मुद्दे हाताळले आहेत. नंतर आर्थिक विषमतेवरील आठ टिपणांमध्ये आयकरांच्या आकडेवारीचा अर्थ; भारतातील श्रीमंती; अभिजनांचा दुटप्पीपणा; हिंदू राष्ट्र म्हणजे वेगाने आर्थिक प्रगती होणार का; गरिबांच्या आकांक्षा म्हणजे चंगळवाद आहे का, अशा प्रश्नांची चर्चा केली आहे. नंतरच्या टिपणांमध्ये किरकोळ विरुद्ध कॉर्पोरेट व्यापारी संघर्ष; खासगी विरुद्ध सार्वजनिक उद्योग; खनिज तेलाची आंतरराष्ट्रीय सट्टेबाजी; संरक्षण साहित्य उद्योग इत्यादींची, अद्ययावत माहितीसह, चर्चा केली आहे.

अन्वयार्थ (2) मध्ये जागतिक भांडवलशाहीतील घडामोडींचा उहापोह आहे. त्यात नवउदारमतवादी (निओलिबरल) कॉर्पोरेट भांडवलशाही ही एकाधिकाराकडे कशी झुकते आहे; तीअल्पमती, ‘अल्पदृष्टी, स्वार्थांधळी आणखी कशी आहे; ती समाजाच्या आर्थिक व्यवहारांचे मूलचक्र कसे तोडत आहे; ती राजकारणावर कसे नियंत्रण ठेवते व ह्या सर्वांना वैचारिक आव्हान देण्याची गरज कशी आहे ते प्रतिपादन केले आहे. जागतिक भांडवलशाहीचे बदललेले स्वरूप नव्याने समजून घेण्याची सूचना ते जुन्या डाव्या विचाराच्या मंडळींना करतात, ह्या भांडवलशाहीला लष्करीकरणाचा (म्हणजे लष्करी खर्चाचा) आधार आवश्यक वाटतो. जागतिक आकाराच्या कंपन्या भल्या मोठ्या जाहिरात खर्चाद्वारे स्पर्धक कंपन्यांना नमवून आपला एकाधिकार प्रस्थापित करतात. चांदोरकर तरुणांना हे समजावून सांगत त्यांनी राजकीय भूमिका घ्यावी, असे आवाहन करतात. अमेरिकेतील व चीनमधील आर्थिक स्थिती व त्या दोघांमधील व्यापार-युद्धाचा तपशील तीन विस्तृत टिपणांमध्ये वाचावयास मिळतो. अमेरिकेतील व चीनमधील आर्थिक स्थिती व त्या दोघांमधील व्यापार-युद्धाचा तपशील तीन विस्तृत टिपणांमध्ये वाचावयास मिळतो. अमेरिकेतील तुरुंगांच्या खासगीकरणामुळे भांडवलशक्तीचा एक नवीनच पैलू अनुभवास येतो. ज्या देशांमध्ये पूर्वी भांडवलशाही व साम्राज्यवादी शोषण झाले होते, त्या ब्राझील, व्हिएतनाम व दक्षिण आफ्रिकेमध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भांडवलशाही, शोषण व हुकूमशाही कशी आली ही गोष्ट ते समजावून सांगतात.


अन्वयार्थच्या तिसर्या भागात लेखकाने वित्त आणि बँकिंग क्षेत्रातील घडामोडींचा तपशील मांडला आहे. त्यांचा पूर्वीचा सुमारे 22 वर्षांचा वित्तीय क्षेत्रातील अनुभव आणि सध्याही वित्ताचे अर्थशास्त्र ते शिकवीत असल्यामुळे ते स्वत:च्या अंगणात क्रिकेट खेळत असल्यासारखे सहज फटके मारतात. ह्या भागात अनेक मुद्दे हाताळताना त्यांनी त्या विषयांचे शोषक स्वरूप, सामान्य लोकांत बसणारा फटका आणि त्या व्यवस्थांचे स्वरूप बदलवून ते जनकेंद्री कसे करावे आणि त्या गुंतवणूक क्षेत्राबद्दल आकर्षण असणारांनी स्वत:ची सुरक्षा कशी साधावी ह्यावरून त्यांनी स्वत:ची नजर ढळू दिली नाही.

भाग भांडवलाच्या बाजारात (शेअर मार्केट) लोकसंख्येपैकी बहुसंख्य लोक जात नाहीत, कारण त्यांच्याजवळ गरजा भागवून शिलकीचा पैसा नसतो. अनेक लोक जन्मभर वर्तमानपत्रातील शेअर मार्केटचे पान वाचतही नाहीत. पण सर्व उत्पादन व्यवस्थेचे (भांडवलशाही व्यवस्थेत) हृदय शेअर मार्केट आहे; त्यात खरेदी-विक्रीच्या सतत कार्यरत राहणारे रक्त म्हणजे भांडवल होय; खरेदी-विक्रीत आपल्याला नुकसान होऊ नये म्हणून प्रत्येक जण जोखीम टाळण्यासाठी सट्टा खेळत असतो, तो लहान किंवा मोठा असेल त्या प्रमाणात. ही त्या भांडवल बाजाराची रचना असते. भाग घेणार्या व्यक्ती चांगल्या की वाईट हा प्रश्न नाही. पण भविष्यकाळाबद्दलचे अंदाज चुकणे, कोणाचे तरी नुकसान होणे, ते भांडवल बाजारातून कारखान्यांमध्ये वस्तूंच्या उत्पादन खर्चात समाविष्ट होणे, त्या नुकसानीची फेड मजुरांना कमी मजुरी देऊन किंवा ग्राहकांकडून जास्त किंमत घेऊन वसूल करणे, किंवा दोन्ही गोष्टी करणे, हे मजुरांना किंवा ग्राहकांना कळू न देता रोजच घडते. त्याविषयी लेखक आपल्याला सतर्क करतात.


पूर्वी भांडवलाचा पुरवठा कमी असे. आता भांडवल अपार झाले आहे आणि त्याचा उपयोग करणार्यांच्या शोधात ही व्यवस्था असते. मायक्रो फायनान्स कंपन्या हादेखील त्यातला एक प्रकार आहे. 2008-09 मध्ये अमेरिकन अर्थव्यवस्था कोसळली. इतर देशांच्या अर्थव्यवस्थाही प्रभावित झाल्या. ही अरिष्टे स्वत:च्या फायद्यामध्ये रूपांतरित कशी करायची ह्याची आर्थिक व राजकीय कौशल्ये बलाढ्य कंपन्यांना चांगली अवगत असतात म्हणून सततच्या अरिष्टांमध्ये अशा मोठ्या कंपन्यांचे मालक-प्रवर्तक-व्यवस्थापक-भागधारक श्रीमंत होत राहिलेले आपण पाहात आहोत.

भारतीय सरकारी (केंद्र आणि राज्ये) कर्जांबद्दलचे उत्तम टिपण आहे. बँकांची थकीत कर्जे, मोठ्या बुडणार्या कंपन्या आणि अगदी नवीन मुद्दा : युनिव्हर्सल बेसिक इन्कम (सार्वत्रिक किसान उत्पन्न) ह्यांच्या चर्चेने ह्या मालिकेची समाप्ती होते. सार्वत्रिक किमान उत्पन्न प्रस्तावाला रास्त विरोध करून चांदोरकर म्हणतात की ‘‘हाताला काम द्या; कामाला पुरेसे वेतन द्या ही कष्टकर्यांच्या आंदोलनातून तावून सुलाखून निघालेली मागणी आहे, तिचा विसर पडता कामा नये.’’


ही अतिशय वाचनीय पुस्तके समाज परिवर्तनाची चिंता वाटणार्या प्रत्येकाने आपल्या टेबलवर / बॅगमध्ये ठेवून केव्हाही कोणतेही पान वाचण्यासारखी आहेत. आणि आजच्या काळात ही वाचाल तर (भांडवलशाहीच्या भविष्यातील शोषणांपासून) वाचाल, अशी आहेत.

- श्रीनिवास खांदेवाले

Friday, 16 August 2019

‘त्रिज्या’ : मूल्यनिष्ठा आणि प्रेरणांचा शोध


त्रिज्याया अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या लेखसंग्रहात डॉ. गणेश देवी आजवरच्या स्वत:च्याच कार्याचा शोध घेताना दिसतात. त्यामुळे या पुस्तकातून त्यांच्या साहित्य-भाषाविषयक समीक्षा आणि संशोधनाचा अधिक सखोल परिचय वाचकांना होतो. ‘त्रिज्यामधील त्यांचे हे सिंहावलोकन निव्वळ बौद्धिक नाही; तर ते भावना, संवेदना आणि अंत:प्रेरणांच्या स्वरूपातील तो आत्मशोध आहे. या शोधाचा पटही विशाल आहे. पण संस्कृती, साहित्य, भाषा व आदिवासी-भटक्या जमातीच्या मूलभूत प्रश्नांच्या संदर्भात ते इतिहासाचा धांडोळा घेत समकालाच्या परिप्रेक्ष्यात आपले चिंतन मांडतात. एकूणच त्यांच्या संशोधनाचा व्यास एका भाषेचा किंवा संस्कृतीचा नसून तो वैश्विक कसा आहे याचा प्रत्ययत्रिज्याया पुस्तकातून येतो. 

त्रिज्याया लेखसंग्रहातील लेखांचे स्वरूप मनोगत, चिंतन, नोंदी आणि वृत्तांत अशा स्वरूपाचे संमिश्र आहे. काही ठिकाणी डॉ. देवी पद्याचाही वापर करतात. पुस्तकाच्या प्रारंभीच ते लिहितात,

जो गोष्ट सांगतो तो त्या गोष्टी असत नाही.
जे गोष्टीत असतात ते ती गोष्ट सांगत नाहीत.
जो गोष्ट सांगतो तो ती गोष्ट असत नाही.
तो ती गोष्ट नसतो तर ती गोष्टही नसते.
आणि तो गोष्टीत नसतो म्हणजे तो नसतो.
या सार्या नसणार्यांनी सांगितलेल्या, नसलेल्या गोष्टी.
पण सांगणे असतेच.
ते असते म्हणजे एखादा सांगणारा असलाच पाहिजे.
आणि सांगणे असले म्हणजे ते सांगितले जात आहे
ते कुठेतरी, काहीतरी असले पाहिजे.
हे असे, असणे आणि त्याच वेळी नसणे.
असण्याचा केंद्रबिंदू आणि नसण्याचा परीघ जोडणारी त्रिज्या.’ 

डॉ. देवीत्रिज्याया पहिल्याच लेखात त्यांच्यावर तरुणपणी झालेले संस्कार सांगतात. गौतमाचे समाधीवस्थेतून परत फिरणे, जैन तत्त्वज्ञानातील काळ-अणूची संकल्पना आणि युक्लिडच्या भूमितीतील त्रिज्येविषयीच्या त्यांच्या धारणा आणि पुढे डार्विन व मार्क्स यांच्या विचारांच्या संदर्भात सत्तेचेकेंद्रआणिपरिघाविषयी चिंतन ते मांडतात. त्यांच्या आगळ्यावेगळ्या शैलीमुळे वाचकांना एकाच वेळी त्यांच्या लेखनातील बौद्धिक परिमाण आणि भाषिक लालित्याचा अनुभव येतो.  

त्रिज्यामध्ये आठ लेख आहेत. ‘स्व-त्वया लेखात महात्मा गांधी, श्री अरविंद, डॉ. आंबेडकर आणि महाश्वेतादेवी यांच्या वैचारिक संस्कारातून आपले विचारविश्व कसे घडत गेले ते डॉ. देवी सांगतात. त्याच प्रभावातून ते विद्यापीठातील प्राध्यापकीचा त्याग करून भटक्या आदिवासींच्या प्रश्नांवर काम करू लागतात. प्रारंभ करतात. जीवनमूल्यांसाठी स्व-त्वाची अशी परखड परीक्षा स्वत:च घेणारे डॉ. देवी जीवनमूल्यांच्या आग्रहासाठी प्राण पणाला लावणार्या महात्म्यांच्या बलिदानाचे कटू सत्य पुढील शब्दात मांडतात :       

स्त्री-त्वहा या संग्रहातील एक महत्त्वाचा लेख. या लेखात त्यांनी प्रेम, सत्य व सौंदर्य या संकल्पनांचा मागोवा घेतला आहे. बुद्ध, येशू, मीरा आणि गांधी यांनी प्रेमाचे तत्त्वज्ञान मांडले. उच्च दर्जाच्या प्रेमाला बुद्ध करुणा आणि गांधी अहिंसा म्हणतात. त्यांची अहिंसेची अभिव्यक्ती स्त्रीत्वावर आधारित असल्याचे सांगून डॉ. देवीस्त्रीत्वया संकल्पनेला गांधींच्या राजकारणाच्या संदर्भात मूल्याचा दर्जा देतात. महात्मा गांधींच्या राजकीय आंदोलनातीलमौन’, ‘असहकारमिठाचा सत्याग्रहया अहिंसक कृतींचा समावेश कसा होतो आणि लढण्याचे हे मार्गस्त्री’-त्वाचे विशेष कसे आहेत, ते डॉ. देवी यांनी वेधक शब्दात सांगितले आहे. 

1998 च्या सुमारास महाश्वेतादेवींच्या प्रेरणेने भटक्या-विमुक्तांच्या मानव अधिकारांच्या हक्कासाठी उभारलेल्या चळवळीबद्दलसत्ताया लेखात सांगताना डॉ. देवीराष्ट्रलोकशाहीया संकल्पनाची चिकित्सा करतात. त्यांच्या मते भटक्या-विमुक्तांचे प्रश्न केवळ दारिद्य्राशी संबंधित नाही. इंग्रजी वसाहतीच्या सत्ताकांक्षेतून भटक्या-विमुक्तांवर गुन्हेगारीचा ठपका बसला होता. त्यातून मुक्तीचा मार्ग दिसत नव्हता. अशा या आंदोलनातून डॉ. देवी धडा घेतात की, परिवर्तनाची लढाई एकेका मुद्द्यावर करून उपयोग नाही. कायदे अस्तित्वात असूनही न्यायासाठी सत्तेशी संघर्ष करावा लागत असेल तर प्रबोधन व संघटन या गोष्टींना पर्याय नाही.

राष्ट्रया लेखात त्यांनी भारतीय लोकशाहीचा ऐतिहासिक मागोवा लेखात घेतला आहे. ‘स्वदेशआणिस्वराज्यया संकल्पना स्पष्ट करून अरविंद घोष, रवींद्रनाथ टागोर आणि महात्मा गांधी या भारतातील तीन महान नेत्यांच्याराष्ट्रया शब्दाविषयी कशा सावध भूमिका होत्या, ते घटनाप्रसंगातून पटवून देतात. आपल्या देशातल्या तीन महान विचारवंतांना असे वाटले की, जर्मनी आणि इटलीचा केवळ भौगोलिकतेवर आधारित, आयर्लंडचा केवळ संस्कृतीवर आधारित आणि रशियाचा आर्थिक मुद्द्यावर आधारित राष्ट्रवाद योग्य नाही. भारताकडे सर्व जगाला देण्यासाठी राष्ट्रवादाची एक नवी संकल्पना आहे. ती ‘Democracy by Diversity’, असे डॉ. देवी या संदर्भात पुढे लिहितात.  

भाषाया विषयाला मानवी संस्कृतीत असलेले सांस्कृतिक, जैविक आणि तात्त्विक परिमाण आपल्या संशोधनातून अधोरेखित करणारे डॉ. देवी यांनी गेल्या अडीच दशकात या संदर्भात केलेल्या कामाचा आढावा एका लेखात घेतला आहे. मृत्युपंथाला लागलेल्या जगातील भाषा टिकवणे का महत्त्वाचे आहे आणि ते कसे करता येईल याचा एक कृती आराखडाच डॉ. देवी यांनी मांडून दाखविला आहे. विश्वाच्या उत्पत्तीपासून तर जागतिकीकरणापर्यंतचा भाषेचा प्रवास तात्त्विक अंगाने या लेखात मांडून ध्वनी, नाट्य आणि चित्र संकेत अशा आधुनिक काळातील भाषेबद्दल भाकीत सांगितले आहे. संपूर्ण जगभरात मोजक्याच भाषा अस्तित्वात असाव्या असे काहींना वाटते, पण त्यामुळे जगभरातील मानवसमूहांचा भाषिक वारसा, संस्कृती व बौद्धिक संपदा नष्ट झाले तर काय होईल ते नीट समजावून सांगतात. ज्या भाषेमुळे माणूस इतर प्राण्यांपासून वेगळा ठरला त्या  भाषेची निर्मिती प्रक्रिया गेली पाच लाख वर्षे सातत्याने सुरू होती. आज हे भांडवल गमावण्याच्या टप्प्यावर आपण येऊन पोचलो आहोत. भारतातील मराठी, कन्नड, गुजराती, ओरिया अशा समृद्ध साहित्य परंपरा असलेल्या भाषांमध्येही हा र्हास दिसत आहे, असे निदान ते या लेखात करतात.   

त्रिज्यामधीललोकवर्तमानहे बहु-सांस्कृतिकता आणि मानवी अस्तित्व या विचारांचे महत्त्व सांगणारे हे लेख आहेत. आपल्या दीर्घकालच्या संशोधनातून डॉ. देवी काही प्रमेय या लेखात मांडतात. ‘लोकया लेखात ते म्हणतात की मराठीतीललोकसाहित्यही संज्ञा इंग्रजीतीलफोकलोरया अर्थाने वापरली जाते. पण युरोपमध्येफोकयाचासांस्कृतिकदृष्ट्या बिन-चेहर्याचेसमाजघटक असा अर्थ प्रचलित होता. मौखिक गीतांनालोरअसे म्हणत. 1870 पासून आधुनिकतावाद प्रस्थापित होत असतानाफोकलोरया शब्दाचा अर्थ बदलून तो केवळ मौखिक साहित्य असा संकुचित झाला.  पण भारतीय परंपरेतील साहित्याचा विचार केला तर मौखिक साहित्य हे केवळफोकनव्हते. वैद्यक, गणित, भूगोल, संगीत, कला किंवा  वेद, रामायण-महाभारत हे ग्रंथ मौखिकतेतूनच संक्रमित झाले. वस्तुतः साहित्य ही एकज्ञानशाखाअसते. लिखित ग्रंथ आणि मौखिक तेलोकसाहित्यअसा भेद करता येत नाही.

भारतीय लोकसाहित्यहे भाषा, संस्कृती आणि साहित्यमूल्य या संदर्भात डॉ. देवी यांना जसे महत्त्वाचे वाटते तसे ते लोकसाहित्य हे विद्यासंक्रमणाचे सोपे व समाजस्मृतीत रुजलेले ज्ञानमार्ग होते. इंग्रजी शिक्षणाच्या संस्थात्मक चौकटीत यासमाजस्मृतीकशा नाकारल्या गेल्या ते सांगून ते मानवी मेंदूच्या जडणघडणीतील नैसर्गिक उत्क्रांतीचे प्रमेय मांडतात. भविष्यातील मानवी भाषेत शब्द असणार नाहीत. प्रतिमा असतील. मानवी स्मृतीच्या पलीकडे गेलेल्या नव्या संवादसंस्कृतीचा प्रवास मल्टिमीडियाच्या मार्गाने होईल. यात मानवी स्मृतीचा हजारो वर्षांचा संस्कृतीसंचय आपण गमावून बसू असे भाकीत डॉ. देवी करतात. प्रचंड वेगाने कृत्रिम स्मृती मानवी मेंदूवर स्वार होईल. अशा वेळी कोणत्याही भाषेमधील मौखिक स्मृतीच्या शक्यता जपून ठेवणे हाच एक इलाज संभवतो. ज्यांच्या भाषांना लिपीच मिळाली नाही अशा भटके-आदिवासीच्या मौखिक स्मृतीला तिथे स्थान मिळेल. डॉ. देवींच्या मते त्यांच्या मौखिकतेत आजही जिवंत असणारी बहुमाध्यमता कदाचित उद्याच्या भाषांची जननी असू शकेल. एखाद्या शतकानंतर लिखित साहित्य जवळपास इतिहासजमा झाल्यानंतर, मौखिकतेच्या मदतीने मानवाची मानवीयता आपण पुढच्या युगाच्या उंबरठ्यापर्यंत पोचवू शकू, अशी आशाही ते व्यक्त करतात.

सारांश, स्वातंत्र्य, समता व बंधुता या लोकशाही मूल्यांवर अधिष्ठित मानवी सहजीवन हे डॉ. देवी यांच्या एकूणच साहित्याचे आणि सामाजिक कार्याचे केंद्र आहे, ते या पुस्तकावरून लक्षात येते. म्हणूनचन्यायया एकाच तत्त्वाच्या निकषावर ते वसाहतवादी सौंदर्यमूल्यांनी बाधित झालेली साहित्य संस्कृती, भटक्या-विमुक्तांचे सांस्कृतिक अस्तित्व आणि आदिवासींची भाषा यांची सूक्ष्म चिकित्सा ते करतात. 

त्रिज्याया पुस्तकात तत्त्वज्ञान आणि सौंदर्यशास्त्र अशा विभिन्न ज्ञानशाखांचा एक मनोरम वैचारिक संगम झाला आहे, असे वाटते. ‘त्रिज्याया पहिल्या लेखातून लेखकाने संपूर्ण पुस्तकामागील भूमिकाच मांडली आहे. तर अन्य लेखांतून आयुष्यभर जपलेली मूल्ये, थोरांप्रतिच्या निष्ठा, हाती घेतलेली कामे आणि वर्तमानाच्या क्षितिजावर भेडसावणार्या प्रश्नांना भिडताना जे जाणवले ते मनस्वीपणे वाचकांपुढे मांडले आहे. मुळात साहित्य आणि साहित्यशास्त्राची चिकित्सा करताना डॉ. देवी यांना आंतरिक प्रेरणेने भटके-आदिवासींचे प्रश्न, भाषाविषयक संशोधन आणि दक्षिणायनसारखी चळवळ अशी कामे हाती घ्यावी लागली. या वेगवेगळ्या कामांमागे त्यांची मूल्यनिष्ठा कोणती आणि त्यामागील त्यांच्या प्रेरणा कोणत्या या प्रश्नांची  उत्तरे शोधण्याच्या प्रपंचातूनत्रिज्यामधील हे लेखन सिद्ध झाले आहे.
प्रमोद मुनघाटे

Tuesday, 13 August 2019

स्वातंत्र्याची ओढ

साहित्य आणि कलाकृतीतून स्वातंत्र्याबद्दल वेगवेगळे मत वा विचारप्रवाह व्यक्त होत राहिले. काहींनी याबद्दल गंभीर प्रश्न उभे केले. आजतागायत जगात सर्वत्रच याबाबतचे चर्चा-चर्वण चालूच आहे. असो. स्वातंत्र्य मिळालेल्या देशात या स्वातंत्र्याचे गोडवे गाणारे अनेक चित्रपट तयार झाले. तिथली लोकशाही स्थिरावल्यावर व्यक्तिस्वातंत्र्य, माध्यमस्वातंत्र्य, अभिव्यक्तिस्वातंत्र्य अशा अनेक विषयाबद्दल कलाकृती तिथे तयार होत राहिल्या. यातील अनेक कलाकृती मूळ साहित्य स्वरूपात आणि नंतर त्या साहित्यावर निर्माण झालेले चित्रपट, चित्र शिल्प, नाट्य कलाकृती असे स्वरूप आहे. स्वातंत्र्योत्तर पिढीने आपला मोर्चा स्वातंत्र्याची चिकित्सा करण्यासोबतच जगण्याच्या इतर संघर्षाकडे वळवला. यातूनच तिथली लोकशाही अधिक प्रगल्भ होत राहिली.

अमेरिकेमध्ये इतर कुठल्याही देशापेक्षा अधिक प्रमाणात उपरोक्त विषयाबद्दलच्या कलाकृती निर्माण झालेल्या आहेत. ज्या लोकशाही आणि स्वातंत्र्याच्या मूल्यांसाठी अमेरिका ओळखली जायची त्यापेक्षाग्रेटअमेरिका बनवण्याची स्वप्नं दाखवणारे अध्यक्ष निवडून आले मात्र या मूल्यांनाच नख लावलं. त्याचा विरोध तेथील कलाकारांनी त्यांच्या कलाकृतीतून केला. हाच जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशामधील आणि एका प्रगल्भ लोकशाहीमधील फरक आहे. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सत्ताधीशांनी लोकशाही मूल्यांची कितीही गळचेपी केली तरी कुणी काहीच करत नाहीत. काही अपवाद वगळता सर्व कलाकृती त्या सत्ताधीशांचे गुणगान गाण्यातच धन्यता मानतात. हे नक्कीच एका प्रगल्भ लोकशाहीचे लक्षण नाही. अमेरिकेमध्ये हे होऊ शकतं कारण तिथे वेगवेगळ्या विचारप्रवाहांची चाड राखणार्यांची मोठी परंपरा आहे. म्हणून आजही तिथे राष्ट्रप्रमुखांच्या निर्णयावर टीका केली म्हणून देशद्रोहाच्या गुन्ह्यामध्ये अटक केली जात नाही. आणि राष्ट्रप्रमुखांवर स्तुतिसुमने उधळली म्हणजे राष्ट्रभक्ती समजली जात नाही. असो.

स्टीफन किंग हे अमेरिकेतील मोठे लेखक. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची संख्या आणि त्यांच्या विकल्या गेलेल्या प्रती या आणि त्यातील साहित्यमूल्य या अर्थाने. स्टीफन किंग यांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या साहित्यावर खूप मोठ्या प्रमाणात चित्रपट निर्मिती केली गेली आहे. तब्बल 277 चित्रपट, टीव्ही सीरियल व इतर दृक्श्राव्य माध्यमासाठीचा मूळ कलाकृतीचा लेखक म्हणून स्टीफन किंग यांची नोंद आहे. स्टीफन किंग यांचीकॅरीही पहिली कादंबरी 1974 मध्ये प्रकाशित झाली. त्यानंतर दोनच वर्षांत म्हणजे 1976 मध्येकॅरीहा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रचंड प्रसिद्धी मिळवली आणि स्टीफन किंग हे नाव घराघरात पोहोचले. पुढे त्यांचा आलेख कायम चढताच राहिला. एकाच दिग्दर्शकाने स्टीफन किंग यांच्या कथेवर आधारित अनेक चित्रपट बनवले आणि अनेक दिग्दर्शकांनी त्यांच्या एकाच कथेवर अनेक चित्रपट बनवले अशीही अनेक उदाहरणे आहेत. फ्रँक डाराबॉन्ट हे त्यापैकीच एक. त्यांनी दिग्दर्शित केलेलाशॉशांक रिडीम्पशनहा याचे सर्वोत्तम उदाहरण. स्टीफन किंग हे फार चतुरस्र लेखक. भय, थरार, गूढ, विज्ञान अशा अनेक विषयांच्या कथा त्यांनी लिहिलेल्या. त्यासाठीच ते जास्त प्रसिद्ध आहेत. मात्र फ्रँक डाराबॉन्ट यांना स्टीफन किंग यांच्या आड वळणाच्या कथा अधिक भावतात. त्यांचेच त्यांनी चित्रपटात रूपांतर केलेले आहे.

‘Different Seasons’ ही स्टीफन किंग यांची साहित्यकृती ऑगस्ट 1982 मध्ये प्रकाशित झाली होती. साडेपाचशे पानाच्या या पुस्तकात चार लघु-कादंबर्या होत्या. त्यातील एक होतीरीटा हेवर्थ आणि शॉशांक रिडीम्पशन’. या लघुकादंबरीवर फ्रँक डाराबॉन्ट यांनीशॉशांक रिडीम्पशनहा चित्रपट 1994 मध्ये बनवला. विसाव्या शतकातील  सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या कोणत्याही यादीमध्ये हा पहिल्या पाच मधेच आहे. मानवी भावना आणि लोकशाहीतील संस्थांचा सहसंबंध उलगडणारी ही कथा. कथेच्या मानाने चित्रपटाची लांबी खूप आहे.

शॉशांक या काल्पनिक कारागृहामध्ये ही कथा घडते. अँडी डुफ्रेन या तिशीतील उंचपुर्या, सुंदर दिसणार्या गोर्या गुबगुबीत श्रीमंत तरुणाला त्याच्या पत्नीच्या न केलेल्या खुनाबद्दल जन्मठेपेची शिक्षा होते. त्याची रवानगी इतर अजून काही कैद्यासोबत शॉशांक या कारागृहामध्ये होते. हे कारागृहातील अँडीच्या मुक्त, आलिशान जगापेक्षा फार वेगळं आहे. या जगण्याची त्याने कधी कल्पनाही केली नसेल. सुरुवातीचे काही वर्ष त्याला तिथे स्थिर व्हायला खूप अवघड होतं. तिथे तो हळूहळू काही मित्र तयार करतो. रेड हा त्याचा पहिला मित्र. तो आपल्या पत्नीसह शेजार्याचा खून करून कित्येक वर्ष झालीत इथे पडून आहे. रेड हाच या कथेचा निवेदक आहे. त्याच्या निवेदनानेच कथा सुरू होते आणि संपते. मूळ पुस्तक आणि चित्रपटातील ही रचना सारखीच. रेड हा त्या कारागृहातीलसुपारमार्केटआहे.

सिगरेटपासून तर इतर कोणतीही जीवनावश्यक वस्तू तो कारागृहामध्ये कैद्यांना हवी तेव्हा मिळून देतो. अँडी हा रेड कडून दगडाचे छोटे शिल्प बनवण्याची छोटी हातोडी आणि रीटा हेवर्थ या मादक अभिनेत्रीचे पोस्टर घेतो. रेडने या कारागृहातून बाहेर पडण्याची अपेक्षा सोडून दिली आहे. तर अँडी खुनी, बलात्कारी कैद्यांमध्ये राहून आपला निरागसपणा जपत कारागृहातून पळून जाण्याचे मनसुबे आखत असतो. अँडी कारागृहाच्या छताला रंग देण्याचे काम सुरू असताना पहार्यावरील सैन्याच्या प्रमुखाला प्राप्तीकर भरण्याच्या अडचणीबद्दल चर्चा करताना ऐकतो व त्याला करसल्ला देऊन त्याचे प्राप्तीकर विवरणपत्र मोफत भरून देतो असे सांगतो. हाही प्रसंग अगदी संवादासहित पुस्तकात जसा आहे तसा चित्रपटात आहे.

हळूहळू पुढील काही वर्षांत कारागृहातील सर्व कर्मचार्यांचे विवरणपत्र भरून देण्याचे काम अँडीकडे येतं. यामध्ये जेलरची विवरणपत्र भरताना जेलरच्या भ्रष्ट कमाईतून आलेला पैसा अँडी एका खोट्या नावाने खाते उघडून त्यात वळते करतो. वर्षानुवर्ष हे चालत रहातं. या कामातून अँडीची कारागृहात पत वाढते. त्याला इतर कामातून सूट मिळून ग्रंथालयात काम करण्याची सुविधा मिळते. एक खूप म्हातारा कमरेत वाकलेला कैदी इथे हे काम करत असतो.

त्याला मदतनीस म्हणून अँडी काम करू लागतो. या ब्रूक्स नावाच्या म्हातार्याशी आधीही अँडीचा खूपदा संबंध आलेला असतो. जेवताना अँडीच्या ताटातील भातात निघणार्या आल्या ब्रूक्स लहान पक्ष्यांना भरवत असतो. असा पक्षी आपल्या स्वेटरच्या खिशामध्ये ब्रूक्सने पाळलेला असतो. तो ब्रूक्स सोबतच मोठा होतो. त्यासोबतच त्याच्या खोलीत आणि ग्रंथालयात लपून राहतो. पक्षी हे मुक्त स्वातंत्र्याचे प्रतीक. मात्र इथले पक्षी ते विसरून गेलेत. ही प्रतीकात्मक रचना कारागृहातील कैद्यांसाठी वापरलेली आहे. इथले कैदी या वातावरणाला सरावलेत. इथून बाहेर पडण्याचा ते विचारही करू शकत नाहीत. कोणत्याही संस्थात्मक रचना माणसाला असं स्थिर करून टाकतात. हे अभिव्यक्ती आणि व्यक्तिस्वातंत्र्याला किती मारक आहे असे चित्रण केलेलं आहे. या ब्रूक्स म्हातार्याची चांगल्या आचरणामुळे शिक्षेपेक्षा लवकर सुटका होते तर तो सहकारी कैद्याचा खून करून पुन्हा कारागृहामध्येच राहण्यासाठी प्रयत्न करतो. अँडी त्याला असे करण्यापासून वाचवतो. ब्रूक्स बाहेर पडून एका सुपरमार्केटमध्ये नोकरी करतो. मात्र कारागृहाबाहेरच्या मुक्त जगण्याशी तो एकरूप होऊ शकत नाही म्हणून आत्महत्या करतो. त्याचीही अवस्था त्याने पाळलेल्या पक्ष्यासारखीच आहे. पक्षी असूनही तो उडत नाही. अशीच अवस्था रेडचीही आहे. अँडी मात्र या वातावरणात स्वत:चे अस्तित्व टिकून ठेवतो. आपली स्वतंत्र जगण्याची स्वप्न रंगवतो, त्यासाठी नियोजन करतो. आणि आपण योग्य नियोजन केले तर एक दिवस यातून बाहेर पडू हा स्वतःवरील विश्वास ढळू देत नाही.

वर्षानुवर्ष जेलरच्या भ्रष्ट संपत्तीतून अँडी ठरावीक रक्कम एका गुप्त खात्यावर वळती करत असतो. सोबतच दगडातून शिल्प कोरायच्या हातोडीने आपल्या खोलीतून प्रचंड लांब भुयार खोदतो. करोडोंची रक्कम साठल्यावर एक दिवस त्यातून पळून जातो. सांडपाण्याच्या गटारातून बाहेर पडल्यावर मोकळ्या मैदानात पावसात भिजण्याचा आनंद घेऊन आपल्या स्वातंत्र्याची अनुभूती घेतो. तो पाऊस अँडीचा सर्व भूतकाळ धुऊन काढतो. एक मुक्त भावनेने भरलेला अँडी त्या गुप्त खात्यातील सर्व रक्कम काढून मेक्सिकोच्या समुद्रकिनार्यावरील एका खेड्यात जाऊन राहतो. हे सर्व नियोजन अँडीने कसे केले हे चित्रपटात पाहणे खूप महत्त्वाचे आहे. लघुकादंबरीतील रचनेपेक्षा ही थोडी वेगळी रचना आहे. यामध्ये रेडसुद्धा सहभागी आहे. बोलण्या-बोलण्यातून अँडी रेडला या सर्वांची कल्पना देत असतो. काही काळानंतर रेड पॅरोलवर सुटतो. ब्रूक्सने काम केले तिथेच काम करतो. तो राहिला त्याच खोलीत राहतो. त्या खोलीत अशी अनेकांची नावे लिहिलेली आहेत ज्यांनी ब्रूक्सप्रमाणे आपले स्वतंत्र जीवन संपवले. रेड मात्र अँडीपासून प्रेरणा घेत मुक्त जगण्याची कास धरतो. अँडीने इशारा दिलेले ठिकाण शोधतो आणि त्याच्या पर्यंत मेक्सिकोच्या समुद्रकिनार्याला जाऊन त्याला भेटतो. इथे चित्रपट संपतो. पुस्तकातील कथा मात्र यापेक्षा आधी संपते. रेड अँडीला शोधायला जाण्यासाठी बसमध्ये बसतो इथे लघुकादंबरीतील कथा संपते. लघुकादंबरीत रेड आणि अँडीची भेट होत नाही. चित्रपटात मात्र रेड आणि अँडीची भेट होण्याचा समुद्रकिनार्यावरील सीन खूप महत्त्वाचा आहे. या दोघांची भेट चित्रपटातील कथेला अधिक उंचीवर घेऊन जाते.

मूळ कथा आणि चित्रपटातील कथा यात खूप साधर्म्य आहे. मूळ कथेतील सर्व महत्त्वाच्या घटना आहे त्या संवादासह चित्रपटात चित्रित केलेल्या आहेत. चित्रपटाची कथा मात्र मूळ कथेपेक्षा थोड्या अधिक लांबीची आहे. चित्रपटाच्या रचनेसाठी आणि त्या रचनेचा प्रभाव होण्यासाठी कारागृहामधील घटनांचे विस्तृत चित्रण चित्रपटात केलेले आहे. अँडी, रेड आणि ब्रूक्स ही पात्र आपल्या मनात घर करून बसतात. त्यांची कारागृहातील घुसमट आपण अनुभवतो. ही पात्र प्रभावी होण्यासाठी दिग्दर्शकाने खूप वेळ घेतला आहे. हे पाहताना जाणवतं. मुख्य पात्रांचा अभिनयही कसदार आहे. कथेतील नायक बुटका तर चित्रपटातील अँडी सहा फुटांपेक्षा उंच आहे. मात्र त्याचा सहज निष्पापपणा नजरेत भरतो. रेड मूळ कथेमध्ये आयरिश गोरा धिप्पाड माणूस आहे तर चित्रपटात आयरिश संबंध असलेला काळा माणूस आहे. कलाकाराच्या निवडीसाठी हे स्वातंत्र्य दिग्दर्शकाला घ्यावे लागते. त्यांच्या दिसण्यापेक्षा अभिनयाचा गुण महत्त्वाचा असतो. म्हणून शेवटी अँडीची मुक्तता आपल्याला आनंद देऊन जाते. रेड आणि अँडीच्या भेटीने आपणही समृद्ध होतो. हा प्रवास प्रेक्षक म्हणून आपणही अनुभवतो. यासाठीची जी चित्रपट रचना दिग्दर्शकाने केलेली आहे त्यात तो काही दिग्दर्शकीय स्वतंत्र घेतो. त्याने चित्रपटाची लांबी वाढते मात्र चित्रपट पाहिल्यावर असे कुठेही जाणवत नाही. एक स्वतंत्र श्रेष्ठ कलाकृतीचा अनुभव हा चित्रपट देतो. या अनुभवाचे वर्णन फार कुणी करत बसू नये. हा जगण्याला पुरून उरेल एवढा अनुभव ज्याने-त्याने आपला घ्यावा.
- प्रा. संदीप गिऱ्हे

माणगाव परिषद : बहिष्कृतांचे रणशिंग - उत्तम कांबळे

'अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद ’ हा उत्तम कांबळे यांचा ग्रंथ ‘ लोकवाङ् ‌ मय गृह ’ तर्फे लवकरच वाचकांच्या भेटीसाठी येत आहे. एका ऐति...